असा हा गोपाळराव दिवसभर उंडगेगिरी, वाद, भांडणे तर ह्याच्या पाचवीलाच पुजलेली. गावात ह्याच्या इतक्या केसी कोणाच्याच नसतील. मोडेन पण वाकणार नाही असा बाणा, समजूतदारपणा नाहीच. म्हणूनच त्याला गावात केश्या गोपाळ म्हणत.
आमच्या परिवाराचे मूळ जरी गोव्यात असले, तरी कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आमचे बरेच सगेसोयरे होते. येणे जाणे नेहमी चालू असायचे. तश्या पूर्वी दळणवळणाच्या सोयी म्हणजे रस्ते. फक्त खूप वेळ लागे. त्यामुळे शक्यतो सुट्ट्या असताना किंवा तसेच काही महत्त्वाचे असेल तरच कोकणात जात असू.
माझ्या आईचे मावसबंधू म्हणजे आमचे मामाच. ते सावंतवाडी कोर्टात वकिली करत. त्या काळी वकील म्हणजे खूप मानाचा असे. वकील, कलेक्टर ही नावे उच्चारायला सुध्दा लोक घाबरत. असो! तर बऱ्याचदा सुट्टीमध्ये आम्ही जात असू मामाकडे. तसे त्यांचे राहण्याचे गाव सावंतवाडीपासून ५ ते ६ मैल लांब असावे.
तिथून येऊन जाऊन असत ते कोर्टात. त्या काळी आजच्यासारखी वाहतूक नव्हती मोटार गाड्यांची. बैलाची सारवट गाडी, नाही तर फार फार सायकल. त्यात मातीचे रस्ते इतके गचाळ की हा रस्ता आहे हे सांगावे लागे. खेड्यात तर फक्त पायवाटा असत.
मामांची तशी भरपूर प्रॉपर्टीही होती. तसे गावात सगळे तालेवार. आंबा, काजू, नारळ, केळी भरपूर. पेराल ते उगवेल अशी परिस्थिती. घरही मोठे चौसोपी. संध्याकाळी मामा आले की गावातील अशील जमा होत आपल्या कामाकरता. पिढ्यानपिढ्यांची संपत्ती आणि भरपूर मोकळा वेळ ही प्रत्येक कोकण्याची खासियत. आणि रिकाम्या घरात सैतानाचा वास ह्या उक्तीप्रमाणे नको त्या उद्योगात डोकी जास्त चालत. त्यातून मग वाद, भांडणे नित्याचीच. मग आली कोर्ट, केस, वकील वगैरे. पगार झाल्यावर आपण कसे किराणाचे वेगळे, फीचे वेगळे पैसे काढतो तसे बऱ्याच घरात कोर्ट, वकील फी म्हणून वेगळे बजेट असे. असो!
अश्याच अशिलात ओळख झाली केश्या गोपाळाची. त्याचे नाव तसे गोपाळराव पण कोकणात कधीच सरळ नावाने हाक मारायचा प्रघात नव्हता आणि आजही नाही. म्हणूनच केशा गोपाळ. अर्थात त्याचा संदर्भ केसांशी नसून कोर्टकेसशी होता. त्याचे काय होते की, गोपाळराव पैशाने तसा मजबूत गडी, बापाने सावकारीत मजबूत पैसा कमावला. सुशेगाद आयुष्य. पण वर सांगितल्याप्रमाणे अस्सल कोकणी. करणार तरी काय दिवसभर? मग काढा वाद, भांडणे. आता गावात सगळेच मानाचे. कोण झुकणार? घाला केस. गोपाळरावही त्यातलाच. अतिशय हेकेखोर, मानी असा. ५ फुटा पर्यंत उंची, गोरा वर्ण, किडकिडीत, अंग झाकायला फक्त धोतर आणि जानवे. बास! झाला गोपाळराव तयार!!
असा हा गोपाळराव दिवसभर उंडगेगिरी, वाद, भांडणे तर ह्याच्या पाचवीलाच पुजलेली. गावात ह्याच्या इतक्या केसी कोणाच्याच नसतील. मोडेन पण वाकणार नाही असा बाणा, समजूतदारपणा नाहीच. म्हणूनच त्याला गावात केशा गोपाळ म्हणत. गावाबाहेर त्याची जमीन होती. त्याला टेकून राम बामणाचे भाट. भाटातील दोन माड वाकडे होऊन गोपाळच्या भाटावर आले होते. त्याचे नारळ सुकले की ते गोपाळाच्या जमिनीत पडत. त्यावरून सुरु झालेली भांडणे पार सावंतवाडी कोर्टात गाजत होती. तसा राम समजूतदारपणा दाखवायला तयार पण आमचा गडी ताठ ना! अश्याच आणि दोन तीन केस होत्या चालु. गोपाळ गावाबाहेर गेला म्हणजे समजायचे की आज तारीख आहे.
