पणजी : पणजी महानगरपालिकेच्या प्रभाग फेररचनेसंदर्भात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याबाबतचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. भारती डांगरे आणि निवेदिता मेहता या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे.
या प्रकरणी मिनिनो डिक्रुझ यांनी याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग, नगरपालिका प्रशासन आणि पणजी महानगरपालिका यांना प्रतिवादी केले. या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. पणजी महानगरपालिका प्रभाग फेररचनेची प्रक्रिया राज्य सरकारने नगरपालिका प्रशासनाकडे दिली आहे. याचिकादाराने त्याला विरोध करून प्रभाग फेररचनेत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होणार असल्याचा दावा केला. तसेच फेररचनेची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडे वर्ग करण्यात यावी अशी मागणी केली .
प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगातर्फे व्हावी असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे ही प्रक्रिया नगरपालिका प्रशासन किंवा इतर कुठल्याही प्राधिकरणाकडे वर्ग करता येते. अशीच याचिका पंचायत प्रभाग फेररचनेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निवाडा देत याचिका फेटाळून लावल्याचा संदर्भ सरकारने दिला. या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पणजी महानगरपालिकेच्या प्रभाग फेररचनेबाबतची याचिका फेटाळून लावली आहे.