अधिकाऱ्यांनी दाखल घेऊन महोत्सव रद्द करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केली आहे. असे न केल्यास समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक परिसंस्था, वन्यजीव आणि सागरी जीवसृष्टीला गंभीर धोका निर्माण उद्भवू शकतो असा युक्तिवाद त्यांनी मांडला आहे.
मोरजी (पेडणे): ग्लोफेस्ट-द लँटर्न फेस्टिव्हल उद्या २५ मे रोजी संध्याकाळी मोरजी समुद्रकिनाऱ्यावर साजरा केला जाणार आहे. यामध्ये लोक एकत्र येतात आणि कागदी कंदील आकाशात सोडतात आणि आनंद साजरा करतात. चीनी नववर्षाच्या १५ दिवशी चीनमध्येही अशाच प्रकारचा महोत्सव साजरा केला जातो. त्यावरूनच गोव्यातही अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावरूनच स्थानिक पर्यावरणप्रेमींनी यास आक्षेप घेतला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ म्हणून निर्दिष्ट केलेल्या ऑलिव्ह रीडले कासवांचे संवर्धन क्षेत्र आहे. दरवर्षी शेकडो कासव या ठिकाणी अंडी देण्यासाठी येतात. कासव संवर्धन प्रक्रिया आधीच अनेक अडचणींना समोरे जात असून हा महोत्सव किंवा या सारखे कार्यक्रम येथे पार पडल्यास भविष्यात कासवांची ही प्रजातीच धोक्यात येऊ शकते असे मत काही पर्यावरणवाद्यांनी मांडले आहे.
पर्यावरण आणि तत्सम खात्यांशी निगडीत अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन महोत्सव रद्द करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. असे न केल्यास समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक परिसंस्था, वन्यजीव आणि सागरी जीवसृष्टीला गंभीर धोका निर्माण उद्भवू शकतो असा युक्तिवादही त्यांनी मांडला आहे. मोरजी समुद्रकिनाऱ्यावरील या संवर्धन क्षेत्रात अतीप्रखर उजेड, आवाज आणि मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यास कासवांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, सद्यघडीस मोरजी समुद्रकिनाऱ्यावर १० हून अधिक सक्रिय ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी आहेत. 'ग्लोफेस्ट-द लैंटर्न फेस्टिवल' दरम्यान वापरल्या जाणारे आकाशकंदील ही कागद आणि तारांपासून बनलेले असतात. यदाकदाचित जर आकाशकंदील वर न जाता समुद्रात किंवा किनाऱ्यावरच पडल्यास यात पक्षी, कासव, इतर संरक्षित जीव अडकू शकतात. जरीही या गोष्टी बायोडिग्रेडेबल असल्या तरी त्यांचे विघटन होण्यास बराच अवधी लागतो. तसेच आकाशात असे आग लावलेले कंदील सोडणेही धोकादायक आहे. कारण आजूबाजूला असलेल्या घर, दुकाने, माड किंवा इतर गोष्टींना आग लागण्याची शक्यता आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम अॅम्युसेंट इवेंट्स (Amuseant Events) नावाच्या कंपनीने आयोजित केला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीसह व्हिडीओसह या महोत्सवाच्या तिकिटांची जाहिरात आणि विक्रीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. गदारोळ झाल्यानंतर कंपनीने, ते एकतर कार्यक्रमाच्या तारखेत बदल करतील किंवा कार्यक्रमाचे तरी स्थळ बदलले जाईल असे इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच यावर तोडगा देतांना कंपनीने म्हटले आहे की, आम्ही हे कंदील एका वायरद्वारे जमिनीला जोडू. त्यामुळे ते केवळ १०० फूट उड्डाण करतील आणि त्याच ठिकाणी परत येतील. यातून कोणतेही नुकसान होणार नाही. कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळाची स्वच्छताही करू असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान पर्यटन खात्याकडून याप्रकारच्या कोणत्याही महोत्सवासाठी आवेदन करण्यात आलेले नाही तसेच कोणत्याही प्रकारची परवानगीही देण्यात आली नाही. दरम्यान एकंदरीत स्थिती पाहता पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनीही २३ मे रोजी मांद्रे पोलीसांना पत्र लिहून कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी यास्थळी आवश्यक फौजफाटा तैनात करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.