सोनम आणि सरकार

सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी म्हणून ओळख असलेल्या सोनम वांगचुक यांना हिंसक आंदोलनानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होत आहे.

Story: वेध |
05th October, 12:06 am
सोनम आणि सरकार

सन २००९चा हा काळ. ‘थ्री इडियट्स’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. बोमन इराणीचा वीरू सहस्त्रबुद्धे, ओमी वैद्य यांनी चतुर रामालिंगम म्हणजे सायलेंसरची भूमिका साकारून धमाल उडवून दिली होती. यावेळी सर्वात लक्षात राहिला तो आमिर खानने साकारलेला ‘रणछोडदास शामलदास छांछड’ उर्फ रँचो उर्फ फुनसुख वांगडू हे पात्र आणि लढाखमधील डोंगररांगांमधील प्रयोगशील शाळेचा शेवटचा सीन... इथेच प्रेक्षकांना रँचो उर्फ फुनसुख वांगडू म्हणजेच ‘सोनम वांगचुक’ यांची पहिली ओळख झाली. त्यानंतर दीड दशक सोनम वांगचुक विविध रूपात, विविध भूमिका घेत भारतीयांसमोर येत राहिले. आता सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांना अटक केली असून, देशातील एक विशिष्ट वर्ग त्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी शक्ती पणाला लावत आहे. त्यामुळे खरा सोनम कोण याचा चेहरा देशासमोर आला पाहिजे.

सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९८८ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), श्रीनगर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पूर्ण केले. ते 'स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख' (SECMOL) चे संस्थापक आहेत आणि सौरऊर्जेचा वापर करून कॅम्पस डिझाइन करण्यात अग्रणी आहेत. त्यांनी ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख’ची स्थापना केली, तसेच १९९४ मध्ये सरकारी शाळा व्यवस्था सुधारण्यासाठी ‘ऑपरेशन न्यू होप’ सुरू केले. लडाखमधील पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये सुरू केलेला त्यांचा ‘बर्फ स्तूप’ (Ice Stupa) हा प्रकल्प खूप गाजला, ज्यात कृत्रिम हिमनदी तयार केली जाते. याशिवाय, त्यांनी २०२१ मध्ये भारतीय सैन्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे तंबू विकसित केले. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २०१८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लडाखचा लढा काय आहे?

सुमारे ६०,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला लडाख हा पर्वतराजीने नटलेला आणि चीनशी सीमा जोडलेला महत्त्वाचा प्रदेश आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० व ३५ (अ) हटवून जम्मू-काश्मीरचे विभाजन केले आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. या निर्णयामुळे लोकनियुक्त प्रतिनिधित्व संपुष्टात आले आणि केंद्राचा कारभार नायब राज्यपालांच्या अखत्यारित आला. या पार्श्वभूमीवर, लडाखवासीयांचे म्हणणे आहे की केंद्राने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे अ‍ॅपेक्स बॉडी लेह आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्यासह अनेक सामाजिक-राजकीय संघटना लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, राज्यघटनेचे सहावे परिशिष्ट लागू करणे, लोकसभेची आणखी एक जागा वाढवणे आणि लोकसेवा आयोगाची स्थापना करणे, या प्रमुख मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये बंदचे नेतृत्व केले आणि ६ मार्च रोजी लेहमध्ये कडाक्याच्या थंडीत शेकडो नागरिकांसह तब्बल २१ दिवस उपोषण केले. तसेच, १ सप्टेंबर रोजी त्यांनी 'चलो दिल्ली पदयात्रा' काढली, पण आंदोलकांना वाघा बॉर्डरवर अडवण्यात आले.

सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे, २४ सप्टेंबर रोजी लेह-लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारात जमावाने भाजपचे कार्यालय जाळले. सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले. या हिंसाचारप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, त्यांना राजस्थानमधील जोधपूर येथे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणे व जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारच्या तपास यंत्रणांकडून त्यांची संस्था SECMOL चा परकीय निधी परवाना रद्द करणे, संस्थेची जमीन परत घेणे आणि त्यांच्या मालमत्तेची सीबीआय व इन्कम टॅक्सद्वारे चौकशी करणे अशा कारवाया सुरू आहेत. तसेच, त्यांच्या पाकिस्तान व चीन दौऱ्यांचीही चौकशी सुरू आहे, मात्र त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप खोटे आणि बदनामीचे षडयंत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. सोनम वांगचुक यांचे हे प्रकरण आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, यावर जगभरातील प्रसारमाध्यमे आणि आंतरराष्ट्रीय संस्था लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणातील तपास यंत्रणा आणि न्यायसंस्थेची भूमिका निष्पक्ष असावी, अन्यथा देशाच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे.


अॅड. विवेक ठाकरे