गोव्याला गरज पर्यावरणीय गणेशोत्सवाची

आज ज्या पद्धतीने आम्ही सण, उत्सव साजरे करतो त्यातून निसर्गातील कित्येक घटकांचा जसा ऱ्हास होतो तसेच आरोग्याचा गुंता बिकट होतो आणि मानसिक शांती भंग पावते आणि त्यामुळे गणेशोत्सवासारख्या उत्सवाचे स्वरूप पर्यावरणीय मूल्यांद्वारे होईल, यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Story: विचारचक्र |
03rd September, 11:58 pm
गोव्याला गरज पर्यावरणीय गणेशोत्सवाची

गणपती ही देवता कला, संस्कृती, बुद्धीशी निगडित म्हणून पुजली जात असून, गजमुखी असणारी ही देवता म्हणजे नाना तत्त्वे, नाना संचिते यांचा संगम आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला ऊर्जा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात १२३ वर्षांपूर्वी निर्माण केली. परंतु आज कौटुंबिक आणि सार्वजनिक स्तरावर उत्सव साजरा करण्याची परंपरा असताना लोकमान्य टिळकांचा उद्देश लुप्त झालेला असून, बऱ्याच ठिकाणी या उत्सवामुळे हवा, ध्वनी आणि जल प्रदूषणाची समस्या अक्षरशः नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. उत्खनन म्हणजे सौहार्दता, शिस्त, सौजन्य याचे जणुकाही विस्मरण समाजा‌ला होत असून, आज त्याची जागा प्रकर्षाने धांगडधिंगाणा, ध्वनी प्रदू‌षण, केरकचऱ्याची समस्या, प्रदूषित पाणी आदी समस्यांनी घेरलेली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील पर्यावरण, परिसंस्था, वन्यजीव यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वावरणे गरजेचे असताना, आज आपले सण, उत्सव प्रदूष‌णकारी आणि विनाकारण मनःस्ताप देण्यास कारणीभूत ठरू लागलेले आहेत. खरेतर गणपती म्हणजे जंगलातल्या सस्तन प्राण्यांपैकी महाकाय आणि बुध्दिमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हत्तीचेच रूप. या गजमुखी देवतेसाठी आपण मखर सजावटीपासून माटोळी बांधण्यापर्यंत तसेच उजेडाची व्यवस्था करताना जी उध‌ळपट्टी करत आहोत, त्याच्यावर धार्मिक स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली निर्बंध घालण्यास आपण धजत नाही. त्यामुळे आपण कौटुंबिक असो अथवा सार्वजनिक स्तरावर या उत्सवाच्या सादरीकरणाला पर्यावरण मूल्यांची जोड देणे, आजच्या काळाची गरज झालेली आहे.

आपल्या पूर्वजांनी जी सण, उत्सवांची परंपरा निर्माण केली त्यामागे निसर्गाचे जतन, आरोग्याची काळजी, मनाचे संतुलन टिकावे असे प्रयोजन असले पाहिजे. परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही हे सण, उत्सव साजरे करतो त्यातून निसर्गातील कित्येक घटकांचा जसा ऱ्हास होतो तसेच आरोग्याचा गुंता बिकट होतो आणि मानसिक शांती भंग पावते आणि त्यामुळे गणेशोत्सवासारख्या उत्सवाचे स्वरूप पर्यावरणीय मूल्यांद्वारे होईल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणपती हा केवळ पर्वत धारण करणाऱ्या वसुंधरेचा म्हणजेच पार्वतीचा पुत्र असल्याने त्याची पूजा मृण्मयी मूर्तीच्या रुपात केली जाते. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तीला उपलब्ध असलेल्या निसर्गातील जलरंगांनी रंगवला जायचा आणि त्यामुळे अशा गणपतीचे जलस्त्रोतांत विसर्जन केले तर विशेष प्रदूषण होत नसे. शाडूच्या मूर्ती वजनदार आणि किंमत ज्यादा असल्याने गोव्यात काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची कायद्याने विक्री करणे बंदी असताना लोक घरी नेऊन उत्सवाप्र‌संगी पूजा करतात. अशा मूर्ती पाण्यात सहजासहजी विरघळत नसल्याने भरतीला किनाऱ्यावर वाहून आलेल्या किंवा जलस्रोतील पाणी आटल्यावर उघड्या पडलेल्या मूर्ती पहायला मिळतात. बऱ्याचदा जलस्रोतांच्या उगमावर घट्ट बसल्याने, पाण्याचा प्रवाहही खंडित होण्याचे प्रकार उद्‌भवतात. पाण्यातल्या सेंद्रीय पदार्थांच्या विघटनावरही दुष्परिणाम होत असतात. आज गोव्यात केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच नव्हे तर शाडूच्या मूर्तीही रंगवताना रासायनिक रंगांचा वापर केला जातो. अशा रंगांमध्ये शिसे आणि तत्सम घातक रासायनिक घटक असल्याने, त्यांचा संयोग पाण्याशी होऊन हे पाणी पिण्यास आणि आंघोळ करण्यासाठी घातक होते. तळ्यात अमोनिया, हायड्रोजन सल्फाईडसारख्या वायूची निर्मिती होऊन, हा परिसर असह्यकारक होतो आणि त्यातल्या जीवांवरही प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याची पाळी येते.

