
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

तत्पूर्वी, आज दुपारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट ) विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ गटनेते पदासाठी मांडला, या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला. यानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. या निवडीसोबतच सुनेत्रा पवार यांना विधानसभेत पक्षाचा 'व्हिप' जारी करण्यासह सर्व घटनात्मक अधिकार देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत डेहराडूनहून मुंबईत दाखल झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता राजभवनात केवळ दहा मिनिटांचा हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. मंत्रिमंडळात सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेला वित्त खाते मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवणार असून, २० फेब्रुवारीपासून सुरू होणारे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन फडणवीस हेच मांडणार आहेत.

अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, पक्षात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावरून अंतर्गत नाराजी असल्याचे समोर आले आहे. अनेक आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवार यांच्या गटात विलीनीकरण करण्यास स्पष्ट विरोध दर्शवला असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यावर भर दिला आहे.

महाराष्ट्रात एकीकडे महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या निवडी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने राजकीय वर्तुळातून त्यांचे स्वागत होत आहे. उद्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याने दिल्लीतही हालचालींना वेग आला आहे.