योग आणि मानवी पाठीचा कणा

योगामधील भूतशुद्धीची संपूर्ण प्रक्रिया फक्त याच दिशेने आहे - पाच तत्वांपासून मुक्त होणे. जर तुम्ही स्वतः आणि पाच तत्व यांच्यामध्ये प्रभावीपणे अंतर निर्माण केले, तर मग तुम्ही, स्वतः आणि शरीर यांच्यामध्ये एक स्पष्ट अंतर निर्माण करता.

Story: विचारचक्र |
22nd February, 11:07 pm
योग आणि मानवी पाठीचा कणा

सद्गुरू : योगामध्ये, आपण मानवी मणक्याला मेरुदंड असे म्हणतो, ज्याचा अर्थ विश्वाचा अक्ष असा आहे. एखाद्या व्यक्तीचा मणका विश्वाचा अक्ष कसा काय असू शकतो? आज, आधुनिक विज्ञान संपूर्ण अस्तित्वाला एक कंपन म्हणून पाहत आहे. किंवा जर तुम्ही अधिक खोलवर गेलात, तर तीच ऊर्जा अनेक प्रकारे स्पंदित होत आहे. आज आपल्याला हे देखील माहित आहे की, तुम्ही ज्याला निर्मिती म्हणता ती विशाल शून्यतेच्या मांडीवर आहे - जिला शास्त्रज्ञ गडद ऊर्जा म्हणजेच डार्क एनर्जी सारखी नावे देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यापलीकडे, आपल्याला हे माहित आहे की, अजूनही संपूर्णपणे रिक्त अशा जागा आहेत. सर्वात स्थूल भौतिक अस्तित्वापासून ते तुम्ही ज्याला दैवी म्हणता, तो केवळ एकच मूलभूत पाया आहे. ते एका रंगाच्या लांब फटकाऱ्यासारखे आहे - प्रथम ते दाट असते, नंतर पातळ आणि पातळ होत जाते आणि पुढे नाहीसे होते. निर्मिती प्रक्रियेत, एक मानव म्हणून तुम्ही या शून्यतेच्या थोडे जवळ असता.

मानवातील आवश्यक स्पंदन मणक्यातून निर्माण होते. ते जितके सूक्ष्म असेल तितके ते पुढे जात राहते. जर ते स्थूल असेल, तर ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच पोहोचू शकते. जर ते खूप सूक्ष्म झाले, तर तुम्ही ते सर्वत्र उधळून देऊ शकता. एकदा का तुमची स्पंदने सर्वत्र पसरली गेली की, मग तुमच्या बोधशक्तीची क्षमता देखील सर्वत्र पसरली जाते. आत्ता सध्या, तुमच्या मर्यादित अस्तित्वाच्या संदर्भात, तुम्ही ज्याला "मी" म्हणता, ते तुमच्या संवेदनांच्या सीमांपुरते आहे. तुमच्या अनुभवाच्या सीमांमध्ये जे आहे, ते तुम्ही आहात. तुमच्या अनुभवाच्या सीमांबाहेर जे आहे ते कोणीतरी किंवा दुसरे काहीतरी आहे. तुमच्या स्पंदनांना शुद्ध करून, तुम्ही तुमच्या अनुभवाच्या सीमा अमर्यादपणे वाढवू शकता. जेव्हा आपण म्हणतो की, "शिवाने आपला तिसरा डोळा उघडला," याचा अर्थ असा होतो की, त्याने त्याच्या अनुभवाच्या सीमा अमर्यादित प्रकारे वाढवल्या. मग संपूर्ण अस्तित्व त्याचाच एक भाग आहे आणि स्वाभाविकच तो केंद्र आहे. पण तो केंद्र आहे हे तुम्हाला कसे कळते?

