एक हजार नवजात बालकांमागे ७ बालकांचा मृत्यू

पणजी : नवजात बालकांचा मृत्यूदर (deaths of new born babies) कमी असण्यात गोवा देशात दुसऱ्या स्थानी आहे. राज्यात २०२४ मध्ये दर एक हजार नवजात बालकांमागे (एक वर्षाच्या आतील) ७ बालकांचा मृत्यू झाला होता. याची राष्ट्रीय सरासरी २४ इतकी होती. मृत्यूदर कमी असण्याच्या क्रमवारीत मणिपूर (२ बालकांचा मृत्यू) प्रथम स्थानी होता, तर सिक्कीम संयुक्तरीत्या दुसऱ्या (७), तर केरळ (८) तिसऱ्या स्थानी होता. भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाने नुकत्याच जारी केलेल्या एसआरएस अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, गोव्यातील ग्रामीण भागात हा दर ५, तर शहरी भागात ८ होता. याची राष्ट्रीय सरासरी अनुक्रमे २७ आणि १७ होती. राज्यात २०२० ते २०२४ दरम्यान नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट झाली आहे. २०२० मध्ये दर एक हजार जन्मांमागे ९.१२ बालकांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही संख्या वाढून १०.७३ झाली, तर २०२४ मध्ये हा दर कमी होऊन ७ झाला. संपूर्ण देशात छत्तीसगढमध्ये नवजात बालकांचा मृत्यूदर सर्वाधिक म्हणजेच ३६ इतका होता. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश (३५), मेघालय (३१), आसाम (२९), राजस्थान (२८) येथेही हा दर अधिक होता. तर हिमाचल प्रदेश (११), महाराष्ट्र (१३) येथे हा दर कमी होता.
जन्मदर घटतोय...
मागील काही वर्षात राज्यातील जन्मदर कमी होत आहे. राज्यात २०१९ मध्ये दर एक हजार व्यक्तींमागे १२.६६ जणांचा जन्म झाला होता. २०२३ मध्ये हा दर कमी होऊन १०.७३ झाला, तर २०२४ मध्ये तो आणखी कमी होऊन १०.७ झाला. २०२४ या वर्षात अन्य राज्यांचा तुलनेत गोव्यातील जन्मदर सर्वांत कमी होता. याची राष्ट्रीय सरासरी १८.३ इतकी होती. गोव्यातील ग्रामीण भागातील जन्म दर १०.२ तर शहरी भागातील ११.१ होता. देशात केरळ (११.१), तामिळनाडू (११.६) येथेही जन्म दर कमी होता, तर बिहारमध्ये हा दर सर्वांत अधिक म्हणजेच २६.८ होता. उत्तर प्रदेश, राजस्थान येथेही जन्मदर अधिक होता.