Home >> ताज्या बातम्या >> राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ

पावसाची २७ टक्के तूट अद्याप कायम : गावणे, आमठाणे धरणात ६० टक्क्यांहून अधिक साठा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 10:00 pm
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ

जून महिन्यातील विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पावसाची संततधार कायम असल्याने विविध धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. मागील काही दिवसांतील या दमदार पावसामुळे धरणांची पाणीपातळी समाधानकारक स्थितीत पोहोचली असून, पावसाचा हा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

चार दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ

यंदा राज्यात मान्सूनचे आगमन ५ जून रोजी झाले. सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे पुन्हा भरू लागली आहेत. चार दिवसांत गावणे धरणातील पाणीसाठा ६.८ टक्क्यांनी वाढून ३ जुलैअखेर ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, आमठाणे धरणातील पाणीसाठा ३० जून रोजीच्या ५५.९ टक्क्यांवरून वाढून ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

काणकोण तालुक्यात सर्वाधिक पाऊसयंदा काणकोण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चापोली धरणातील पाणीसाठा चार दिवसांत ३.७ टक्क्यांनी वाढून ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणातील पाणीसाठाही ३० जून रोजीच्या ३१.४ टक्क्यांवरून वाढून ३ जुलैअखेर ३५.६ टक्के झाला आहे. पंचवाडी धरणातील पाणीसाठा याच कालावधीत ७.२ टक्क्यांनी वाढून ३०.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अंजुणे आणि तिळारी धरणांची स्थिती

अंजुणे धरणातील पाणीसाठा ३० जून रोजी ११ टक्के होता. तो ३ जुलैअखेर वाढून १४.१ टक्के झाला आहे. तिळारी धरणातील पाणीसाठाही चार दिवसांत २.७ टक्क्यांनी वाढून ३१.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय राज्यातील इतर लहान-मोठ्या धरणांतील पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे.

वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी पडझड

शनिवारी राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या, तर काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. गेल्या २४ तासांत ०.९४ इंच पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ४ जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ३०.४० इंच पाऊस झाला असून, यंदाचा पाऊस अद्याप सरासरीपेक्षा २७.४ टक्क्यांनी कमी आहे.