छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५२ वर्षे पूर्ण होत आहेत. रायरेश्वराची प्रतिज्ञा, मावळ्यांचे बलिदान आणि शिवरायांच्या अद्वितीय विचारधारेचा वेध घेणारा विशेष लेख.

भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक साम्राज्ये उदयास आली आणि लयासही मिळाली. अनेक राजांनी दिल्लीच्या तख्तापासून ते दक्षिणेच्या पठारापर्यंत आपली सत्ता गाजवली. पण जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले त्यास इतिहासात तोड नाही. शिवराज्याभिषेकाला यंदा ३५२ वर्षे पूर्ण होत आहेत.

हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर हा भारतभूमीत राहणाऱ्या आणि स्वतःला खऱ्या अर्थाने हिंदवी म्हणवणाऱ्या प्रत्येक समाजबांधवाच्या स्वातंत्र्याचा, अस्मितेचा आणि आत्मसन्मानाचा जाहीर उद्घोष होता. शिवपूर्व कालखंडात सुमारे शंभर वर्षांपासून मराठी माणसाच्या मनातून जो स्वाभिमान पूर्णपणे नष्ट झाला होता, त्या स्वाभिमानाला पुन्हा जिवंत करणारी ही एक अभूतपूर्व घटना होती. ५ जून १६७४ च्या संध्याकाळी रायगडावर या सुवर्ण सोहळ्याला सुरुवात झाली आणि मध्यरात्रीच्या अथांग शांततेत एका नव्या स्वतंत्र युगाचा जन्म झाला.

जर आपण ऐतिहासिक घडामोडींचा आढावा घेतला तर आपल्याला समजेल की शिवरायांनी अठरापगड जातीजमातींच्या समाजबांधवांना एकत्र करून स्वराज्याची जी हाक दिली, त्यामागे केवळ सत्ता मिळवणे हा उद्देश नव्हता. परकीय आक्रमकांच्या अमानुष गुलामगिरीच्या जोखडातून या भूमीला मुक्त करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते. रयतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू शकणारा, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारा आणि जुलूम,

अन्याय व अत्याचार संपवणारा एक लोककल्याणकारी राजा आता निर्माण झाला होता. परंतु, या राज्याला एका प्रस्थापित, सर्वमान्य आणि कायदेशीर राज्यव्यवस्थेची अत्यंत गरज होती. मुघल, सुलतान, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज किंवा जंजिऱ्याचा सिद्धी यांपैकी कोणताही परकीय सत्ताधीश छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा मानण्यास तयार नव्हता. त्यांच्या नजरेत महाराज हे विजापूरच्या एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते. रयतेच्या मनात महाराजांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर असला, तरी प्रशासकीय व्यवहारात मुघल किंवा सुलतानांचेच शिक्के वापरावे लागत, यामुळे रयतेची द्विधा मनस्थित्री होत असे. राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी, लोकांच्या मनात दृढ विश्वास निर्माण करण्यासाठी आणि या सर्व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी महाराज हे केवळ लोकनेते असून चालणार नव्हते, तर त्यांचे अभिषिक्त सम्राट होणे ही त्या काळाची सर्वात मोठी गरज बनली होती.

जेव्हा महाराज, गागाभट्ट यांच्या सूचनेनुसार रामजी दत्तो यांनी बनवलेल्या सुवर्ण सिंहासनाकडे मार्गक्रमण करत होते. इतिहासकार सांगतात की, त्या सिंहासनाची प्रत्येक पायरी चढताना महाराजांच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील सुख-दुःखाच्या स्मृतींचा एक मोठा कल्लोळ माजला होता. बालसवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची प्रतिज्ञा, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा काढलेला कोथळा, पन्हाळगडाच्या वेढ्यात स्वतःचे प्राण पणाला लावणारे शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे पावन खिंडीतील सर्वोच्च बलिदान, शाहिस्तेखानाची लाल महालात केलेली फजिहत आणि पुरंदरच्या लढाईत प्राणांची आहुती देणारे मुरारबाजी देशपांडे या सर्वांच्या आठवणी महाराजांना व्याकुळ करत होत्या. आग्रा येथील कैदेतून सुटका करून देणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद, कोंढाण्यासाठी मुलाचे लग्न बाजूला ठेवून धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे आणि अवघ्या सहा साथीदारांसह बहलोलखानाच्या सैन्यावर तुटून पडणारे सेनापती प्रतापराव गुजर, या समस्त वीरांच्या रक्ताने आणि त्यागाने हे स्वराज्य उभे राहिले होते. म्हणूनच, हा राज्याभिषेक केवळ शिवरायांचा नव्हता, तर तो या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या समस्त मावळ्यांच्या समर्पणाचा राज्याभिषेक होता.

