वाळपई : येथील न्यायालयाजवळ युनिटी विद्यालयासमोर जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी वाहत असून, या प्रकारामुळे पाण्याची नासाडी होत आहे. संबंधितांनी यावर उपाययोजन करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या पावसाळा सुरू असला तरी पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
युनिटी विद्यालयासमोरच ही जलवाहिनी फुटल्याने विद्यार्थ्यांसह या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित खात्याने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


