धर्म आणि माणुसकी यांच्यातील संघर्ष आज हिंसक वळण घेत आहे. पहलगामसारख्या घटनांमधून माणुसकीचा झालेला ऱ्हास पाहून, धर्मांधतेवर माणुसकीच्या विजयाची आर्त हाक देणारा चिंतनशील लेख.
एक काळी छाया आली, अन् दोन बंध तोडून गेली, प्रेम फुलायच्या आधीच, दोन मने तुटून गेली. धर्माच्या नावावर, दोन जीवांचा झाला ऱ्हास, आता केवळ अश्रू आणि मनात एक खोल आभास. उठ माणसा, दे हिंदुत्वाला पुन्हा सत्याचा श्वास.
कंठ दाटून येणाऱ्या या शब्दांतून रडू आवरेनासे होते. धर्म आणि माणुसकी यामध्ये आज वादविवाद होताना दिसतात. ज्या समाजात आपण राहतो, तेथे धर्म श्रेष्ठ असतोच, पण जेव्हा धर्माच्या नावावर माणसांचा जीव घेतला जातो, तेव्हा एक प्रश्न निर्माण होतो की, माणुसकीपेक्षा धर्म श्रेष्ठ आहे का?
आज या गुंतागुंतीच्या जगात 'माणुसकी' या मूल्याला किंमतच राहिलेली नाही. प्रत्येक ठिकाणी फक्त रुबाब, दंगे, मारामारी आणि वाईट कृत्यांची छाप पसरलेली दिसते. बिचारा गरीब तसेच सामान्य माणूस यात गुरफटून जातो आणि निष्पाप माणसांच्याच कपाळी शेवटी कलंक लागतो. असाच आघात पहलगाम, काश्मीर येथे नव्याने लग्न झालेल्या, केवळ पाच दिवसांचा सहवास लाभलेल्या जोडप्याबरोबर झाला. काळाने घात केला आणि एका पत्नीचा जीवलग तिच्यापासून दूर झाला. या सगळ्यात त्या निष्पाप जोडप्याची चूक होती का? की त्यांना नशिबाची साथ नव्हती? असे सर्व चिंताजनक प्रश्न आता अर्थहीन ठरतात.
सर्वधर्म समभाव आणि हिंदुत्वाचे सत्य विचार यामुळे हिंदूजन घाव सोसतात का? हिंदू धर्माचे पालन करणे आणि हिंदू म्हणून जन्म घेणे यामुळे हिंदूंना जिवंत मारले जाते का? असे अनेक प्रश्न आज प्रत्येकाच्या हृदयात तिटकारा निर्माण करतात. हल्लेखोरांनी त्या निष्पाप यात्रेकरूंवर गोळीबार केला. फक्त हिंदू असल्याने त्या व्यक्तीची गाठ कायमची त्याच्या कुटुंबापासून आणि पत्नीपासून दुरावली. ही एक दयनीय आणि वेदनादायक अशी बाब आहे. कोणताही धर्म हिंसा करायला शिकवत नाही. परंतु माणूसच आहे ज्याने धर्माचा चुकीचा अर्थ ध्यानात घेऊन माणुसकीचा संहार केलेला आहे.
जात, धर्म, पंथ हे सर्व आज माणसाला इतके जवळचे झालेले आहेत की, त्यामुळे माणूस धर्माकडे फक्त भेदभावाच्या आणि द्वेषाच्या भावनेने पाहतो. माणसांमधील करुणा आज हरवत चाललेली आहे. कारण माणसाला माणुसकीपेक्षा आज 'धर्म' मोठा वाटतो. धर्म हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. हिंदू धर्माबरोबर अन्य धर्म कधी भेदभाव, अतिरेक, हिंसेचे विचार पसरवत नाहीत. त्यामुळे सत्यवादी धर्माच्या विचारांमध्ये माणसे दुर्विचार करून माणुसकीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात.
आजच्या या घडीला घडलेली ही पहलगामची घटना इतिहासात माणुसकीच्या झालेल्या हिंसेच्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात सतत लक्षात राहील. निष्पाप यात्रेकरूंवर तसेच या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी कोरले जातील.
केवळ धर्मामुळे अतिरेक्यांनी एका पतीचा जीव घेतला. त्याला स्वत:च्या जिवाभावाच्या लोकांपासून दूर केले. त्यामुळे ही हार संपूर्ण समाजाची आहे, कारण आज जग अंधश्रद्धा, द्वेष, हिंसा यामध्ये गुरफटून जीवन जगत आहे. या पलीकडे जाऊन जीवन जगणे हीच या काळाची खरी गरज आहे. माणुसकी हरवत चाललेली आहे, माणुसकीचा नाश होत आहे, धर्माचा द्वेष होत अर्थहीन दंगे घडत आहेत. त्यामुळे अशा या दंगेखोरी दुनियेत आपण माणूसपण जपतो आहोत की गमावत चाललो
आहोत? हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
आज सगळ्या जगावर अंधार पसरलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. आपण माणूस म्हणून किती जागे आहोत? हिंदुत्वाच्या सत्य मार्गावरून हा घनदाट अंधार गायब होईल का? हिंदुत्वाच्या माणुसकीचा विजय होईल का? धर्मासाठी बलिदान दिलेल्या
निष्पाप व्यक्तींना मोक्ष मिळेल का? म्हणूनच...
माणसा, तू जागा हो, अंधारावर कर तू मात... अतिरेक्यांचा नाश करीत, दे हिंदुत्वाच्या माणुसकीला आधार... दे नव्याने पुन्हा तेजोमय प्रकाश.
- पूजा भिवा परब
पालये, पेडणे