या प्रवासातील सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांकडे अवघे १२ किल्ले आणि एक लक्ष होनांचा मुलुख शिल्लक राहिला होता. परंतु, तिथून पुढे केवळ नऊ वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीत महाराजांनी आपल्या अफाट युद्धकौशल्याच्या आणि रणनीतीच्या जोरावर तब्बल ३४८ नवीन किल्ले जिंकले आणि राज्याभिषेकाच्या वेळी ३६० किल्ल्यांचे अफाट साम्राज्य उभे केले. जेव्हा महाराज या साम्राज्याचे 'छत्रपती' म्हणून सिंहासनावर आरूढ झाले, तेव्हा रायगडाचा सारा आसमंत 'क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय' या घोषणांनी आणि तोफांच्या गडगडाटाने दुमदुमून गेला. शतकानुशतकांच्या अंधारकोठडीतून बाहेर पडलेला तो एक देदीप्यमान प्रकाशाचा सूर्य होता, ज्याने भारतीय संस्कृती आणि परंपरांना पुन्हा एकदा नवजीवन दिले. या राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतःची नवीन 'शिवराज्याभिषेक शक' ही कालगणना सुरू केली, 'शिवराई' आणि 'होन' ही नवीन नाणी चलनात आणली आणि परकीय फारसी भाषेचा प्रभाव कमी करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांच्याकडून 'राज्यव्यवहार कोश' तयार करून घेतला.

या ऐतिहासिक गाथेचा सर्वात महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा पैलू म्हणजे शिवरायांची राजकीय आणि धार्मिक दूरदृष्टी. शिवपूर्व काळात आणि शिवरायांनंतरही भारतात अनेक राजे झाले, परंतु परकीय आक्रमकांच्या आक्रमणामागील केवळ साम्राज्यविस्तार किंवा संपत्ती लुटणे हाच उद्देश नसून आपल्या धर्माचा प्रसार करणे हा देखील मुख्य हेतू होता, हे समजण्याची क्षमता केवळ छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. इतर सत्ताधीशांना या मूळ उद्दिष्टाचे आकलन न झाल्यामुळे त्यांनी आपापसातील हेवेदावे मिटवण्यासाठी किंवा एकमेकांचा पराभव करण्यासाठी थेट परकीय आक्रमकांचीच मदत घेतली. राजा जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध मोहम्मद घुरीला बोलावले, तर नानासाहेब पेशव्यांनी मराठ्यांचेच आरमार बुडवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. रघुनाथरावांनी पेशवेपदासाठी इंग्रजांचे पाय धरले, तर कर्नाटकच्या नवाबाच्या मुलांनी गादीसाठी फ्रेंच आणि इंग्रजांना आमंत्रित केले. ही आत्मघातकी मानसिकता शिवरायांच्या काळात कधीही दिसली नाही. हा देश आपला आहे, इथे आपलीच सत्ता असायला हवी आणि परकीयांना राहायचे असेल तर त्यांनी आपल्या अटींवर राहिले पाहिजे, ही शिवरायांची ठाम भूमिका होती.

आजच्या आधुनिक काळात आपण हा शिवराज्याभिषेक दिन का साजरा करायचा, हा तरुण पिढीसमोरील एक मोठा प्रश्न असू शकतो. त्याचे उत्तर असे आहे की, ज्या उदात्त आणि व्यापक उद्देशाने शिवरायांनी या स्वराज्याची पायाभरणी केली होती, तो उद्देश आजही पूर्ण झालेला नाही. महाराजांना लाभलेले अल्पायुष्य यामुळे त्यांचे अनेक संकल्प अपूर्ण राहिले. जेव्हा त्यांचे सरदार रावजी सोमनाथ यांनी स्वराज्याच्या सीमांचा विस्तार कुठपर्यंत करायचा, असा प्रश्न विचारला होता, तेव्हा महाराजांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले होते की, "सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा आहे." आजच्या या धर्मनिरपेक्ष देशात या विधानावर अनेक तर्क-वितर्क आणि संशोधने होत असली, तरी शिवरायांची ही भौगोलिक आणि सांस्कृतिक एकात्मतेची विचारधारा आजही आपल्या देशासाठी तितकीच मार्गदर्शक आहे. म्हणूनच, शिवरायांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या आत्मसन्मानाची ज्योत मनात कायम ठेवण्यासाठी, केवळ एक उत्सव म्हणून नव्हे, तर शिवरायांची मूळ विचारधारा समजून घेऊन हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करणे ही आजच्या तरुणाईची सर्वात मोठी जबाबदारी ठरते.
