योग्य प्रक्रिया केली नसल्यामुळे गुन्हा, आरोपपत्र रद्द करा!

जमीन हडप प्रकरणी संशयित सिद्दिकीची उच्च न्यायालयात याचिका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th June, 11:23 pm
योग्य प्रक्रिया केली नसल्यामुळे गुन्हा, आरोपपत्र रद्द करा!

पणजी : योग्य प्रक्रिया केली नसल्यामुळे आपल्या विरोधात म्हापसा आणि वाळपई न्यायालयात दाखल केलेल्या गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करावे, अशी मागणी जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार आहे.
जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्या विरोधात विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हापसा आणि वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहे. त्यानुसार, म्हापसा जमीन हडप प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
एकतानगर हाऊसिंग बोर्डमधील म्हापसा शहर चलता क्र. २, पीटीशीट क्र. ६७ मधील २० हजार ८१९ चौरस मीटर जमीन उपनिबंधकांचा बनावट रबर स्टॅम्प आणि कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासविले व जमीन संशयित सिद्दिकीने इतर संशयितांच्या साहाय्याने उपनिबंधक कार्यालयाकडून आपल्या नावावर केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी १९ सप्टेंबर २०२० रोजी सिद्दिकी आणि इतरांविरुद्ध भादंसंच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सरकारने जमीन हडप प्रकरणात एसआयटी स्थापन केल्यानंतर वरील प्रकरण तिथे वर्ग करण्यात आले. एसआयटीचे उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर यांनी तपास सुरू केला.
एसआयटीने ६५६ पानांचे दुसरे आरोपपत्र वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केले आहे. त्यानुसार, या प्रकरणी राफेल लुईस लोबो यांनी ६ ऑक्टोबर २०२० रोजी म्हापसा पोलिसांत, तर २७ डिसेंबर २०२१ रोजी वाळपई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयितांनी त्याच्या पूर्वजांच्या तिसवाडी तालुक्यातील गवळी-मोवळा भाटी येथील ३६/० मधील १,०९,५०० चौ.मी, सर्वे क्र. ३७/० मधील ३८,३२५ चौ.मी. ३८/१ मधील ६८,२५० चौ.मी. जमिनीची बनावट विक्री पत्राची नोंद वाळपई येथील उपनिबंधकाकडून विक्री केल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हा गुन्हा एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करून एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. संशयित सिद्दिकीने ही दोन्ही आरोपपत्र योग्य प्रक्रिया न करता दाखल केल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच वरील दोन्ही आरोपपत्र आणि गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
सिद्दिकीविरोधात म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल
चार वर्षांपासून फरार असलेल्या संशयित सिद्दिकीला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी एसआयटीने हुबळीमधून अटक केली होती. सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याच्या मदतीने गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. गुन्हा पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली. त्यानंतर एसआयटीने तपासपूर्ण करून सिद्दिकीविरोधात म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात ८५२ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.                               

हेही वाचा