एकाच दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १५२४ जणांना नोटिसा
पणजी: राज्यात वाढत्या रस्ते अपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळेच बहुतांशी अपघात होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राज्यातील अपघाती मृत्यूंची दखल घेत वाहतूक पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५२४ जणांना नोटीस जारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
मागील दोन दिवसात रस्ते अपघात दोघांना आपले प्राण गमवावे लागले. यातील एका अपघातात कार चालक हा गांजा सारख्या अमली पदार्थाच्या अधीन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सदर कार चालक फरार असल्याचेही समजले आहे. तर दुसऱ्या अपघातात ट्रकने दुचाकीला पाठीमागून धक्का दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला ट्रकखाली आल्यामुळे ठार झाली, तर दुचाकीचालक जखमी झाला आहे. भरधाव वेगाने गाडी चालवणे, दारू, ड्रग्ज सारख्या अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवणे अशा घटनांमुळे वाढत जाणारे अपघातांचे प्रमाण वाहतूक पोलिसांसमोर डोकेदुखी बनले आहे. यावर आळा घालण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी कठोर नियम राबवत एक विशेष मोहीम राबवण्यास सुरु केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाला सामोरे जावे लागेल अशा सक्त सूचना गोवा वाहतूक पोलिसांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केल्या आहे.
यात त्यांनी असेही म्हटले आहे कि, वाहन चालकांनी दंड आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे. सोमवारी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ६५८ चालकांना चलन देण्याबरोबरच एकाच दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आणखी १५२४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
#RoadSafety #RoadSafety #DriveResponsibly@DrPramodPSawant @DGP_Goa