असा हा गोपाळराव तसा मामाचा मित्र, आम्ही गेलो की मग भरपूर मानकुरात आंबे, अननस, घेऊन यायचा. हात तसा सढळ त्याचा. अर्थात् बापाचा पैसा. पण गावात कोणाच्याही मदतीला हजर. गावात त्याच्या घराशेजारी जयरामचे घर. तसे वारशी ते. पण एकमेकांचे तोंड पहात नसत. कुरघोडीची एक संधी सोडत नसत. गोपाळरावचा बाप वारला. त्यावेळी त्याने अख्ख्या वाड्याला बाराव्याला बोलावले, जेवण घातले. झाले दोन वर्षांनी जयरामचा मोठा भाऊ गेला त्यावेळी त्याने अख्ख्या गावाला बोलावले बारव्याला. असे विचित्र प्रकार.
गावातील लोकही गोपाळरावला भरपूर चढवीत आणि सोडून देत मजा बघायला. मामा खूप समजवायचा त्याला पण ऐकेल तर तो गोपाळराव कसला?
जयरामचा मुलगा मुंबईत कामाला होता. त्याने तिथे गाडी घेतली फियाट. ती पण मुंबईत. जयरामने अख्ख्या गावाला पेढे वाटले. झालं विषय मिळाला. फुलकरांनी फुलवला गोपाळला. जयरामने गाडी घेतली तुझे काय? तिरमिरीत गोपाळरावने जमिनीचा एक तुकडा विकला आणि थेट पोचला मुंबईत. आणि परत आला तो नवी कोरी फियाट घेऊनच. भाड्याने आणलेल्या ड्रायव्हरने गाडी वाडीपर्यंत आणली खरी पण पुढे काय? अहो भाड्याचा ड्रायव्हर गेला परत आता गाडी चालवणार कोण? त्या काळी तसे ड्रायव्हर नव्हते कोकणात. होते दोन-चार ते काररेत चालवायचे आणि ड्रायव्हर जरी मिळाला तर त्याला पगार कोणी द्यायचा? आता दुसरा मुद्दा असा की गावात गाडी रस्ताच नव्हता. मग कसे काय? शेवटी कशीबशी गाडी गोपाळरावच्या अंगणात स्थानापन्न झाली खरी.
ड्रायव्हर नाही, रस्ता नाही गाडी उरली मग जागेवरच. गावात टिंगलीचा विषय झाला गोपाळरावची गाडी. पण गोपाळराव ताठ. कोणी विचारले तर म्हणतो कसा "अहो जयरामच्या झिलान गाडी घेतली ती मुंबईक. काय फायदो? हडे मज्या घरासमोर गावातली पैली गाडी झुलताहा. मगे कोण पयल्या मानाचो? विचारणारा गप्प.
तर असा हा गोपाळराव मनस्वी, हेकेखोर, पण इतर बाबतीत त्रास नव्हता त्याचा कोणाला पण अस्सल कोकणी रक्त, कोकणी बाज नसानसात भरलेला. वयाच्या ऐंशीव्या वर्षी मेला. जेव्हा मुलाने त्याची ट्रंक उघडली त्यावेळीं त्यात एक पत्र आणि असंख्य केस पेपर मिळाले. पत्रात मजकूर होता की चिरंजीवांस आशीर्वाद, ह्या पत्राद्वारे सांगतो की वाडीच्या बँकेत वीस हजार रूपये ठेवले आहेत. त्याचा उपयोग फक्त राम बामणा बरोबर जी केस चालु आहे तिच्या खर्चा करताच करावा. इतरत्र कुठेही नाही. तरच मला शांती मिळेल.
तर असा हा गोपाळराव. म्हणतात ना कोकणी माणूस खरंच हुशार पण त्याची हुशारी सगळी मीपणातच आणि कायदे दाखविण्यातच गेली...
रेशम जयंत झारापकर
मडगाव