सर्वोच्च न्यायालयाने फटकारले : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे निरीक्षण
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा कठोर शब्दांत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले. वकिलांनी त्यांच्या क्लायंटना दिलेल्या सल्ल्यांवरून त्यांना समन्स पाठवण्यात आल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी हे निरीक्षण नोंदवले.
सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांना स्पष्टपणे सांगितले की, आपल्याला काही मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे, हे असे चालू राहू शकत नाही.
ईडीने काही ज्येष्ठ वकिलांना केवळ त्यांच्या क्लायंटना दिलेल्या सल्ल्यावरून समन्स पाठवले होते. बार असोसिएशन्सनी यावर तीव्र आक्षेप नोंदवून सरन्यायाधीशांना पत्र लिहिले होते. या समन्समुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि वकिलांचा स्वतंत्रपणे काम करण्याचा हक्क धोक्यात येतो, असे या पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ वकिल अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना ईडीने समन्स पाठवले होते. नंतर ते मागे घेतले. पुढील वेळी वकिलांना समन्स पाठवायचा झाल्यास केवळ संचालकाच्या मंजुरीनंतरच तो पाठवला जाईल, असे ईडीने स्पष्ट केले. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली.
सरन्यायाधीशांच्या टीकेला उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, या प्रकरणामागे एक नियोजित प्रचार आहे. एका संस्थेविरुद्ध खोटी कहाणी उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांनी मान्य केले की, वकिलांना त्यांच्या कायदेशीर सल्ल्यामुळे समन्स पाठवता येत नाही.
लवकरच मार्गदर्शक तत्त्वे
कायदेशीर सल्ल्याच्या आधारावर वकिलांना त्रास देणे हा न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर हल्ला मानला जात असून, सर्वोच्च न्यायालय लवकरच या विषयावर मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याची शक्यता आहे.