आंब्याचे दर उतरले; आले, लसूण पुन्हा महाग

आले २४०, तर लसूण ३२० रुपये प्रती किलो

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th April, 11:37 pm
आंब्याचे दर उतरले; आले, लसूण पुन्हा महाग

पणजी : बाजारात पुरवठा जास्त असल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत. सोमवारी पणजी बाजारात मानकुराद आंब्याचे दर आकारानुसार १ ते २ हजार रुपये डझन होते. तर हापूस आंबा ५०० ते ७०० रुपये प्रती डझन होता. मागील आठवड्याच्या तुलनेने बाजारात अन्य भाज्यांचे दर स्थिर होते. आले आणि लसणाचे दर मात्र वाढले आहेत. आले २४० रुपये तर लसूण ३२० रुपये प्रती किलो झाला आहे.
मागच्या आठवड्याच्या तुलनेत पणजी बाजारात कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर १० रुपयांनी वाढून प्रत्येकी ४० रुपये प्रती किलो झाले. मिरचीचा दर २० रुपयांनी कमी होऊन १४० रुपये किलो झाला होता. सोमवारी फलोत्पादन गाड्यांवर कांदा २५ रु., टोमॅटो २३ रु., बटाटा ३५ रु. तर मिरची ७० रुपये प्रती किलो होती. तर गाजर ३४ रु., कोबी २७ रु. आणि भेंडी २० रुपये प्रती किलो होती.
पणजी बाजारात लिंबू आकारानुसार ७ ते १० रुपये प्रती नग होता. मटार, शिमला मिरचीचे दर १२० रुपये किलो होते. वांगी १०० रुपये, ढब्बू मिरची १०० ते १२० रुपये, भेंडी ६० ते ८० रुपये, दोडका ८० रुपये, गाजर ६० ते ८० रुपये प्रती किलो दराने विकले जात होते. कोबी ४० रुपये किलो, तर फ्लॉवर ३५ रुपये प्रती गड्डा होता. याशिवाय कोथिंबीर २०, तर पुदिना आणि तांबडी भाजी १० रुपयाला जुडी होती.

फुलांच्या दरात वाढ
मराठी नववर्षाचा पहिला सण असलेल्या गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला असताना, बाजारात फुलांचे दर कडाडले आहेत. मंगळवारी गुढीपाडवा सणानिमित्त राज्यात सर्वत्र झेंडूसह अन्य फुलांना मागणी होती. बहुतेक ठिकाणी फुलांचे दर नेहमीपेक्षा ५० ते १०० रुपयांनी वाढलेले होते. 

हेही वाचा