
नवी दिल्ली : चीनने भारतीय सीमा परिसरात (India-China Border) युद्ध सराव करत भारताला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी सैनिकांसोबत गलवान खोऱ्यात सहा वर्षांपूर्वी झालेल्या संघर्ष ठिकाणापासून जवळच हा युद्ध सराव करण्यात आला आहे. हे ठिकाण भारत-चीन सीमेपासून केवळ ६० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. सरावात अत्याधुनिक शस्त्र व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
चिनी सैन्याच्या चौथ्या मोटराईज्ड इप्रंट्री डिव्हिजनने हा युद्ध सराव केल्याची माहिती आहे. तिबेटमधील शिनजियांगमधील अक्सू प्रांतात ही रेजिमेंट तैनात आहे. चिनी सैन्याने या सरावात या भागातील डोंगराळ आणि खडबडीत भूभागासाठी विशेषत: तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित तोफांचा वापर केला. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनने मोठ्या प्रमाणावर लष्करी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. चीनने पॅगॉंग सरोवराजवळ एक पूल देखील बांधला असून; यामुळे प्रत्यक्ष युद्धकाळात सैन्य हलविण्यास मदत होणार आहे. युद्ध सराव त्याच सीमेजवळ करण्यात आला आहे. भारताकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
रणगाडाविरोधी तंत्रज्ञान, हवाई सुरक्षा. यंत्रणेचा ही वापर
युद्ध सरावात चीनने अनेक अद्ययावत यंत्रणांचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मल्टिपल लॉंच रॉकेट यंत्रणा, पीएचएल-११ रॉकेट, एचक्यू-१७ श्रेणीतील टॅक्टिकल एअर डिफेन्स यंत्रणेचा वापर करण्यात आला. रणगाडा विरोधी क्षेपणास्रांचा सरावात विशेष वापर करण्यात आला. शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहनांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यात आहे.