उन्हाळा हा ऋतू थोडासा त्रासदायक आहे wपण फक्त एका गोष्टीमुळे मला मात्र उन्हाळा आवडतो. ती गोष्ट म्हणजे फळांचा राजा आंबा. तुम्हालाही माझ्यासारखं आंबे खायला मिळतात म्हणून उन्हाळा आवडतो का???
उन्हाळ्यात आंब्याचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध होतात. त्यांपैकी गोव्यातला ‘मानकुराद’ हा आम्हा गोवेकरांसाठी आंब्यांचा राजा, कारण या आंब्याची चव सर्वात चांगली असते. पिवळे धमक आंबे बघितले की जीभेला पाणी सुटतं.
अक्षय तृतीया झाली की आंब्यावर ताव मारावा. त्या आधी आंबा खाल्ला तर तो त्रासदायक होऊ शकतो.
आंबा गोड आणि ताकद देणारा असतो.
आंबा खाल्ल्याने त्वचेचा रंग उजळतो.
शरीराचे चांगले पोषण होते.
आंबा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.
आंबा खाल्ला की मन सुद्धा आनंदी होते.
उन्हाळ्यात येणारा थकवा सुद्धा आंबा खाल्ल्याने गायब होतो.
आंबा पचायला मात्र खूप वेळ लागतो.
झाडावर पिकलेला आंबा हा गोड असतो. तुम्ही कधी अख्खा आंबा चोखून खाल्ला आहे का??? नसेल तर लगेच एक अख्खा आंबा चोखून खा. आंबा चोखून खाल्ला की तो लवकर पचतो आणि ताकद देतो, फार उष्णता ही वाढवत नाही.
काहींना जास्त आंबे खाल्ले की शरीरात गर्मी जाणवते, काहींना जुलाब होतात, तर काही जणांच्या अंगावर लाल चट्टे येतात ज्याला पिताम असे म्हटले जाते. आंबा उष्ण आहे म्हणून आंबा खाल्ल्याने त्रास होऊ नये म्हणून आंबा खाण्यापूर्वी तो २-३ तास साध्या पाण्यात ठेवायचा म्हणजे त्यातील अतिरिक्त उष्णता कमी होते व आंबा बाधत नाही.
जेवणानंतर आंबा खाऊ नये. भूक असेल तेव्हा मधल्या वेळेत किंवा जेवणापूर्वी खावा.
आंबा खाऊन लगेच पाणी पिऊ नये, अजीर्ण होऊन पोटात वेदना होऊ शकतात.
आंबा खाऊन पोट दुखायला लागले किंवा पोट टम्म फुगले तर २- ३ चिमूट सुंठ पावडर, १/२ कप पाण्यात घालून ते पाणी प्यावे. याने पोटातील दुखणे थांबते.
उन्हाळ्यात अख्खा आंबा, आमरस, आंबे वडी, मँगो शिरा, आंब्याचे सरबत, आंब्याचे साठ, मँगो जॅम अश्या चविष्ट पदार्थांवर ताव मारा आणि आनंदी रहा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य