दम्यावर हार्मोन्सचा प्रभाव!!

साधारणपणे महिलांमध्ये दम्याच्या शारीरिक त्रासासोबत भावनिक पातळीवर होणारा परिणाम हा खूप महत्त्वाचा आणि बहुतेक वेळा दुर्लक्षित केला जाणारा विषय आहे.

Story: आरोग्य |
16th May, 11:45 pm
दम्यावर हार्मोन्सचा प्रभाव!!

न पावलं चालल्यावर धापा टाकतेस.. अशात दुसऱ्यांना काय व्यायाम शिकवणार” हे शब्द ऐकले आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले... ती पेशाने फिजिओथेरपीस्ट अन् पदरात २ वर्षांचा मुलगा. गर्भारपणात दम्याचा त्रास सुरू झाल्याचे निमित्त, तो आता चालूच. वाढलेले वजन, ताणतणाव, कामावर शारीरिक हालचाली- व्यायामातून सुटका नाही तर घरी दोन मिनिटेही बसायला उसंत नाही या सगळ्या गोष्टींमुळे सतत दमा त्रास करत होता व शारीरिक स्थितीसोबत मानसिक पातळीवरही तिचे आरोग्य खालावत चालले होते.

साधारणपणे महिलांमध्ये दम्याच्या शारीरिक त्रासासोबत भावनिक पातळीवर होणारा परिणाम हा खूप महत्त्वाचा आणि बहुतेक वेळा दुर्लक्षित केला जाणारा विषय आहे. दमा हा आजार केवळ शारीरिक त्रास देणारा नसून, मानसिक व भावनिक आरोग्यावरही खोलवर परिणाम करतो व वर उदाहरण दिलेल्या तिच्यासारख्या अनेक महिला अशा स्थितीला सामोऱ्या जातात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्मोन्सच्या प्रभावामुळे दमा कसा त्रास करू शकतो व कोणते भावनिक परिणाम होऊ शकतात याविषयी आपण आज बोलू.

दमा म्हणजे काय?

दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसनमार्गाचा एक दीर्घकालीन विकार आहे, ज्यात श्वास घेणे कठीण होते, छातीत जडपणा जाणवतो, खोकला आणि घरघर होते. दमा हा केवळ अ‍ॅलर्जी, प्रदूषण किंवा शारीरिक क्रियांमुळे होत नाही, तर त्यासोबत अनेक अंतर्गत शारीरिक घटकही त्याला जबाबदार असतात. यामध्ये ‘हार्मोन्स’ म्हणजे शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींद्वारे स्रवली जाणारी रसायने यांचा महत्त्वाचा वाटा असतो. विशेष करून स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल आणि दम्याची तीव्रता यांचा स्पष्ट संबंध दिसून येतो.

हार्मोन्स म्हणजे काय?

हार्मोन्स ही शरीरातील विविध जैविक प्रक्रियांना नियंत्रित करणारी रसायने असतात. ही विविध ग्रंथींतून स्रवली जातात, जसे थायरॉईड ग्रंथी, अंडाशय, अधिवृक्क ग्रंथी इत्यादी. हार्मोन्स रक्तप्रवाहाद्वारे शरीरातील विविध अवयवांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे कार्य सुरळीत ठेवतात. संशोधनानुसार स्त्रियांमध्ये दमा पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आणि अधिक तीव्रतेने दिसून येतो व किशोर वयानंतर जास्त वाढू शकतो. तसेच हार्मोनल असंतुलन असणाऱ्या स्त्रियांमध्ये दमा अधिक त्रासदायक ठरू शकतो.

दम्यावर हार्मोन्सचा प्रभाव

एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन: मासिक पाळी दरम्यान हार्मोनल पातळीत सतत चढउतार होत असतो. यामुळे काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान किंवा काही दिवस आधी दम्याची लक्षणे तीव्र होताना दिसतात. याला ‘पेरी मॅनोपोजल अस्थमा’ असे म्हटले जाते. गर्भधारणा, स्तनपान आणि मेनोपॉज दरम्यान देखील हे हार्मोन्स बदलतात, ज्याचा परिणाम दम्यावर होतो.

गर्भधारणा आणि दमा: गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरोन हार्मोन वाढल्यामुळे काही स्त्रियांमध्ये दम्याची लक्षणे कमी होतात, कारण हे हार्मोन श्वासनलिकांचा ताण कमी करते. पण वाढलेले वजन, नाक बंद होणे किंवा हॉर्मोनल असंतुलनामुळे काही महिलांमध्ये दमा वाढताना दिसतो.

मेनोपॉज आणि दमा: मेनोपॉजनंतर एस्ट्रोजेनची पातळी खूप प्रमाणात घटते. या हार्मोनच्या अभावामुळे शरीरात सूज वाढण्याची शक्यता असते, जी श्वासनलिकांनाही प्रभावित करते व दमा सतावू शकतो.

थायरॉईड हार्मोन्स: थायरॉईड ग्रंथीतील हार्मोन्स (टी३ व टी४) जर असंतुलित असतील, तर ते श्वसनक्रियेवर परिणाम करू शकतात. हायपोथायरोयडीजम (थायरॉईड कमी कार्यशील असणे) च्या स्थितीमध्ये दम्याच्या लक्षणांत वाढ होऊ शकते.

अधिवृक्क ग्रंथी आणि कोर्टिसोल: कोर्टिसोल हा एक नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी हार्मोन आहे. जास्त तणावामुळे कोर्टिसोल पातळी बदलते, आणि दम्याच्या झटक्यांमध्ये वाढ होऊ शकते.

महिलांमध्ये दम्याचा मानसिक पातळीवर परिणाम

सतत भीती वाटणे: दम्याचे अटॅक अनपेक्षितपणे आणि अचानक येण्याची शक्यता असल्याने मनात भीती निर्माण होऊन राहू शकते. यामुळे मानसिक थकवा आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. 

स्वतःविषयी नकारात्मक भावना: अटॅक येण्याची शक्यता असल्याने आपसूक काम, प्रवास, व्यायाम यात मर्यादा घ्याव्या लागतात किंवा काही वेळा इतरांच्या साहाय्यावर अवलंबून राहावे लागते. यामुळे त्यांच्या आत्मसन्मानावर परिणाम होऊ शकतो तसेच स्वतःबद्दल नकारात्मक चित्र तयार होऊ शकते. 

तणाव व नैराश्य: दम्यामुळे रोजच्या कामांमध्ये अडथळा येतो. घरकाम, नोकरी, मुलांची जबाबदारी या गोष्टी व्यवस्थित पार पडताना अडचणी येतात. यातून तणाव आणि नैराश्यदेखील येऊ शकते.

एकटेपणा आणि सामाजिक अलिप्तता: दम्याचा त्रास वारंवार होत असल्यामुळे अनेक महिला सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहतात. “अटॅक आला तर?, सगळ्यांसमोर इनहेलर बाहेर कसा काढू?, लोक काय म्हणतील?" अशा विचारांमुळे त्या स्वतःहून बाहेर जाणे टाळतात, अनेक वेळा एकट्या पडतात तसेच कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.

दम्याचा त्रास हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण आयुष्यावर व भावनिक आरोग्यावर परिणाम करतो. अशा वेळेस फक्त औषधोपचार नव्हे तर मानसिक आधार देणे, मर्यादा समजून घेणे आणि स्वतःला आत्मविश्वासाने स्वीकारणे हे दम्यावरील लढाईचा महत्त्वाचा भाग आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर