डास: निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग?

पावसाळा सुरू होताच डासांचा उपद्रव वाढतो आणि अनेकांना प्रश्न पडतो की हे जीव कशासाठी आहेत. डासांची परिसंस्थेतील भूमिका, ते कोणाला चावतात आणि त्यांच्यापासून नैसर्गिकरीत्या संरक्षण कसे करावे?

Story: साद निसर्गाची |
21st June, 11:22 pm
डास: निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग?

वर्षाऋतूला सुरुवात होताच सगळ्यांची जास्त चिडचिड व्हायला लागते ती डासांमुळे. संध्याकाळची थंडगार हवा व टिपटिप पावसाचा आनंद लुटण्यासाठी जरा कुठे खिडकी/दरवाजा उघडा ठेवला की लगेचच डासांची टोळी कानाजवळ गुणगुणायला लागली म्हणून समजा. पावसाळ्यात मस्त धबधब्यावर मजा करण्यासाठी किंवा जंगलात निसर्ग भ्रमंतीसाठी गेलो, तर तिथेही डासांची टोळी हजर असते. मग अनेकदा डासांना पिटाळताना एखाद्याचा 'देवाने ह्या डासांना का जन्माला घातले कुणास ठाऊक' असाही चिडका सूर लागतो. काहींना तर असं वाटतं की डास फक्त त्यांनाच चावतात. 'दहा जणांच्या घोळक्यात असताना डास नेमके येऊन फक्त मलाच का चावतात?' यावरूनही अनेकांची चिडचिड होते. खरंच डास एखाद्या विशिष्ट माणसाला निशाणा बनवू शकतो का? की हा फक्त त्या माणसाचा भ्रम असतो? मानवाकडून सतत तुच्छ लेखल्या जाणाऱ्या ह्या वन्यजीवाची परिसंस्थेत काही भूमिका असते का? की खरंच माणसांना वाटतं तसं ईश्वराने ह्या वन्यजीवाला फक्त आपल्याला छळण्यासाठीच जन्माला घातला आहे? आज आपण या निरुपयोगी वाटणाऱ्या डासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

जगभरात डासांच्या ३५०० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. डासांमध्ये फक्त मादीच चावते, नर डास चावत नाहीत. विणीच्या हंगामात मादी डासाला प्रथिनांची (प्रोटीन) गरज भासते. अंडी विकसित होण्यासाठी प्रथिने, विशेषतः रक्तातील प्रथिने आवश्यक असतात. एरवी नर आणि मादी डास फुलांचा रस आणि इतर कर्बोदक (कार्बोहायड्रेट्स) खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र पुनरुत्पादनासाठी मादीला रक्तातील प्रथिनांची गरज भासते. म्हणूनच फक्त मादी आपला चावा घेते.

पावसाळा सुरू होताच आपल्याला चोहोबाजूंनी जी मन प्रसन्न करणारी गवताची हिरवीगार चादर पाहायला मिळते, ती या डासांचीच देण आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. गवताच्या बियांचा प्रसार करणे हे डासांचे मुख्य काम. बरं मग ते सारखे गुणगुणत का असतात? त्यामागचे कारण काय? विणीच्या हंगामात जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी डास गुणगुणतात. कदाचित ही त्यांची सांकेतिक भाषा असावी.

डास गडद रंगाला जास्त आकर्षित होत असतात. डास आणि कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनाचा दाट संबंध आहे. गतीने कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित करणाऱ्या व्यक्तीला जास्त डास चावतात. म्हणूनच इतरांना वगळून अनेकांच्या घोळक्यात असलेल्या एखाद्याला सगळ्यात आधी डास चावतो.

डास नेहमी साठलेल्या पाण्यात अंडी घालतात. पाण्यातील जीवसृष्टी जसे मासे, हे सूक्ष्मजीवाच्या अळ्या खाऊनच मोठे होतात. डास हे विविध वटवाघळे, किडे व पक्षांचेही खाद्य आहेत. डासांना उबदार, दमट हवामान आवडते. वाळवंट, बर्फ किंवा थंडीच्या ठिकाणी तुम्हाला जास्त डास दिसणार नाहीत. जगातील डास नष्ट झाल्यास गवताचे परागीकरण होणार नाही. परागीकरण न झाल्यास हिरवळ नष्ट होईल. परिणामी, गवताच्या बिया खाऊन जगणारे वन्यजीवही नष्ट होतील. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे डास नष्ट झाल्यास निसर्गाचा समतोल बिघडेल.

