माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th February, 03:38 pm
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला उभारी देण्यासाठी एका बाजूने वरिष्ठ नेते राहुल गांधी जीवाचे रान करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेतून सामान्य जनतेशी संवाद साधत आहेत. पण, दुसऱ्या बाजूने त्याचे दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे सत्र सुरू झाले आहे. आज सकाळी महाराष्ट्रातील बडे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेससमोरी संकटे कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस त्यांचे खासदार आणि आमदार पक्षातून निघून जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अनेक आमदार, लोकसभा आणि राज्यसभा खासदार भाजप सोडून एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकीचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भारतीय संसदेचे माजी सदस्य आणि मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हेही पक्षावर नाराज आहेत. ते लवकरच पक्ष सोडू शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता सूत्रांकडून येत आहे. अनेक आमदार भाजपच्या एनडीए आघाडीत सामील होण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो. राहुल गांधी यांनी न्याय यात्रा सुरू केल्यापासून पक्षात अशा घटना वाढत आहेत. काँग्रेस आपल्या नेत्यांना वाचवू शकलेली नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तृळातून उमटत आहे.