नकार देण्यापेक्षा किंवा 'नाही' ऐकून घेण्यापेक्षा थेट खून करणे सोपे वाटते? भारतातील प्रेमप्रकरणांमधील वाढत्या हिंसेमागचं दाहक वास्तव आणि कोलमडते मानसिक स्वास्थ्य! वाचा विशेष रिपोर्ट

"प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है..." हे गाणं गुणगुणत प्रेमाच्या आणाभाका घेणारी तरुण पिढी आज त्याच प्रेमाचा गळा घोटायला मागेपुढे पाहत नाहीये, हे ऐकूनच अंगावर काटा येतो. पण, हे कोणत्याही सिनेमाचे कथानक नसून आपल्या समाजाचे अत्यंत कडू आणि विदारक सत्य आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) ताज्या आकडेवारीने या भीषण वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे. आजच्या घडीला भारतात होणाऱ्या एकूण खुनांच्या प्रकरणांमध्ये 'प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंध' हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण बनले आहे. देशात घडणाऱ्या दर १० खुनांमागे १ खून हे प्रेमातील फसवणूक, नकार, संशय किंवा विवाहबाह्य संबंधातून होत आहेत. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उरलेला नसून, आपली कौटुंबिक मूल्ये आणि तरुणांची मानसिक स्थिती कोणत्या थराला गेली आहे, याचा आरसा दाखवणारा एक गंभीर सामाजिक आजार बनला आहे.

नुकतेच पुण्यातून समोर आलेले केतन अग्रवाल हत्या प्रकरण याचे ताजे उदाहरण आहे. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने केतनचा काटा काढला आणि सुरुवातीला या हत्येला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसून तपास केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यापूर्वी मेरठमध्ये सौरभ राजपूतच्या पत्नीने मुस्कानने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गेम केला आणि त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकून त्यावर काँक्रीट ओतून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे, विरारमध्ये लग्नाला नकार दिला म्हणून एका मातेची आणि तिच्या मुलीची हत्या करण्यात आली, तर छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये केवळ इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले म्हणून एका २२ वर्षीय तरुणीने आपल्या २५ वर्षीय प्रियकराची चाकू खुपसून हत्या केली. या सर्व घटनांकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आजची तरुण पिढी नात्यातील नकार किंवा गुंतागुंत सोडवण्यासाठी संवादाऐवजी थेट हिंसेचा मार्ग निवडत आहे.

या वाढत्या गुन्हेगारीमागील भीषण सत्य समजून घेण्यासाठी गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी पाहणे अत्यंत आवश्यक आहे. २०२४ मध्ये देशभरात एकूण २७,०४९ खुनाच्या घटनांची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे, यातील तब्बल २,८०२ खुनांमागे थेट प्रेमप्रकरण किंवा अनैतिक संबंध हेच मुख्य कारण होते. जर आपण ऐतिहासिक आकडेवारीवर नजर टाकली, तर २०१० ते २०१४ या काळात एकूण खुनांमध्ये या कारणांचे प्रमाण ७ ते ८ टक्के इतके मर्यादित होते. मात्र, २०१६ नंतरच्या काळात एकूण गुन्ह्यांची संख्या कमी होत असतानाही, नात्यांमधील हिंसेचे हे प्रमाण वाढून थेट १० ते ११ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील प्रमुख १९ महानगरांमध्ये केवळ एका वर्षात अशा संबंधांतील वादातून १८७ खुनांच्या घटना समोर आल्या आहेत. यात राज्यांचा विचार केला तर ३१७ गुन्ह्यांसह बिहार अव्वल स्थानी आहे, तर उत्तर प्रदेश ३०३ गुन्ह्यांसह दुसऱ्या आणि महाराष्ट्र ३०२ गुन्ह्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेट्रो सिटीज आणि आधुनिक जीवनशैली असलेल्या राज्यांमध्ये हा आलेख वाढता असणे ही धोक्याची घंटा आहे.

