पणजी/ नवी दिल्ली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सावंत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान राज्यात होणाऱ्या संभाव्य राजकीय बदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
आरोग्यमंत्री राणे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.ते आपल्या खात्याशी संबंधित कामासाठी दिल्लीला गेले आहेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान दुपारी मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याशीही चर्चा केली. गोव्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी त्यांनी एपीडा (APEDA) कार्यालय गोव्यात स्थापन करण्याची मागणी केली. या निर्णयामुळे फळे, भाजीपाला आणि मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर निर्णय लांबणीवर?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात यासंदर्भात मतभेद असल्याचे बोलले जात आहे. जर लवकरच सहमती झाली नाही, तर हा निर्णय थेट बिहार विधानसभा निवडणुकांनंतर घेतला जाऊ शकतो. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या बदलाची शक्यता आहे. जातीय समीकरण, नेतृत्व क्षमता आणि स्थानिक राजकारण लक्षात घेता योग्य चेहऱ्यांची निवड केली जाणार आहे. संघाची भूमिका स्पष्ट असून, असा अध्यक्ष हवा आहे जो सरकार आणि संघटनेत समन्वय साधून संघटनात्मक बळकटीला प्राधान्य देईल. या सर्व हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत भाजपच्या नेतृत्वात निर्णायक बदल होण्याची शक्यता आहे.