सायली जेव्हा गावात परत आली, तेव्हा सगळ्या शाळेच्या मुलींनी फुलांची आरास केली होती. चौकात मोठा सत्कार ठेवण्यात आला होता. आजोबा, जे पूर्वी "मुली शिकून काही होत नाही" म्हणायचे, ते आज तिच्या समोर उभे होते, अश्रूंनी डोळे भरलेले.
गोव्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं भटवाडी हे छोटंसं, निसर्गसंपन्न गाव. हिरवीगार शेतं, कडेकपाऱ्यांतून वाहणाऱ्या झऱ्यांचं खळखळणं, आकाशात मुक्त विहरणारी ढगांची रेलचेल... अशा रम्य जागी वाढलेली सायली ही गावातल्या इतर मुलींपेक्षा वेगळी होती.
ती फार लहानपणापासूनच विचारशील, जिज्ञासू आणि अभ्यासू होती. झाडाखाली बसून पुस्तकात हरवलेली सायली, हे गावातलं रोजचं चित्र होतं. पण तिचं वाचन, अभ्यास आणि शंका विचारणं कधी घरच्यांना रुचत नसे. घरात आजोबा आणि काकांचं वर्चस्व. ते म्हणायचे, "मुलींनी जास्त शिकायचं नसतं. संसारच करायचा असतो!" काकी आणि आजी देखील त्याच मताच्या. वडील शांत आणि आई थोडीशी हळवी – सायलीला समजून घेणारी एकमेव व्यक्ती.
गावातल्या सरकारी शाळेत शिकताना सायलीने सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहून शिक्षकांचे लक्ष वेधले. गावात कुणी मुलगी इतकी अभ्यासू असावी याचं कौतुक सगळ्यांनाच वाटायचं, पण घरात ते कौतुक नेहमी दडपलं जायचं. सायलीचं स्वप्न होतं – आयएएस अधिकारी बनण्याचं. तिला वाटायचं, "जर माझ्या निर्णयाने गावातल्या इतर मुलींना शिकायची प्रेरणा मिळाली, तर मी काही तरी मोठं काम केलं असं समजेन."
दहावीत तिने तालुक्यात अव्वल येऊन सर्वांना थक्क केलं. पण खऱ्या अडचणी तेव्हाच सुरू झाल्या. बारावीनंतर तिच्या शिक्षकांनी तिला पणजीला जाऊन पदवी व त्यानंतर युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. एका ट्रस्टची शिष्यवृत्तीही मिळाली होती. पण या निर्णयानं घरात वादळ उठवलं.
"शहरात मुलगी एकटी? आणि तेही युपीएससीसाठी? कोण म्हणतं हे शक्य आहे?" – काका
"हे काही आपल्या घराचं काम नाही." – आजोबा
"मुलींचं आयुष्य स्वयंपाकघरात आणि संसारातच बरं वाटतं." – काकी
सायलीचं मन तुटत होतं. पण ती मूक राहिली नाही. तिने एके रात्री आई-वडिलांसमोर ठामपणे आपली इच्छा मांडली. तिच्या डोळ्यातील जिद्द पाहून वडिलांचं हृदय पाझरलं. त्यांनी पहिल्यांदाच काकांना विरोध करत स्पष्ट सांगितलं,
"माझी मुलगी शिकणार! आणि तिला मी थांबवणार नाही!"
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पहिल्यांदाच घरातल्या गृहित धरलेल्या शांततेला आवाज मिळाला.
सायली पणजीला गेली. तिथलं जग वेगळंच होतं – वेगवान, स्पर्धात्मक आणि ताणतणावाने भरलेलं. सुरुवातीला तिला घराची, आजीच्या हातच्या भाकरीची आणि झोपण्यापूर्वी आजोबांनी सांगितलेल्या जुन्या गोष्टींची आठवण येई. पण तिचं लक्ष विचलित होऊ न देता ती अभ्यासात गुंतली.
रोजची लायब्ररी, रोजचं वर्तमानपत्र आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याची ओढ. एकटं राहणं, स्वयंपाक करणं आणि हॉस्टेलच्या अडचणी – सगळ्याचा तिने समर्थपणे सामना केला.
दरवर्षी युपीएससीचा निकाल लागत होता आणि सायली दोनदा अपयशी ठरली. गावातून टोमणे येऊ लागले – "बघा ना, काही उपयोग नाही शिकून." काकाही म्हणाले, "म्हटलं होतं ना, काही उपयोग नाही त्या अभ्यासाचा. आता तरी घरी परत येईल का?"
पण तिने हार मानली नाही. तिसऱ्या प्रयत्नासाठी ती अधिक कष्ट करू लागली. थोड्या विश्रांतीच्या क्षणी ती गावच्या लहान मुलींना व्हिडिओ कॉलवर शिकवत असे. तिला स्वतःपेक्षा त्या मुलींच्या डोळ्यात उमटणाऱ्या स्वप्नांची काळजी होती.
शेवटी, एक दिवस युपीएससी निकाल लागला. सायलीचा नाव आयएएस यादीत झळकत होतं. तिचा क्रमांक देशभरात ३८ वा होता! तिला विश्वासच बसत नव्हता. पहिल्यांदा तिने आईला फोन लावला. आई रडत होती – आनंदाने. गावात बातमी पोहोचली तशी भटवाडी जागी झाली. ज्यांनी एकेकाळी तिला विरोध केला, तेच आता "आपलीच सायली!" म्हणत मिरवू लागले. काका, जे नेहमी तिला कमी लेखायचे, तेच गावकऱ्यांना तिचे गुणगान सांगण्यात व्यस्त होते.
सायली जेव्हा गावात परत आली, तेव्हा सगळ्या शाळेच्या मुलींनी फुलांची आरास केली होती. चौकात मोठा सत्कार ठेवण्यात आला होता.
आजोबा, जे पूर्वी "मुली शिकून काही होत नाही" म्हणायचे, ते आज तिच्या समोर उभे होते, अश्रूंनी डोळे भरलेले.
"सायली, तुझं ऐकलं असतं, तर घरातली इतर मुलीही शिकल्या असत्या. तुझा अभिमान वाटतो गं," त्यांनी तिला कुशीत घेत म्हटले.
सायलीने त्यांच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवला आणि म्हणाली,
"आजोबा, चुका सगळ्यांकडून होतात. पण बदल मान्य करणं हे मोठेपणाचं असतं."
सायली आता जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहे. तिने गावात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, संगणक शिक्षण केंद्र आणि वाचनालय सुरू केलं. ती गावच्या प्रत्येक मुलीला सांगते –
"तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला, तर आभाळही लहान वाटेल. तुमची ओळख केवळ मुलगी असण्यापुरती नाही, तर तुमच्या कर्तृत्वाने ठरते."
-अदिती मयेकर