व्यसनाधीनतेच्या गर्तेत सापडलेल्या तेजसने एका अपघातानंतर स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेतला. वडिलांचा विश्वास पुन्हा जिंकण्यापासून ते एका नव्या वाचनालयातील मैत्रीपर्यंत आणि मग गावातील मुलांचा 'तेजस सर' बनण्यापर्यंतचा त्याचा हा प्रेरणादायी प्रवास...
पहारा गावातल्या एका जुनाट वाड्यात राहणारा तेजस, तीसच्या उंबरठ्यावर पोहोचलेला, पण अजूनही स्वतःच्या सावलीत हरवलेला एक युवक. त्याच्या चेहऱ्यावर एक थकवा असायचा. आयुष्यातल्या सततच्या चुका आणि त्यातून झालेल्या आत्मग्लानीचं बोचतं ओझं. कॉलेजमध्ये हुशार असूनही त्याचं आयुष्य कुठे भरकटलं हे त्यालाही कळलं नाही. एकेक करून मैत्री दूर गेली, घरच्यांचा विश्वास उडाला आणि त्यानेच स्वतःला अंधारात लोटून दिलं.
तेजसचं आयुष्य चुकांचं असं एक जिवंत प्रदर्शन होतं. कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या दबावाखाली येऊन तो अनेक चुकीचे निर्णय घेत गेला. सुरुवातीला सिगरेट, मग मद्यपान आणि हळूहळू व्यसनाधीनतेकडे वाटचाल. अभ्यास बाजूला पडला, नातेसंबंध बिघडले. त्याच्या आईने खूप वेळा समजावलं, रडून सांगितलं, पण तेजसच्या आत्मसन्मानाच्या कवचाला तिच्या शब्दांनी जणू काही ठेचच पोहोचली नाही.
एका रात्री, भरधाव दुचाकीवरून चाललेला तेजस अपघातात सापडला. सुदैवाने जीव वाचला, पण पायाला गंभीर इजा झाली. दीड महिना हॉस्पिटलमध्ये. त्या गडद रात्रीत, जेव्हा तो अंथरुणावर खिळला होता, तेव्हाच त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न उभे राहिले “माझं आयुष्य खरंच असंच संपणार का? चुका हेच माझं ओळखचिन्ह राहणार का?”
हळूहळू त्याच्या मनात एक नवा अंकुर फुटू लागला. तो मनाशी म्हणाला, “जर चुका माझं आयुष्य बिघडवू शकतात, तर सुधारणा ते घडवूही शकते." अशा विचारांनी तो आपल्या चुकांचा मागोवा घेऊ लागला. त्याने स्वतःला क्षमा केली आणि स्वतःला सुधारायचा निर्णय घेतला. ही सुरुवात होती, चुकांच्या छायेतून उजेडाकडे जाण्याची.
तेजसने सर्वात आधी आपली व्यसनं सोडण्याचा निश्चय केला. सुरुवातीचे काही दिवस फारच अवघड होते. शरीर थरथरत असे, मन बेचैन होई. पण त्याने धीर धरला. वडिलांची त्याने माफी मागितली. आधी वडील शांत होते, पण नंतर त्याच्या डोळ्यातली पश्चात्तापाची निळसर ज्योत पाहून त्यांना काहीच बोलता आलं नाही. त्यांनी फक्त त्याला घट्ट मिठी मारली.
तेजसने आपल्या जुन्या मित्रांपासून अंतर घेतलं आणि गावातल्या वाचनालयात रोजचा वेळ घालवायला सुरुवात केली. तो पुन्हा एकदा पुस्तकांच्या जगात हरवू लागला. एकदा वाचनालयात त्याची ओळख झाली स्वरा नावाच्या एका तरुणीशी. तिचं बोलणं साधं, पण विचार खूप खोल. ती गावातल्या मुलांसाठी शिकवणी चालवत होती. तेजसने तिला मदतीचं सुचवलं आणि तिथून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली.
स्वराशी संवाद साधताना, तेजस अनेक गोष्टी नव्यानं पाहायला शिकला. तिचं आयुष्यही सोपं नव्हतं. पण तिने चुकांमध्ये गढून न राहता त्यातून उभं राहणं निवडलं होतं. तिने तेजसला सांगितलं, "भूतकाळाच्या जखमा तुझं आयुष्य ठरवू शकत नाहीत, त्या फक्त तुला शिकवू शकतात."