काळ आणि अवकाश यांचा भ्रम

आज, आधुनिक विज्ञान तुम्हाला निःसंशयपणे हे सिद्ध करून दाखवत आहे की, काळ आणि अवकाशाच्या तुमच्या संकल्पना खूप भ्रामक आहेत. काळ आणि अवकाश हे दोन्ही ताणता येतात; तुम्ही त्यांना हवे तसे बदलू शकता. तुम्ही १००० प्रकाशवर्षे दूर असलेली एखादी गोष्ट इथेच घडवू शकता. १०,००० वर्षांपूर्वीचे किंवा १०,००० वर्षांनंतरचे जे असेल ते तुम्ही आत्ता इथेच घडवू शकता; कारण इथे आणि आत्ता हेच सर्व काही आहे. मी कोणता रहस्यवाद सांगत नाही. आधुनिक विज्ञानानुसार, काळ आणि अवकाश हा एक मोठा भ्रम आहे. तुम्ही त्यातून तुम्हाला जे हवे ते बनवू शकता. खरं तर, आज, शास्त्रज्ञांचा एक विशिष्ट वर्ग असा युक्तिवाद करू लागला आहे की, काळ नावाची कोणतीही गोष्ट नाही, अवकाश नावाची कोणतीही गोष्ट नाही. ते बरोबर आहेत. या आकलनावरूनच आम्ही म्हटले होते की, तुमचा पाठीचा कणा मेरुदंड आहे; तो विश्वाचा अक्ष आहे. किंवा किमान, जर तुम्ही त्याला एका विशिष्ट प्रकारे स्पंदित केला तर तो ते होऊ शकतो.

हे शरीर एक साधन आहे. तुम्ही ते केवळ स्वतःसाठी अन्न आणि वस्तू गोळा करण्यासाठी वापरणार आहात का? तुम्ही ते अचाट कृत्य करण्यासाठी वापरणार आहात का? की तुम्ही ते शक्य तितक्या उच्चतम पद्धतीने वापरणार आहात? जर तुम्हाला ते एखाद्या साधनासारखे वापरायचे असेल, तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला या शरीरापासून वेगळे करावे लागेल. तुम्हाला चांगलेच माहिती आहे की, तुम्ही हे शरीर गोळा केले आहे - ते फक्त अन्नाचा एक संग्रह आहे. तुम्ही जे गोळा करता त्याला तुम्ही "मी स्वतः" कसे म्हणू शकता? तुम्ही जे गोळा करता ते काही काळासाठी तुमचे असू शकते, पण ते तुम्ही असू शकत नाही.

एक चमत्कारिक साधन

मानवी शरीर हे एक चमत्कारिक साधन आहे. जर तुम्हाला या एकाच जीवनात त्याचा शोध घ्यायचा असेल, तर त्यासाठी खूप काही करावे लागेल. पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे, लोकांचे स्वतःच्या शरीराशी असलेले बंधन इतके खोलवर आहे की, ते शरीराला एक साधन मानू शकत नाहीत. त्यांची शरीराशी असलेली आसक्ती आणि ओळख इतकी खोलवर आहे की, ते याला "स्वतः" म्हणून पाहत राहतात. ज्या क्षणी तुम्ही हे शरीर "मी" म्हणून पाहता, त्या क्षणी त्याच्याशी खूप जास्त प्रमाणात भावना जोडलेल्या असतात. मग आपण ते साधन म्हणून वापरू शकत नाही.

योगामधील भूतशुद्धीची संपूर्ण प्रक्रिया फक्त याच दिशेने आहे - पाच तत्वांपासून मुक्त होणे. जर तुम्ही स्वतः आणि पाच तत्व यांच्यामध्ये प्रभावीपणे अंतर निर्माण केले, तर मग तुम्ही, स्वतः आणि शरीर यांच्यामध्ये एक स्पष्ट अंतर निर्माण करता.

एकदा का तुम्ही तुमच्या आणि शरीराच्या मध्ये अंतर निर्माण केले की, मग तुम्हाला हे जाणून घेण्याचा आनंद मिळेल की, तुम्हाला कोणत्या प्रकारचे यंत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये बंधन आणि स्वातंत्र्याचे सर्व घटक आहेत. तुम्ही हे दैवी बनवू शकता - तुम्ही तुमची ऊर्जाप्रणाली अशा प्रकारे हलवू शकता की, शरीर एक देवता बनते. किंवा तुम्ही एखाद्या प्रेतासारखे असू शकता. आपण म्हणतो की, तुम्ही या शरीराला शव किंवा शिव बनवू शकता. शव म्हणजे प्रेत. शिव म्हणजे परम. तुम्ही त्याचे काय करता यावर ते अवलंबून असते. ते अशा प्रकारे कार्य करू शकते की, ज्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवला नसेल की, एखादा मानव अशा प्रकारे देखील कार्य करू शकतो.



- सद्गुरू

(ईशा फाऊंडेशन)