एखादा डास कानाजवळ गुणगुणायला लागला की आपण पटकन चिडतो व त्याला चटकन मारून टाकतो. तुम्ही विचाराल, मग काय? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी डासांना जीवदान देऊ? व विविध रोग पसरवण्यासाठी डासांना रान मोकळं करू? तर नाही. घरात डास आल्यास स्वसंरक्षणासाठी त्यांना मारणे अनिवार्य आहे. पण आपण त्यांना आपल्या घरात शिरूच नाही दिलं तर? मारायची गरजच नाही भासणार. नाही का? परंतु याचा अर्थ डास प्रतिबंधक (मॉस्किटो रिपेलंट) औषधांचा वापर करा असाही होत नाही. बहुतेक वेळा आपण डासांपासून संरक्षण देणाऱ्या अनेक डास प्रतिबंधक औषधांचा जसे कॉइल, इलेक्ट्रिक गॅजेट्स, क्रीम, द्रव्यांचा सर्रास वापर करत असतो. पण ही औषधे आपल्या आरोग्यासाठी किती घातक असतात हे तुम्हाला माहीत आहे का? या औषधांमुळे श्वसनाच्या समस्या, त्वचेला खाज येणे, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, न्यूरोलॉजिकल व हार्मोनल सिस्टमवर दीर्घकालीन परिणाम यांसारख्या समस्या उद्भवू 

शकतात. तर मग डासांना न मारता घालवायचं कसं? नैसर्गिकरीत्या!

डासाला पृथ्वीवरील सर्वात प्राणघातक जीवांपैकी एक म्हणून ओळखले जाते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार जडू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात दरवर्षी मलेरियाचे १.५ कोटी रुग्ण आढळतात, पैकी १९,५००-२०,००० लोक मृत्युमुखी पडतात. साठलेलं पाणी/डबकं ही डासांची सर्वात आवडती जागा आहे. दारे, खिडक्यांना जाळी लावून किंवा मच्छरदाणीचा वापर करून आपण डासांना घरात येण्यापासून रोखू शकतो. पाणी साठेल अशा वस्तू जसे नारळाचे लखोटे, वाहनांचे विनावापरात असलेले टायर, घराच्या आजूबाजूला फेकून दिलेली भांडी पालटून ठेवावीत. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. वाटल्यास डास प्रतिबंधक फवारणी करावी. विहीर किंवा तलाव असल्यास त्यात गप्पी मासे पाळावेत. ग्रामीण भागात नारळाचे लखोटे, शेंडू, कवचं वापरून धुरी घातली जाते. सिट्रोनिलाच्या पानांची धुरी हा सुद्धा नैसर्गिकरीत्या डास पळवण्याचा एक उत्तम उपाय आहे. धुरीमुळे डास जरी मरत नसले तरी दूर नक्कीच पळून जातात.

या ईश्वरनिर्मित सृष्टीत परमेश्वराने निसर्गाची व्यवस्थित घडी बसवून प्रत्येकासाठी विशिष्ट अशी जागा राखून ठेवली आहे. या जागा विनाकारण बनवलेल्या नसून त्यामागे एक विशिष्ट असा हेतू आहे; तो म्हणजे 'निसर्गाचा समतोल राखण्याचा'. मी तर म्हणेन की तुम्ही निसर्गासाठी काहीही करू नका. तुम्ही झाडे नाही लावली तरी चालेल, फक्त तुम्ही ती तोडू नका. नदी, ओहोळ, समुद्र स्वतःला स्वच्छच ठेवतात, तुम्ही फक्त त्यांना घाण करू नका. तुम्ही फक्त त्यात कचरा टाकू नका. निसर्ग आपला समतोल स्वतः राखू शकतो, तुम्ही फक्त तो बिघडवू नका. या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव ईश्वराने आखून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे, तुम्ही फक्त त्यात लुडबुड करू नका.

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)


- स्त्रिग्धरा नाईक