राज्यपाल पिल्लई यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टीतून मिळालेल्या निधीचा 'अन्नधन' योजनेसाठी वापर
पणजी, गोवन वार्ता प्रतिनिधी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे केवळ औपचारिकतेपुरते राज्यपाल न राहता, जनतेत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या निरीक्षणातून सरकार किंवा प्रशासनातील काही उणिवा समोर आल्यास त्या दूर करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
राजभवनात रविवारी झालेल्या विशेष कार्यक्रमात ‘अन्नधन’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून कर्करोग व डायलिसिस रुग्णांना मदत पुरवण्यात आली. मुख्यमंत्री सावंत, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, व अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांनी विविध मंदिरे, संस्था आणि जनतेच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेली रॉयल्टी त्यांनी अन्नदानासाठी वापरण्याचा निर्णय घेतला असून, हे कार्य प्रेरणादायी आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
राज्यपाल पिल्लई यांनी इतिहास व मंदिरे यांवर आधारित विविध भाषांत पुस्तके लिहिली असून गोव्यातील मंदिरांचाही त्यात समावेश आहे. या पुस्तकांच्या रॉयल्टीतून मिळालेली रक्कम त्यांनी ‘अन्नधन’ योजनेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिने हा निधी पुरेल, त्यानंतर गोवा सरकारने ही योजना पुढे नेण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, असेही त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
राज्यपाल जनतेचे हवेत : आर्लेकर
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले, राज्यपाल हे केवळ राजभवनापुरते मर्यादित असता कामा नयेत, तर ते जनतेचे हवेत. राज्यपाल पिल्लई हे प्रत्यक्षात जनतेत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर राज्यपालही घेतात, असेही आर्लेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य समस्यांकडेही लक्ष वेधले. राज्यात कर्करोग व डायलिसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी जीवनशैलीत योग्य आहार व शारीरिक शिस्त पाळणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले.