पणजी :आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी स्वीकारण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल, हे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचे विधान त्यांच्या राजकीय अनिश्चिततेपोटी आले आहे. पक्षाचे विद्यमान आमदार असताना त्यांनी असे विधान करणे संयुक्तिक नव्हते, अशी टीका प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी केली आहे.
भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून इतर पक्षांतील नेत्यांना सामावून घेतले जात असल्याचा काब्राल यांचा दावा फेटाळून लावताना त्यांनी जुना संदर्भ दिला. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये येण्याआधी खुद्द काब्राल हे काँग्रेसशी संबंधित होते.
त्यांच्यात काही गुण दिसले म्हणूनच त्यावेळी त्यांना सामावून घेण्यासाठी पक्षाने इतरांना डावलून उमेदवारी दिली होती, अशी आठवण दामू नाईक यांनी करून दिली.
पक्षात झालेले अंतर्गत बदल आणि काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश यावर काब्राल यांनी अलीकडेच जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर, आगामी २०२७ च्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याबाबत आपल्याला दोनदा विचार करावा लागेल, असे नीलेश काब्राल म्हणाले होते.
काब्राल यांच्या भूमिकेवर पक्षांतर्गत चर्चा
काब्राल यांच्या विधानानंतर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडचडे मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी विद्यमान आमदार म्हणून काब्राल यांनी केलेल्या विधानावर सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिली आहे.


