पथकाने एकूण ९ आस्थापनांची पाहणी केली. स्वच्छता आणि तत्सम नियमांची पायामल्ली करणाऱ्या रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात आली.
पणजी : राज्यात उकाडा वाढतोय. तापमान वाढल्यामुळे अन्नपदार्थ देखील लवकर खराब होतात आणि अशा पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या देखील वाढतात. दरम्यान एफडीएने हा आणि स्वच्छतेचा मुद्दा लक्षात घेता शनिवारी पर्वरी भागात विशेष मोहीम उघडली. यावेळी येथे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या एकूण ९ आस्थापनांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी तीन रेस्टॉरंट्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
ज्या तीन रेस्टॉरंट्सना कारवाईस सामोरे जावे लागले, त्यांच्या स्वयंपाकघरात एफडीएच्या पथकाला स्वच्छतेचा अभाव प्रकर्षाने जाणवला. पथकाने तत्काळ त्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले असून, आवश्यक त्या सुधारणा करून त्याचा अहवाल एफडीएच्या कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे.
ही तीन रेस्टॉरंट पर्वरी येथील डेल्फिनोच्या मागे कार्यरत होती. इतरांना एफएसएसएआयच्या मानक नियमावली अंतर्गत विशिष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांनी परिसरातील स्वच्छता आणि खाद्यपदार्थाची गुणवत्ता याकडे हयगय करू नये असे कडक निर्देश एफडीएकडून देण्यात आले आहे. संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, आणि लेनिन डिसा यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.