काही महिन्यांनी तेजसने गावातल्या शाळेत स्वयंसेवक शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याला शिक्षणाची आवड होतीच, पण यावेळी तो त्याच्या स्वतःच्या अनुभवाचा उपयोग करायचं ठरवत होता. त्याने मुलांना फक्त गणित किंवा भाषा शिकवली नाही, तर त्यांना जीवनाचं एक तत्त्व शिकवलं. 'चुका घडतात, पण त्यांचं रूपांतर शहाणपणात करता येतं.'
त्याच्या शिक्षणशैलीमुळे विद्यार्थी त्याला ‘तेजस सर’ म्हणून खूप मानायला लागले. पालकही त्याचं कौतुक करू लागले. गावातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्या कामाची दखल घेतली आणि त्याला एका तरुणांसाठी चालवल्या जाणाऱ्या शिबिरात मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित केलं. हे त्याच्यासाठी मोठं पाऊल होतं.जो तेजस कधीकाळी व्यसनाच्या गर्तेत हरवला होता, तोच आता नव्या पिढीला प्रेरणा देत होता.
त्या दिवशी शिबिरात त्याने दिलेली एक छोटेसे पण प्रखर भाषण अतिशय प्रभावी ठरले. “मित्रांनो, माझ्या चुकांमुळे मी खूप काही गमावलं. पण एक गोष्ट शिकलो. अंधार कितीही गडद असो, जर मनात खऱ्या परिवर्तनाची इच्छा असेल, तर आशेचा एक प्रकाशकिरण तुम्हाला नक्कीच सापडतो.” हे ऐकून युवकांच्या डोळ्यात चमक निर्माण झाली. काही जण त्याच्याकडे आले, त्यांचं आयुष्यही भरकटलं होतं, पण आता त्यांना दिशा मिळत होती.
तेजसचं आयुष्य आता एका नव्या प्रवासात होतं. त्याने गावात एक छोटं अभ्यासिकासदृश केंद्र सुरू केलं, जिथे तो दिवसभर विद्यार्थ्यांना शिकवायचा आणि संध्याकाळी तरुणांसोबत संवाद साधायचा. त्या केंद्राचं नाव त्याने ठेवलं “उजेडाकडे”. गावातल्या वृद्ध लोकांपासून तरुणांपर्यंत, प्रत्येकाच्या मनात तेजसविषयी आदराचे स्थान निर्माण झाले. गावातली जणू एक नवी आशेची ज्योत पेटली होती. त्याचा प्रवास, त्याची परतफेड ही केवळ त्याचीच नव्हे, तर संपूर्ण गावाची प्रेरणा बनली.
एक दिवस, एका विद्यार्थ्याने त्याला विचारलं, “सर, तुम्हाला तुमच्या त्या जुन्या चुकांची आता आठवण येते का?” तेजस हसला, आणि म्हणाला, “हो रे, येते. पण आता त्या मला झाकून टाकत नाहीत. उलट त्या मला उभं राहायला शिकवतात. त्या सावल्या आता प्रकाशाची जाणीव करून देतात. त्या चुकांच्याच छायेतून तर मी उजेडाकडे आलो ना!”
तेजसची ही कथा केवळ एका युवकाचा आत्मशोध नाही, ती आहे सर्वसामान्य माणसाच्या असामान्य होण्याची प्रेरणादायी वाटचाल. चुका माणसाच्या आयुष्याचा भाग असतात. पण त्या चुकांमध्ये अडकून न राहता, त्या स्वीकारून, त्यांच्यावर मात करत स्वतःला नव्यानं घडवणं, हीच खरी यशाची वाट आहे.
तेजसने ती वाट चालून दाखवली. त्याचं ‘उजेडाकडे’ हे केंद्र आणि त्याचा आत्मशोध गावातील तरुणांसाठी एक प्रकाशस्तंभ ठरला. कारण..."प्रत्येक सावलीच्या पलीकडे एक उजेड असतो आणि तो शोधण्याचं धैर्य हीच खरी क्रांती असते!"
सिध्दी ह. धारगळकर
पेडणे