१५ हजारांना विकली जात होती IPL तिकिटे

बेंगळुरू : आयपीएल २०२६ च्या हंगामात क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा बेंगळुरू पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बेंगळुरूच्या सेंट्रल क्राईम ब्रांचने चिन्नास्वामी स्टेडियममधील 'श्री लक्ष्मी कॅन्टीन'मध्ये काम करणाऱ्या चंद्रशेखर नावाच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडून अटक केली आहे. १५ एप्रिल रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याची तिकिटे तो १५ ते १९ हजार रुपयांच्या चढ्या दराने काळ्या बाजारात विकत असताना ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा काळाबाजार केवळ एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नसून त्याचे धागेदोरे थेट कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत पोहोचले आहेत. 'स्वास्तिक हेवी इंजिनिअरिंग', 'इंडस्ट्रियल ऑटोमेशन कन्सल्टंट' आणि 'धरणी कॉम्प्युटर्स' यांसारख्या कंपन्यांच्या नावाने 'तिकीटजेनी' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ही तिकिटे मोठ्या प्रमाणात आरक्षित केली गेली होती. अशाच प्रकारे २८ मार्च रोजी झालेल्या आरसीबी आणि सीएसके सामन्यातही ८१ तिकिटे वळवून लाखो रुपयांची कमाई करण्यात आली होती. आतापर्यंतच्या तपासानुसार एकूण १७.५२ लाख रुपये किमतीच्या १८१ तिकिटांचा बेकायदेशीर व्यवहार उघड झाला आहे.

अटकेत असलेल्या चंद्रशेखरने चौकशीदरम्यान कबुली दिली आहे की, ही तिकिटे त्याला कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनचा सदस्य गणेश परीक्षित याने पुरवली होती. गणेश परीक्षितने ही सर्व तिकिटे चढ्या दराने विकण्याच्या सूचना चंद्रशेखरला दिल्या होत्या. या माहितीनंतर पोलिसांनी परीक्षितच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली आहे, मात्र तो सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ज्या खासगी कंपन्यांच्या नावाचा वापर करून तिकिटांचे बल्क बुकिंग करण्यात आले, त्या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्टेडियमच्या आतूनच चालणाऱ्या या पद्धतशीर गैरप्रकारामुळे सामान्य क्रिकेटप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आयपीएलची क्रेझ आणि चाहत्यांच्या भावनेचा गैरफायदा घेत ही टोळी लाखो रुपयांची उलाढाल करत होती. पोलीस आता या रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, स्टेडियममधील आणखी काही वरिष्ठ अधिकारी किंवा कंत्राटदार या लुटीत सामील आहेत का, याचा तपास करत आहेत. या कारवाईमुळे आगामी सामन्यांच्या तिकीट विक्रीत पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.