मध्यरात्री स्ट्राँग रूमबाहेर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी राजकीय वातावरण अत्यंत तापले असून, स्ट्राँग रूममधील ईव्हीएम आणि मतपत्रिकांच्या सुरक्षिततेवरून मोठा गदारोळ निर्माण झाला है. गुरुवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत, खुदीराम अनुशीलन केंद्राबाहेर आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्वतः मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास भवानीपूर येथील शेखावत मेमोरियल स्कूलबाहेर जाऊन ठिय्या मांडला आणि संपूर्ण रात्र ईव्हीएमची स्वतः राखण केली.

तृणमूल काँग्रेसने असा आरोप केला आहे की, स्ट्राँग रूमची सील तोडण्यात आली असून ईव्हीएम आणि मतपत्रिकांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तृणमूलच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर संगनमत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तृणमूलचे उमेदवार कुणाल घोष आणि डॉ. शशि पांजा यांनी या घटनेला दिवसा-ढवळ्या लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, दुपारी ३:३० वाजता एक ईमेल आला होता, ज्यामध्ये स्ट्राँग रूम संध्याकाळी चार वाजता पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तृणमूलच्या प्रतिनिधींना आत जाण्याची परवानगी दिली जात नाही, तर भाजपच्या कार्यकर्त्यांना आत बोलावले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ तृणमूल नेत्यांनी नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेर आंदोलन सुरू केले होते. तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला 'दिल्लीचे जमीनदार' अशी उपमा देत बंगालची जनता त्यांनी दिलेला जनादेश असा चोरीला जाताना पाहून गप्प बसणार नाही, अशी कडक चिथावणी दिली आहे.

या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मानिकतला येथील उमेदवार तापस रॉय आणि चौरंगीचे संतोष पाठक यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की, अशा संवेदनशील ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना अशी गर्दी आणि घोषणाबाजी करण्याची परवानगी कशी देण्यात आली. या वेळी दोन्ही पक्षांचे समर्थक आमनेसामने आले. एकीकडे 'जय बांग्ला' आणि दुसरीकडे 'जय श्री राम' अशा घोषणांमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. मात्र, सुरक्षा दलांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणतीही मोठी अप्रिय घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या सर्व आरोपांना फेटाळून लावत निवडणूक आयोगाने एक सविस्तर स्पष्टीकरण जारी केले आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खुदीराम अनुशीलन केंद्रातील सर्व स्ट्राँग रूम पूर्णपणे सुरक्षित आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या, त्यांच्या निवडणूक एजंट्सच्या आणि सामान्य पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत सर्व स्ट्रॉंग रूम सील करण्यात आले होते. पोस्टल मतपत्रे वेगळे करण्याचे काम पूर्वनियोजित प्रक्रियेनुसार सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुरू होते आणि याची पूर्वकल्पना ईमेलद्वारे सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली होती. आयोगाने स्पष्ट केले की, सर्व प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.

ममता बनर्जी यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, त्यांनी टीव्हीवर हालचाली पाहिल्यानंतर त्या स्वतः स्ट्राँग रूमच्या ठिकाणी आल्या. केंद्रीय सुरक्षा दलांनी सुरुवातीला त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र नियमांचा हवाला दिल्यानंतर त्यांना आत प्रवेश मिळाला. ममता यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना व उमेदवारांना मतमोजणी केंद्रांवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून, मतपेट्या आणि ईव्हीएमवरील या राजकीय वादावरून वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.