सोनाली धीरज परब–सावळ देसाई

सोनाली यांच्या लेखनाला कोवळी... निरागस नितळ स्पंदने आहेत. ती त्याच नजाकतीने अंतरंगात उतरवून घेतली तरच त्याची कंपने जाणवतात.

Story: प्रेरक सर्जक |
18th May, 03:54 am
सोनाली  धीरज परब–सावळ देसाई

मानवी मन हे भावना, विचारांची गुंतावळ असते. ती पक्की विणली गेली... तिला शब्दबद्ध करता आले... अभिव्यक्तीला आकार प्राप्त झाला की ती कलाकृती होते. अशा सशक्त आकृतीबंधातून समाजात स्वतःची ओळख निर्माण होते. अशीच एक ओळख स्वतःच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातून गोव्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण केलेली आहे ती म्हणजे सौ. सोनाली धीरज परब पूर्वाश्रमीच्या सोनाली सावळ देसाई या युवा लेखिकेने...!

शालेय जीवनातच संस्कारक्षम शिक्षक त्यांना लाभले. तिच्यातील लेखन कौशल्य हेरून त्याला प्रोत्साहन मिळाले त्यामुळेच तिच्या अंतर्मनातील कवितेची उर्मी शब्दबद्ध झाली. लग्नाच्या आधीपासूनच सोनाली सावळ देसाई एक युवा कवयित्री म्हणून नावारूपाला येत होती. छोटी मोठी साहित्य संमेलने, कविसंमेलने, परिसंवाद यात तिचा सक्रिय सहभाग असायचा. तिचं कवितेचं, एखाद्या ललित निबंधाचे सादरीकरण लक्ष वेधून घेत असे. तिच्याकडे तिची स्वतःची अशी निवेदन शैली होती... प्रसन्न चेहरा, बोलके डोळे, शांत संयमी स्वभाव आणि गोड हास्य त्यामुळेच ती आणि तिची अभिव्यक्ती लक्षात राहायची. आपला असा एक समज असतो, जे कलाशाखेतून शिकत असतात त्यांनीच फक्त साहित्य लिहायचं. विज्ञान शाखेत अशा लिखाणाला उसंतच मिळत नाही... पण इथं सोनाली यांनी तर आपलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विज्ञान शाखेतून घेत लिखाणातून ही वाचकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. गोवा फर्मास्युटिकल महाविद्यालयातून एम. फार्म  करून सध्या त्या सावंतवाडी माडखोल येथील व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करीत आहेत.

सोनाली यांचा लेखन प्रवास हा कविता-कथेच्या अंगाने विकसित होत गेला. दैनिक हेराल्डच्या मुक्ता पुरवणीत एका वर्षासाठी 'मनातलं मनापासून' सुरु केलेल्या सदराला चांगला प्रतिसाद मिळाला. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या, 'क्षितिज'या गोमंतकीय लेखकांच्या प्रातिनिधिक कथासंग्रहात कथेचा समावेश, तसेच २८ व्या साहित्य संमेलनाच्या ‘पुनव’ स्मरणिकेत लेख प्रकाशित.

गोवा मराठी अकादमीच्या 'गोमती', साहित्यप्रेमी मंडळ पुणे, 'दीपस्तंभ', काव्यधारा मासिक, यशवंत त्रैमासिक, विविध दिवाळी अंक यामधून लेख, कविता प्रकाशित झाल्या. डॉक्टर मधुसूदन जोशी यांच्या 'कॅलिडोस्कोप' या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे. गोव्याच्या सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रातून सोनाली यांचे लेख, कविता, कथा सातत्याने प्रकाशित झालेल्या आहेत. तिच्या लिखाणाची दखल घेत तिला मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि शब्दसारथी परिवार आयोजित 'अनुबंध' कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांच्या हस्ते उदयोन्मुख लेखिका म्हणून, तसेच बिल्वदल परिवार साखळी, मिशन फॉर लोकल आणि त्रिसूपर्ण पेडणे अशा विविध संस्थांनी सन्मानित  केलेले आहे. शिवाय गोवा मराठी अकादमी आयोजित राज्यस्तरीय लेखन स्पर्धा, गोमंतक दिवाळी अंक कविता लेखन स्पर्धा, कोकण मराठी परिषद आयोजित शेकोटी साहित्य संमेलन, श्री सरस्वती वाचन मंदिर आयोजित कविता स्पर्धा, कुटुंब प्रबोधन गतिविधी कोकण प्रांत आयोजित लेखन स्पर्धेतून त्यांच्यातील लेखकाला पुरस्कार, पारितोषिकांनी गौरविण्यात आलेले आहे. सोनाली यांचा आत्मस्वर ‘कविता’ हाच आहे... कवितेने त्यांना ओळख दिली आणि त्यांचा पहिलाच ‘ओळख’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. साहित्य अकादमीच्या पुरस्कार यादीपर्यंत तो पोहोचला. ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब आहे. तसे पाहायला गेलो तर प्रत्येकाच्याच मनात एक गोड गुपित असते. त्याची अभिव्यक्ती नेमकी, नेटकी झाली तरच त्याला सुयोग्य आकार प्राप्त होतो. त्यासाठी सहकार्याचे हात हवे असतात. प्रेरणादायी थाप पाठीवर पडणे गरजेचे असते. त्यातही सहजीवनाची आश्वासक सोबत असली की लेखनाची उर्मी वाढते. एकमेकांना वाढवत नेते ते सहजीवन असते. अशी साथ सोनाली यांना पालये मिर्झलवाडा येथील धीरज शामसुंदर परब यांची लाभलेली आहे. लग्नानंतर त्यांच्यातील मुळातच असलेल्या सर्जकतेला मोठा परीघ लाभला. निवेदन, सूत्रसंचालन, भाषणे, संवाद, मुलाखती या अंगाने ती बहरली... तिच्यातील निवेदकाची अनेकांनी प्रशंसा केली. तिचे कवित्व स्फुरण पावले. त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. संगीत, गायन, अभिनयाच्या साथीने ते सर्वदूर पोहोचले... वाचन, लेखन, सतत काहीतरी शिकत जाण्याची उर्मी माणसाला वाढवत नेते. मला सर्व काही कळते हा विचारच आपली प्रगती खुंटीत करतो. सोनाली यांनी मात्र स्वतःला वाचन लेखनातून प्रगल्भ केलेले आहे. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना, प्रसंग, परिस्थिती यांच्याकडून त्या सतत काहीतरी शिकत राहातात. कथा, कवितांतून त्यांचे अधोरेखन  करतात. यासाठी गोव्यातील नामांकीत साहित्यिकांनी त्यांच्या लेखनाचे कौतुक केलेले आहे. अनुभवातील सजगताच सभोवतालातून विषय निर्मितीची प्रेरणा देतात. समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा प्रभाव मनावर पडतो. अस्वस्थता मनाला वेढून राहते, त्या तगमगीलाच मग शब्द फुटतात. ही अस्वस्थता कवयित्रीचे भावजीवन समृद्ध करणारी असते...

