यंदा मान्सूनने जोरदार हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे सरासरीपेक्षा आठ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली . खरीप पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे भविष्यात धान्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
कृषी वार्ता : गेले ३-४ महीने संपूर्ण देश व्यापल्यानंतर मान्सूनने निरोप घेतला आहे. गेल्या चार वर्षांची सरासरी पाहता यंदा ८ टक्के जास्त पाऊस पडल्याचे समोर आले आहे. २०२० साली भारतात १०८ टक्के पाऊस पडला होता. दरम्यान मान्सूनच्या आगमनापूर्वीच हवामान खात्याने यंदा मान्सूनच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने खरीप पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचे फायदे कृषी क्षेत्रात दिसून येतील.
भारतात शेतीचे तीन हंगाम आहेत. उन्हाळा, खरीप आणि रब्बी. मान्सूनच्या पावसावर अवलंबून खरिपाची लागवड जून आणि जुलैमध्ये होते. याची काढणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. तर रब्बी पिकांची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते, याची काढणी जानेवारी महिन्यात होते. तर उन्हाळी पिके रब्बी आणि खरीब हंगामात घेतली जातात. कडधान्ये, भरडधान्य, ऊस, तेलबिया यांच्या लागवडीत गेल्याकाही वर्षांत वाढ पाहायला मिळत असून, हा आलेख असाच वाढता राहिल्यास आगामी काळात बाजारपेठेतील धान्यांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता येईल.
सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे केवळ खरीप पिकांनाच फायदा होत नाही तर आगामी रब्बी पिकांनाही हाच फायदा होतो. भारतातील खरीप हंगामात पारंपारिकपणे केली जाणारी शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. पावसामुळे सिंचन सोपे होते. गेल्या वर्षी १०८८.२२ लाख हेक्टर जमिनीवर खरीप पीक घेण्यात आले होते. तर यावर्षी ११०८.५० लाख हेक्टर जमिनीवर खरीप पीक घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खरीप लागवडीत २०२२च्या तुलनेत गेल्यावर्षी १.९ टक्के वाढ झाली.