बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक माध्यमांची चमक फिकी पडताना दिसते. पण, आजही ग्रामीण भारतात एक माध्यम आपले स्थान टिकवून आहे - तो म्हणजे रेडिओ. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका गावात आजही प्रत्येक घरात रेडिओ का आहे आणि रेडिओची वाढती लोकप्रियता कशी टिकून आहे, याचा वेध घेणारा हा एक रंजक लेख.
बदलत्या काळानुसार रेडिओची लोकप्रियता कमी होऊ लागली, पण उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये एक असे गाव आहे, जिथे आजही प्रत्येक घरात रेडिओ आहे. ही वस्तुस्थिती आहे, कारण येथे महिला घरी शिवणकाम करतात आणि त्याच वेळी रेडिओ ऐकतात. रेडिओवरील गाणी, संवाद, बातम्या व इतर कार्यक्रम या महिला ऐकत आपले काम करतात. त्यांना अचूक वेळही कळते. शहराला लागून असलेल्या काशीपूर अंगा गावात सुमारे पाचशे रेडिओ आहेत. यावरून या मुलुखात रेडिओ किती लोकप्रिय आहे याची प्रचिती येते. ग्रामीण भागातच रेडिओची लोकप्रियता जास्त आहे, हे खरं.
रामपूरमध्ये एक आकाशवाणी केंद्र देखील आहे, ज्याच्या स्थापनेत नवाब घराण्याचे मोठे योगदान आहे. जेव्हा रामपूर संस्थान विलीन झाले, तेव्हा नवाब रझा अली खान यांनी भारत सरकारसमोर अनेक अटी ठेवल्या होत्या. यातील एक अट अशी होती की रामपूरमध्ये एक रेडिओ स्टेशन स्थापन करावे. खरं तर, त्यांना कला आणि संगीताची खूप आवड होती. त्यांच्या दरबारात अनेक संगीतकार होते. संस्थान विलीन झाल्यानंतर या संगीतकारांचे भविष्य काय असेल, या चिंतेमुळे त्यांनी ही अट घातली होती. सरकारने त्यांची अट मान्य केली आणि रामपूरमध्ये आकाशवाणी केंद्र स्थापन केले. रामपूर आकाशवाणी केंद्रातून अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या कार्यक्रमात विविधता होती, दर्जा होता.
आकाशवाणी रामपूर केंद्राच्या अध्यक्षा मनदीप कौर म्हणतात की, पंतप्रधानांनी रेडिओवर 'मन की बात' कार्यक्रम सुरू केल्यापासून लोकांचा रेडिओकडे कल वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत, विनंती पत्रे येण्यास सुरुवात झाली आहे. दररोज शंभराहून अधिक पत्रे येत आहेत. यावरून लोक रेडिओ किती बारकाईने ऐकतात हे समजतं. सध्या रामपूर आकाशवाणी केंद्राचे 'हॅलो रामपूर', 'हॅलो फरमाईश', 'बात आपकी गीत हमारे' हे कार्यक्रम लोकांना आवडत आहेत. शेतकऱ्यांसाठी 'लोक मंजरी' कार्यक्रम आहे, त्यात रागिणी, लोकगीते वाजवली जातात. रेडिओवर आता 'न्यूज ऑन एअर' अॅप आहे. ते मोबाईलवर डाउनलोड करून, आकाशवाणी कार्यक्रम देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ऐकता येतात. युवांसाठी 'युवावाणी', तरुणांसाठी 'हॅलो फ्रेंड्स' कार्यक्रम आणि महिलांसाठी 'हॅलो सहेली' कार्यक्रम आहेत. यामुळे रेडिओचे कव्हरेज वाढत आहे.
रेडिओ केवळ भारतातच नाही, तर जगभरात महत्त्वाचा राहिला आहे. म्हणूनच दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो. या दिवशी आकाशवाणी केंद्रांवरून अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात. रामपूर आकाशवाणी केंद्रातून एक विशेष कार्यक्रम देखील प्रसारित केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. काशीपूर अंगा गावात अनेक महिला विविध काम करतात. त्यासोबतच त्या रेडिओ देखील ऐकतात. येथील प्रत्येक घरात एक रेडिओ आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठीही खास कार्यक्रम असतात. रेडिओ प्रबोधन करतो, शिक्षण देतो या मुद्द्याला यावरून पुष्टी मिळते. 'मेरा स्कूल लाईव्ह' या एका कार्यक्रमात कोरोना काळात घरी राहिलेल्या मुलांचे अनुभव शेअर करण्यात आले होते. मुलांसाठी इतरही कार्यक्रम असतात, त्यात मुलांना समाविष्ट करून घेतात हे विशेष.
भारतात तसेच जगातील इतर प्रांतात ग्रामीण भागात रेडिओ जास्त ऐकला जातो. दृकश्राव्य माध्यमांपेक्षा ते माध्यम गडद व किंचित भडक म्हणजे 'गॉडी' असल्याने लोक रेडिओ ऐकणे पसंत करत आहेत. दुसरी गोष्ट, मोबाईलवर कसलीही खरखर नसताना तो स्पष्टपणे व सोपेपणी ऐकता येतो, यामुळे रेडिओची लोकप्रियता काही गावांमध्ये बिलकुल कमी झालेली नाही. उलट रामपूरसारख्या मुलुखात ती वाढली आहे.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)