बिनधास्तपणे गुंतवणूक करण्याचेही आवाहन
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील खाण व्यवसाय यावर्षीच सुरू होईल. शिवाय पुढील सात ते आठ वर्षे तो पूर्ण क्षमतेने सुरू राहील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या व्यवसायात बिनधास्तपणे गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.
गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेला खाण व्यवसाय अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याचा फटका राज्याच्या तिजोरीला बसत असून, खाणींवर आधारित व्यवसायही ठप्प आहेत. खाणी बंद पडल्यापासून राज्यातील बेरोजगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे खाण अवलंबितांच्या नजरा खाणी कधी सुरू होतील, याकडे लागलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शाश्वत खाण व्यवसाय या वर्षापासूनच सुरू होईल, अशी ठोस हमी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्यामुळे खाणींवर अवलंबून असलेल्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज्यातील खाण व्यवसाय यावर्षीच सुरू होईल. पुढील सात-आठ वर्षे तो पूर्ण क्षमतेने सुरू राहील.
सरकारने डंप धोरण निश्चित केले आहे. ९ खाण पट्ट्यांचा लिलावही केला आहे. त्यामुळे खाणी सुरू करण्यात अडचणी येणार नाहीत.
पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊन खाण व्यवसाय सुरू केला जाईल.