गणपती विसर्जनावेळी पाने, फुले आदींचे निर्माल्य जलस्त्रोतात टाकण्याऐवजी आपल्या लागवडीसाठी, वृक्षवेलींना सेंद्रीय खत म्हणून वापरणे फायदेशीर ठरलेले आहे. गणपती पूजेसाठी पूर्वी भाविक आपल्याच परसबागेतील जास्वंदी, अनंत, गुलाब, सोनचाफा आदी फुलांचा प्रामुख्याने वापर करीत असत. आज ताजी फुले पहाटे काढणे किंवा परसबागा इतिहासजमा झाल्याने बाजारात मिळणारी रंगबेरंगी आणि आकर्षक प्लास्टिकची फुले वापरणे लोकांना सोईस्कर वाटू लागलेले आहे. अशी फुले उत्सव आल्यावर काहीजण पाण्यात फेकून देतात आणि त्याचे दुष्परिणाम जलस्रोतांवर होतात. आज बाजारपेठेत थर्माकोल व तत्सम अविघटनशील पदार्थांपासून तयार केलेली लक्षवेधक मखरे विक्रीला असतात. ती खरेदी करून त्यांचा वापर उत्सवात मोठ्या प्रमाणात केला जातो. आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की थर्माकोल फक्त अविघटनशीलच नव्हे तर ते ज्वालाग्राही असल्याने त्याचा पर्यावरणाला धोका असतो. आपल्या गोव्यात केळीच्या गब्यापासून कल्पकरितीने मखर निर्माण करण्याचे कलाकौशल्य होते. केळीचे गबे, झाडांच्या साली, पानफुले, कागदाचे पुठ्ठे यांचा वापर करून आपण खूप सुरेख मखर सजावट करू शकतो आणि उत्सव आल्यावर त्याचा उपयोग सेंद्रीय खत म्हणून करता येतो.

गोवा - कोकणात गणपतीच्या माथ्यावर मोसमी फुले, फळे, वृक्षवेली यांचा वापर माटोळी सजविण्यासाठी करण्याची परंपरा आहे. माट्टूला, घागऱ्या, कवंडळा, माकडलिंबू, कार्वी, आम्र पल्लव, पुंगीफळे, जायफळ, टेट्र, मेडशिंग, बोणकळो... असे निसर्गात उपलब्ध असलेले असंख्य घटक गणपतीची माटोळी सजविण्यासाठी वापरण्यामागे कोणती वन‌स्पती औषधी, कोणती विषारी, कोणती फुलेफळे, कंदमुळे देणारी याचे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देणे हे प्रयोजन होते. आज अलोपॅथिक औषधांच्या वावटळीत भारतीय लोकमानसाने पारंपरिक वनौषधी आणि निसर्गावर आधारित उपचार पद्धतीकडे दुर्लक्ष केल्याकारणाने हा वारसा विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. बाजारात माटोळीचे सारे सामान उपलब्ध असल्याने, जंगलात जाऊन वृक्षवेली, मोसमी फुले, फळे यांचे ज्ञान आकलन करून घेण्याची तसदी अभावानेच घेतली जाते.

गणपतीच्या सजावटीसाठी बेसुमार विजेचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने, अशा दिव्यांच्या झगझगामुळे विजेचा गैरवापर आणि उधळपट्टी केली जाते याचे भान आपणाला नसते. उत्सवाप्रीत्यर्थ ध्वनिक्षेपकाचा वापर, ध्वनी प्रदूषणाचा अतिरेकी वापर करणारे संगीत यामुळे हृदयविकार, मधुमेहच नव्हे तर अन्य आजारी रुग्णांना या दिवसांत मनःस्तापाला सामोरे जावे लागत असते. गणपतीची पूजा, विसर्जनात दारु‌कामाची वारेमाप आतषबाजी हे प्रतिष्ठेचे लक्षण झाल्याने त्यामुळे आपल्या कृत्याद्वारे हवा, ध्वनी, जल प्रदू‌षणाला आपण आमंत्रण देतो याचे विस्मरण लोकांना होत असते. उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी केली जाते. या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही गणेशोत्सव साजरा केला तर तो केवळ आमच्या कुटुंबासाठी नव्हे तर परिसरासाठी आनंदवर्धक ठरेल. पर्यावरणीय  मूल्यांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला तर सुखकर्त्याची खरी कृपा आपल्यावर होईल.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५