ही कथा आहे गंगेची, जिचा बालविवाह झाला, पण पतीला कधी पाहिलं नाही. अकाली वैधव्य येऊनही, तिने समाजाचे टोमणे सहन करत पतीच्या अस्तित्वाचा शोध घेतला. रिकामं ताट आणि सासऱ्याचे अश्रू पाहून पतीनिधनाची सत्यता कळताच, तिने पतीप्रेमापोटी स्वतःला सरणावर समर्पित करत सतीत्व सिद्ध केलं. गंगेचा हा त्याग अखंड सौभाग्याची देवी म्हणून पूजनीय ठरला.
स्त्री म्हणजे जीवन, स्त्री म्हणजे समर्पण आणि स्त्री म्हणजे ते उदर जिथून समस्त सृष्टीची निर्मिती झाली आहे. स्वतः जन्मदात्री असूनही आपल्या जोडीदाराप्रती निस्सीम प्रेम आणि अपार आदर ठेवून वागणारी ही प्रति-देवी म्हणजेच स्त्री. याच प्रेमापोटी कधी सावित्री यमाकडून आपल्या सत्यवानाचे प्राण परत आणते, कधी सीता होऊन आपल्या प्राणप्रिय रामाच्या इभ्रतीला ठेच लागू नये म्हणून वनवासी होते आणि स्वतः लक्ष्मी असूनही पती चरणी बसून त्याची सेवा करणे परम कर्तव्य मानते.
म्हणूनच, सनातन संस्कृतीत स्त्री ही पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ मानली जाते. कारण स्वतः रिती होऊन दुसऱ्याचा कळस भरण्याचा त्याग फक्त तिच्याजवळच असतो. पूर्वीच्या काळी, तुमच्या-आमच्यामध्ये सर्वसामान्य वाटणारी स्त्री अशाच समर्पणाच्या भावनेने सती जायची आणि देवत्वाला पोहोचायची. अशाच एका देवीतुल्य सामान्य स्त्रीची ही ओवीरुपी कथा, कथा सती गंगेची.
एका गावात गंगा नावाच्या मुलीचे बालपणीच लग्न झाले. त्या काळी, मुला-मुलींचा बालविवाह झाला तरी, मुलगी उपवर झाल्याशिवाय सासरी पाठवली जात नसे. मुलीला नहाण (मासिक पाळी) आल्यावरच तिची सासरी पाठवणी केली जायची.
गंगा उपवर होण्यापूर्वीच, सैन्यात असलेल्या तिच्या पतीचा मृत्यू होतो. नवऱ्या मुलाच्या आई-वडिलांना आपल्या कोवळ्या सुनेला, गंगेला, सासरी आणून विधवेचे भोग तिच्या पदरात घालणे योग्य वाटले नाही. त्यामुळे ते आपल्या सुनेला तिच्या माहेरीच ठेवतात.
इकडे, गंगेचे आई-वडीलही या दुःखद घटनेची वार्ता तिच्यापासून लपवून ठेवतात. आपल्या नशिबी एवढे मोठे दुःख आले आहे याचा कोणताही थांगपत्ता नसलेली गंगा माहेरी आनंदाने जगत असते. काळानुरूप गंगा उपवर होते. तिला पतीभेटीची ओढ लागते, पण कोणीही तिची सासरी पाठवणी करत नाही.