प्रेमाची ही सुंदर भावना अचानक जीवघेणी कशी बनते, यावर जगभरात अनेक मानसशास्त्रीय अभ्यास झाले आहेत. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मानसशास्त्र संस्थेचे प्राध्यापक वेन क्वी चेन यांनी 'लव्ह मर्डर केसेस'च्या मानसशास्त्रीय घटकांवर एक मोठा अभ्यास केला होता. त्यांच्या विश्लेषणानुसार, नात्यांमध्ये प्रामुख्याने चार गोष्टी हिंसेला खतपाणी घालतात: ब्रेकअप, नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, विश्वासघात आणि नकार मिळणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नात्यात नकार मिळतो किंवा आपला जोडीदार दुसऱ्या कोणाचा तरी होत आहे असे जाणवते, तेव्हा समोरची व्यक्ती त्याला स्वतःची 'शत्रू' वाटू लागते. ब्रेकअप सहज स्वीकारण्याची क्षमता नसलेले लोक जुन्या किंवा नवीन जोडीदाराला संपवण्याचा कट रचतात. याला मानसोपचार तज्ज्ञ 'इमोशनल इमॅच्युरिटी' म्हणजेच भावनिक अपरिपक्वता म्हणतात. आजची पिढी तंत्रज्ञानाच्या युगात जगभरातील माहिती मिळवण्यात पुढे असली, तरी भावनांवर नियंत्रण ठेवण्यात आणि अपयश पचवण्यात प्रचंड अपयशी ठरत आहे.
![]()
या समस्येचे मूळ आपल्या कौटुंबिक संगोपनात आणि शिक्षण पद्धतीत दडलेले आहे, हे नाकारता येणार नाही. आजचे पालक आपल्या मुलांना अपयश, निराशा किंवा कठीण परिस्थितीपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मुलांच्या केवळ शैक्षणिक गुणांवर (मार्क्सवर) लक्ष केंद्रित केले जाते, पण त्यांचा भावनिक आणि सामाजिक गुणांक (EQ) सुधारण्याकडे सपशेल दुर्लक्ष होते. शाळांमध्येही केवळ उत्तम कॉलेज आणि पॅकेज मिळवून देणारे शिक्षण दिले जाते, परंतु नात्यांमधील मतभेद कसे हाताळावे, सहानुभूती (Empathy) काय असते आणि नैतिक निर्णय कसे घ्यावे, याचे धडे दिले जात नाहीत. परिणामी, जेव्हा ही मुले मोठी होतात आणि प्रेम, कौटुंबिक अपेक्षा किंवा सामाजिक प्रतिष्ठा यांमध्ये अडकतात, तेव्हा त्यांना परिस्थिती हाताळता येत नाही. घरातून मिळणाऱ्या दबावाला किंवा अपयशाला सामोरे जाण्याऐवजी ते गुन्हेगारीचा 'शॉर्टकट' निवडतात.
या सामाजिक चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आता पालकांनी आणि संपूर्ण समाजाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या लग्नाबाबत किंवा नात्यांबाबत स्वतःचाच शब्द अंतिम असण्याचा हट्ट सोडला पाहिजे. अनेक तरुण आपल्या पालकांना सत्य सांगायला घाबरतात आणि त्या भीतीपोटी चुकीचे पाऊल उचलतात. घरात मुलांशी संवाद असा असावा, जिथे ते भीतीशिवाय आपले मत मांडू शकतील. शाळा आणि महाविद्यालयांनी देखील केवळ पुस्तकी किडा न बनवता भावनिक बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे. तरुणांनी ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की, जगात कोणताही वाद, कौटुंबिक अडचण किंवा सामाजिक नाचक्की एका निष्पाप मानवी जिवापेक्षा मोठी असू शकत नाही. नकार स्वीकारणे हा पराभव नसून जीवनाचा एक भाग आहे, हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत प्रेमाचा हा रक्ताळलेला प्रवास थांबणार नाही.