पणजी : १४ दिवसांपूर्वी तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावर असलेल्या आखाडा फेरी धक्क्यावर घडलेल्या दुर्घटनेने जुने गोवे पोलिसांची झोप उडवली होती. यातून बचावलेल्या तरुणीने याबाबत खुलासा केला. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासकाम करत हुबळी येथून दोघांना अटक केली. दरम्यान पोलिसांना बाशुदेवचा थांगपत्ता अद्यापही लागलेला नाही. यामुले पोलिसांना तपास वेगळ्या दिशेने वळवावी लागली आहे.
बाशुदेव हा अपघातात मृत्यू पावलाच नाही या हिशेबाने पोलीस आता तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी कुटुंब हे मूळचे नेपाळचे व ते गुजरातमध्ये व्यवसायानिमित्त स्थायीक झाले होते. पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवरील विमानतळ, रेल्वे स्थानक, आंतर राज्य बस स्थानके आणि तत्सम ठिकाणी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
दरम्यान, बाशुदेवच्या मोबाईलवर ४ सप्टेंबर रोजी कॉल केले असता ४ सेकंद तसेच ३५ सेकंदासाठी कुणीतरी फोन उचलला होता असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी या अनुषंगाने तपास केला असता पुन्हा याबाबत कोणतेही धागेदोरे पोलिसांना आढळून आले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी किनारी पोलीस, अग्निशमन दल तसेच नौदलाने देखील अविरत मेहनत घेतली होती.
दुर्घटना घडल्यानंतर बाशुदेवची मैत्रीण चालत नजीकच्या घरात मदतीसाठी जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. दरम्यान बाशुदेवच्या भावाने त्या घरातील मंडळींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पायाखालून जमीनच सरकली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मुलगी रात्री आली होती व तिने तिचा अपघात झाल्याचे सांगितले.
दरम्यान घरातील एका सदस्याच्या मोबाईलवरून तिने आपल्या आईला फोन केला व आपल्या मित्राचा नंबर मिळवला. तेनंतर त्याच्याशी बराच वेळ बोलली. एवढे सगळे होऊनही बाशुदेवला वाचवण्यासाठी या घरातील लोकांची मदत का घेण्यात आली नाही असा सवाल बाशुदेवच्या भावाने केला आहे. दरम्यान या आणि इतर अनेक बाबींबद्दल संशय व्यक्त झाल्याने बाशुदेवच्या मैत्रिणीला पुढील ४ दिवस पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.