एके दिवशी गंगा रोजच्यासारखी धुणे घेऊन नदीवर जाते. पावसाळ्याचे दिवस असतात. नदी दुथडी भरून वाहत असते. धुणे धुताना तिच्या पायाला मोळिया माशांच्या गुदगुल्या होतात. कधीतरी आईने सांगितलेले होते की ही नदी तिच्या सासरहुनच येते. आपल्या पायाला गुदगुल्या करणाऱ्या या मोळिया माशाकडूनच सासरची वार्ता जाणून घ्यावी म्हणून गंगा मोळिया माशाला विचारू लागते,
रामा मोळिया रे माशा
ते राज्य सुखी काय दुःखी
मोळिया माशा, ते राज्य म्हणजे माझे सासर सुखी आहे की दुःखी? असा प्रश्न ती मोळियाला करताच मोळिया तिला सांगतो,
हेर सगळे गे सुखी
तुजो कुंकू एक दुखी
त्या राज्यामध्ये सगळे सुखी आहे पण तुझा कुंकू तेवढं दुःखी आहे. अशाप्रकारे गंगा पुन्हा पुन्हा मोळिया माशाला विचारते की ते राज्य सुखी आहे की दुःखी? उत्तरा दाखल पुन्हा पुन्हा मोळिया मासा तिच्या वेगवेगळ्या सौभाग्य अलंकाराची नावे घेऊन तुझे मंगळसूत्र, जोडवी, मणी, हातातल्या बांगड्या इत्यादी सौभाग्य अलंकार दु:खी आहेत आणि इतर सर्वजण सुखी आहेत असे सांगतो. गंगा बेचैन होते आणि घरची वाट धरते.
गंगा घरा परतली
काढले बुटीभर लिंबू
गेली मथुरेचे पेठी
नेहमी कामात व्यस्त राहणारी गंगा आताही परसातले लिंबू काढून मथुरेच्या पेठी म्हणजे बाजारात ते लिंबू विकण्यासाठी जाते. तिथे बाजार करण्यासाठी आलेली बाई गंगाला लिंबाचा भाव विचारताच भोळी भाबडी गंगा एका आण्याला दोन लिंब असा भाव सांगते.
आगे गंगा तू बाई
हे गे आन्याला लिंबू किती
एक आन्याला दोन लिंबू
पण त्या कजाक बाईला हा भाव जास्त वाटल्याने फणकाऱ्याने गंगाला घालून पाडून बोलण्याच्या हेतूने ती म्हणते,
आगे गंगा नी गे बाई
तू गे आहेस मोठी जिवटी
सासऱ्याक शीरे गे लायसी
बापायचे घर गे करशी
गंगा तू मोठी जिवटी म्हणजे कंजूस आहेस. इथे बापाच्या घरी राहून बापाचा संसार करीत आहे आणि सासरच्या घराला मात्र शिरा लावली आहे. (शिरा लावणे म्हणजे भरून न येणारे नुकसान करणे) त्या कजाक बाईच्या या काटेरी बोलण्याने गंगा दु:खी, कष्टी होते. निमुटपणे आपल्या घरी येते. आपल्या वडिलांना सांगते, की तुम्ही काही माझी पाठवणी करीत नाही. मी अशी किती दिवस माहेरी पडून राहणार? आता लोकही मला टोचून बोलू लागले आहेत. तेव्हा, बाप्पा मी माझ्या सासरी जात आहे. तेच माझे घर आहे.
कधीही सासर न पाहिलेली गंगा आपल्या नवऱ्याच्या आणि सासरच्या ओढीने एकटीच सासरी परतते. लाख अडवू पाहणाऱ्या आपल्या प्रेमळ पित्याला पाठ करून गंगा सासरी परतते. अशी अचानक घरी आल्याने दयाळू सासऱ्याच्या पोटातही खड्डा पडतो. सासरी पहिल्यांदा येऊन सुद्धा गंगा सराईतपणे स्वयंपाकाला लागते.
गंगा सासऱ्याक गेली
लायली ऊपर माळी शिडी
काडल्यो साळी आणि डाळी
केले पंचपकवान
गंगा स्वतःच्या हाताने पंचपक्वानाचा स्वयंपाक करते. सासरे, पाच दीर आणि आपला नवरा अशी एकूण सात ताटे ती मांडते आणि सासऱ्यांना तसेच इतर सर्वांना जेवायला बोलावते. पण अजूनही तिचा नवरा तिच्या दृष्टीस पडत नाही
ती काय सांगून लागली
मामा जेवायला बसा
केली सात नी गे ताटा
भरली सय नी गे ताटा
मामा सय नी गे आहे
सातवे ताट गेले खय
मामान वालो डोळ्याक लायलो
आपल्या सुनेने सात ताटे वाढलेली आहेत हे पाहून दयाळू सासरा आपले दुःख पाण्याच्या घोटाने गिळतो. गंगा सुनेचे मन राखण्यासाठी आपले दुःख बाजूला ठेवून सर्वजण आपापल्या ताटावर बसतात पण सातवे ताट मात्र रिकामीच राहते. निष्पाप कोवळी गंगा सासर्याला विचारते, “मामंजी सहाही ताटे भरली पण सातव्या ताटावर बसणारा म्हणजेच माझा पती अजून मला दिसला नाही. तो कुठे बरं आहे?” हा प्रश्न ऐकताच इतका वेळ आपले दुःख दाबून धरलेल्या सासऱ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. सासरा खांद्यावरचा वालो म्हणजेच शेला आपल्या डोळ्यांना लावतो.
