गोव्याचा महिला नाट्यगट: रंगमंचावर नवा व्यावसायिक इतिहास!

आजच्या धकाधकीच्या जीवनात, जिथे माणसाला माणसासाठी वेळ नाही, तिथे नाटकासारख्या कलेसाठी वेळ काढणं, विशेषतः महिला वर्गाकडून, हे खरंच कौतुकास्पद आहे. घर, नोकरी सांभाळून नाटकासाठी वेळ देणं म्हणजे तारेवरची कसरतच. पण महिला आता केवळ चूल आणि मूल या पारंपरिक चौकटीबाहेर पडून खूप काही करू शकतात, हेच यातून सिद्ध होत आहे.

Story: विशेष |
27th June, 10:13 pm
गोव्याचा महिला  नाट्यगट: रंगमंचावर  नवा व्यावसायिक इतिहास!

रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी, रवींद्र भवन, साखळी येथे म्हात्राई काळभैरव महिला नाट्य मंडळ, लामगाव, डिचोली यांच्या वतीने असाच एक यशस्वी नाट्यप्रयोग सादर झाला. महेश चंद्रकांत नाईक लिखित आणि नितीन शिवराम नाईक दिग्दर्शित 'आणि शाळा बुडली' या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग झाला. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये याच संस्थेने 'आस्थ बाळगिता बाळगिता' या नाटकाचे दोन हाऊसफुल प्रयोग करून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

लेखक श्री. महेश नाईक यांनी खरोखरच विचार करायला लावणारा आणि मन हेलावून टाकणारा विषय निवडून आम्हा सर्वांना जणू झोपेतून जागे केले. सर्व महिला कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कुठेही न घाबरता, न डगमगता त्यांनी रंगमंच गाजवला. ख्रिश्चन भाषा अगदी हुबेहूब बोलली गेली, तर बिहारी पात्र अप्रतिम होते. भूताला पाहून रात्री झोप येईल की नाही याची चिंता होती, इतकं ते पात्र प्रभावी होतं. बालकलाकारांनी तर 'येरे येरे पावसा'च्या सुरात सर्वांची मनं जिंकली. वेशभूषाही अप्रतिम होती.

संवादांमधील आवाज आणि प्रकाशयोजना यामुळे नाटक अधिकच खुलून उठले होते. नाटकाचा मंच इतका सुरेख आणि तंतोतंत शाळेसारखा वाटत होता की, प्रत्येकाला आपली शाळा आठवावी.

आपण एखादा सुंदर मातीचा घडा पाहतो, पण त्या मातीला घडवायला, तिला आकार द्यायला एक कुशल कारागीरच लागतो. या नाटकाचे खरे कारागीर आहेत दिग्दर्शक नितीन शिवराम नाईक. त्यांनी या नाटकाला खरा न्याय दिला. या नाटकातून त्यांची धडपड स्पष्ट दिसून आली. नितीनचं नाटकाप्रती असलेलं प्रेम मी लहानपणापासून पाहिलं आहे आणि कष्ट माणसाला कधीच कमी पडू देत नाहीत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. या नाटकात प्रत्येक जागा त्यांनी भरून काढली होती. हसणारा आणि रडणारा प्रत्येक सीन त्यांनी बारकाईने अभ्यासलेला दिसून आला.

हे नाटक पाहून प्रत्येकाला नाटकाची ओढ निर्माण व्हावी आणि आपणही रंगमंच गाजवावा अशी ऊर्जा मिळेल. पण दुर्दैवाने, हे सगळ्यांना शक्य होत नाही. काही जणी खर्चाअभावी माघार घेतात, तर काहींना योग्य पाठिंबा न मिळाल्यामुळे या क्षेत्रातून माघार घ्यावी लागते. मी स्वतः एक छोटी कलाकार असल्यामुळे, अशा अनेक समस्यांना मला तोंड द्यावे लागले आहे. म्हणूनच, मी या माध्यमाद्वारे सरकारला विनंती करते की, त्यांनी याची दखल घेऊन महिला कलाकारांना प्रोत्साहित करावे. आज महिला वैयक्तिक स्तरावर हे माध्यम यशस्वीपणे हाताळत आहेत, त्यांना शासनाकडून हातभार लागावा, जेणेकरून प्रत्येक महिला नाटकात रस घेऊ शकेल.

मी म्हात्राई काळभैरव महिला मंडळ संस्थेचे, तसेच दिग्दर्शक श्री. नितीन नाईक आणि लेखक श्री. महेश नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि संपूर्ण गटाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.


- शितल सराफ