आरोग्य वार्ता : जागतिक वैद्यकीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त 'बीएमजे क्वालिटी अँड सेफ्टी' या जर्नलमध्ये ऑनलाइन प्रकाशित झालेल्या संशोधनात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रुग्णालयात येणाऱ्या दर १४ रुग्णांपैकी एका रुग्णाच्या आजाराचे हॉस्पिटलमध्ये चुकीचे निदान केले जाते. आणि हे चुकीचे निदान बऱ्याचदा रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. यातील ८५ टक्के त्रुटी टाळता येऊ शकतात आणि. हे टाळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात नव्या पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. एका माहितीनुसार वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या काही मार्गदर्शक पद्धती या गेल्या ३ दशकांपासून बदललेल्याच नाहीत.
सामान्यतः चुकीचे निदान झालेल्या रोगांमध्ये हार्ट फेल्यूअर, मूत्रपिंड निकामी होणे, सेप्सिस, न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद होणे, बदललेली मानसिक स्थिती, पोटदुखी आणि हायपोक्सिमिया (रक्तातील ऑक्सिजनची कमी पातळी) यांचा समावेश आहे.अभ्यासानुसार, रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या २४ पेक्षा अधिक दिवसांनी त्यास अतीदक्षता विभागात दाखल केल्यास हा प्रकार चुकीच्या निदानाच्या उच्च श्रेणीत मोडतो. त्याच बरोबर एखाद्या रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या ९० दिवसांच्या आत रुग्णालयातच किंवा डिस्चार्ज दिल्यानंतर कॉम्प्लेक्स क्लिनिकल समस्या उद्भवली व यात ट्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर या प्रकरणाचाही त्याच श्रेणीत समावेश केला जातो.
या अहवालासाठी केलेल्या अभ्यासादरम्यान चुकीचे निदान झालेल्या १६० गंभीर प्रकरणांपैकी ५४ प्रकरणे ही २४ तासानंतर अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची होती. त्याचप्रमाणे उपचारानंतर ९० दिवसांच्या आत चुकीच्या निदानामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ३४ होती. तसेच कॉम्प्लेक्स क्लिनिकल समस्या उद्भवलेल्या रुग्णांची संख्या ५२ होती. कमी जोखीम असलेले २० रुग्ण आढळून आले. एका आकडेवारीनुसार कोरोनानंतर चुकीच्या रोग निदानंत प्रचंड वाढ झाली असून, गेल्या चार वर्षांत चुकीच्या रोग निदानामुळे एकट्या आशिया खंडात ४.५० लाख हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकारच्या अभ्यासाचे प्रयोजन आरोग्य-वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या चुकीच्या पद्धती उघड करणे होते. एखाद्या गंभीर रोगाचे चुकीचे निदान होणे हे अक्षम्य. एखादी किरकोळ चूक देखील घातक ठरू शकते. दरम्यान सशोधकांनी जुनाट मार्गदर्शक तत्वे बदलण्याचा सल्ला दिला असून, रोग निदानासाठी नव्या पद्धती शोधाव्यात व त्यांचे डॉक्युमेंटेशन करावे तसेच प्रसंगी एआय टूल्स किंवा तत्सम मॉडेल्सची मदत घ्यावी असेही सुचवण्यात आले आहे. २१ व्या शतकात वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड संशोधन होत आहे. बऱ्याचदा नवे संशोधन हे फक्त पुरस्कार सोहळ्यात गौरवण्या-मिरवण्यासाठीच केले जाते. या गोष्टी सामन्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असेही या अहवालाच्या सरते शेवटी म्हटले आहे.