सासऱ्याच्या या प्रतिक्रियेचा अर्थ गंगा अचूक समजून जाते. पण आपल्यापेक्षा नेहमीच दुसऱ्याचा विचार करणारी आणि आपल्या पतीवरही निस्सीम प्रेम करणारी स्त्री. त्या स्त्रीचे प्रतीक म्हणजे गंगा. आपली सासरची मंडळी भरल्या ताटावर आहे त्यांच्यासमोर आपले दुःख व्यक्त करून बसलेली पंगत उधळून लावणे तिला प्रशस्त वाटेना. मोठ्या कष्टाने ती आपले पाचही दिर आणि सासरा यांना जेवण वाढते. एका सुनेचे कर्तव्य ती काही क्षण का होईना, पण नीट करते. आता तिला पत्नी असण्याच्या कर्तव्याला जगायचे होते.
आपल्या मनोमन पूजा केलेल्या पतीवर तिचे खरे प्रेम असते. त्याच्या निधनाने त्या दोघांमध्ये आलेला विरह तिला सहन न होण्याजोगा असतो म्हणून ती एक ठाम निश्चय करून नदीकाठी जाते.
गेली न्हयचे धडीक
तिएन लाकडा लागी केली
तेनी सरान गे डाळीला
सरनाक आग गे लायली
सरान पेटला धडाधड
गांगन सरनात उडी गे मारली
गंगा नदीच्या काठी जाऊन स्वतःचे सरण मांडते. त्या सरणाला अग्नी देते. मनोमन आपल्या मेलेल्या नवऱ्याची आठवण करत गंगा सरणात उडी घेते. गंगा सती जाते कधीही न पाहिलेल्या पतीसाठी. गंगा सती जाते आपल्या उभ्या आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांना घेऊन. गंगा सती जाते आपला संसार सरणाच्या आगीत समर्पित करून. गंगा शरीराने सती जाते आणि उभ्या गावासाठी अखंड सौभाग्य देणारी देवी सती या नावाने पूजनीय होते
इथे गंगारुपी सती हे नाव केवळ एका व्यक्तीचे नसून, ते समस्त स्त्रीजातीचे प्रतीक आहे. हे नाव त्या प्रत्येक स्त्रीचे आहे जिने आपल्या जोडीदारावर निस्सीम प्रेम केले आहे, जिने आपल्या पतीच्या पश्चात एकाकी आयुष्य जगण्याचे नाकारले आहे. हे नाव सवाष्णींना धीर देणाऱ्या एका देवीचे आहे, जी आजही कित्येक घरांमध्ये प्रेरणास्रोत आहे.
ओव्या म्हणजे स्त्रीच्या अंतरंगाचे खरे प्रतिबिंबच. तिच्या कथा, तिच्या व्यथा या ओव्यांनी वर्षानुवर्षे जपल्या आहेत. त्या गीतबद्ध होऊन पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत गेल्या, ज्यामुळे अनेक अदृश्य गोष्टींना शब्द मिळाले. या ओव्या केवळ काल्पनिक नसून, त्यांना कुठेतरी वास्तवाचा स्पर्श असतो हे नक्की. स्त्रीवर घडलेल्या प्रसंगांचे वर्णन करण्यासाठी, प्रतिभेचे वरदान लाभलेल्या स्त्रियांनीच या ओव्या आपल्या ओटीत साठवल्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी जतन केल्या.
गाैतमी चाेर्लेकर गावस