म्हापसा : दीड दिवशीय श्री गणेश मूर्ती विसर्जनावेळी विसर्जनस्थळी एका कुटुंबाचा गोंधळ उडाला. विसर्जनासाठी आणलेली मूर्तीच सापडत नसल्याने त्यांना काय करावे ते सुचेनासे झाले. नंतर या मूर्तीचे नदी पात्रात विसर्जन झाल्याचे समजताच कुटुंबातील सदस्य संतप्त बनले. त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. हा प्रकार म्हापशातील तार विसर्जनस्थळी घडला.
मूळ पुणे येथील हे कुटूंब आपल्या दीड दिवशीय गणरायाचे विसर्जन करण्यासाठी म्हापसा नदीवरील तार विसर्जनस्थळी आले होते. म्हापसा येथील बहुतेक लोक दीड दिवस गणरायाचे पूजन करतात. मंगळवारी रात्री विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती होत्या. आरती झाल्यावर प्लॅटफॉर्मवर ठेवलेल्या गणेशमूर्ती तिथे तैनात असलेले जीवरक्षक तसेच भावीक विसर्जन करू लागले.
यावेळी हे कुटूंब मूर्ती विसर्जनासाठी आले. त्यांनी मूर्ती गाडीतून काढताच त्यांच्याकडे काहीजण धाऊन आले व मूर्ती घेऊन त्यांनी घाईगडबडीत थेट विसर्जन केले. तर हे कुटूंब आपल्या कार गाडीकडेच राहिले. काही मिनिटांनी विसर्जन प्लॅटफॉर्मरवर आले. तेव्हा मूर्ती तिथे नव्हती. मूर्ती नसल्याचे पाहून त्यांचा संताप अनावर झाला व तिथे त्यांनी रागाच्याभरात गोंधळ घातला. नंतर पोलीस तिथे आले. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. बुधवारी दुपारी पर्यंत या घटनेबध्दल या कुटुुंबाने तक्रार नोंदवली नव्हती.