एका कवितेत त्या म्हणतात,
पाऊस पाणी पाखर गाणी फुलांचा सुवास होता
फोफळ केली मंदियाळी वाऱ्याचा निनाद होता
ओढा पाठ नदी जरा खळखळण्याला वाव होता
तिथे कधीतरी एक गाव होता...
चिंच कैरी आंबे काजू खुला बाजार होता
गळ्यात गेले हातात हात दोस्तीचा आधार होता
उनाड सरत्या संध्याकाळी लगोरीचा फाव होता
तिथे कधीतरी एक गाव होता...

सोनाली यांच्या लेखनाला कोवळी... निरागस नितळ स्पंदने आहेत. ती त्याच नजाकतीने अंतरंगात उतरवून घेतली तरच त्याची कंपने जाणवतात. ती भाववृत्ती... चित्तवृत्ती पुलकीत करतात... आणि आठवणींच्या रम्य प्रदेशात फेरफटका मारायला लावतात. भावनेला वास्तवाची किनार लावीत नात्यांची वीण पक्की करतात. ‘अंतरंग’ सारख्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सोनाली-धीरज या जोडीने विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा वेध घेण्याचे काम मुलाखतीद्वारे केलेले आहे. आजपर्यंत या पॉडकास्टच्या माध्यमातून प्राचार्य अनिल सामंत, प्राचार्य गजानन मान्द्रेकर, प्रसिद्ध निवेदक गोविंद भगत, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर व इतरही अनेकांचा  जीवन-कार्याचा पट उलगडून दाखविलेला आहे. संसार, नोकरी, सांभाळून स्वतःची आवड जोपासणे हे काम तसे कठीणच. त्यासाठी आपल्या माणसांची सोबत हवी. सोनाली त्या बाबतीत भाग्यवान आहेत. आईवडील आणि आता सासू सासरे यांची भक्कम साथ त्यांना लाभलेली आहे. अर्थात त्यासाठी सर्वाना सामावून घेत पुढे जाण्याची कला व्यक्तिमत्त्वात असणे गरजेचे आहे. सोनाली यांच्याकडे ते कौशल्य आहे.

स्वतःविषयी प्रेम हवेच... पण त्यात इतरांचा विचार यायला हवा. वृथा अहंकारापेक्षा हृदयातील हळवा झंकार जगण्याची सकारात्मक उर्मी जागवतो.. सोनाली यांच्या नितळ, सकस लिहिण्याचे आणि जगण्याचे हेच तर सार आहे...म्हणून तर... त्या म्हणतात...

सरुन गेल्या वाटांना
सुटून गेल्या लाटांना
फिरुन पुन्हा वेचत जा
आशेने गंधित फुलांना
धावून घे माळरानी
स्वप्नांच्या वाऱ्यापाठी
कशासाठी? स्वतःसाठी..
रोज रोज संपता संपता
थोड थोड सरता सरता
रोज थोड मिटता मिटता
राहूनी जाई फुलायचं
सांग स्वतःला वेळोवेळी
जगून घे तू मरण्याआधी
कशासाठी?.. स्वतः साठी...


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)