‘हिटमॅन’चे २०२७च्या वर्ल्ड कपचे स्वप्न होतेय धूसर?

Story: क्रीडारंग - क्रिकेट |
4 hours ago
‘हिटमॅन’चे २०२७च्या वर्ल्ड कपचे स्वप्न होतेय धूसर?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याच्यासाठी २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहितकडून चाहत्यांना ज्या मोठ्या खेळीची अपेक्षा होती, ती पूर्णपणे फोल ठरली. विशेष म्हणजे, इंदूरमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यातही रोहित स्वस्तात बाद झाला आणि त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रोहितसाठी ही मालिका एक मोठा धक्का मानली  जात आहे.

न्यूझीलंडने इंदूरच्या मैदानावर भारतासमोर ३३८ धावांचे महाकाय आव्हान उभे केले होते. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला आपल्या अनुभवी सलामीवीराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितला केवळ ११ धावांवर समाधान मानावे लागले.

हे बाद होणे केवळ एका सामन्यापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण मालिकेत त्याचा फॉर्म खराब होता. या मालिकेत रोहितने केवळ फलंदाजीच गमावली नाही, तर त्याने आपल्या कारकिर्दीतील एक अत्यंत नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रोहितच्या बॅटमधून केवळ ६१ धावा निघाल्या आणि त्याची सरासरी अवघी २० इतकी राहिली. २०१३ पासून रोहित पूर्णवेळ सलामीवीर म्हणून खेळू लागल्यानंतर ही त्याची सर्वात खराब एकदिवसीय मालिका ठरली आहे. याआधी २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने केवळ ४९ धावा केल्या होत्या, मात्र तेव्हा तो कायमस्वरूपी सलामीवीर नव्हता.

विशेष म्हणजे, रोहित शर्मा गेल्या काही काळापासून उत्तम फॉर्ममध्ये होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने २०१ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. त्यावेळी तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे चित्र दिसत होते.

रोहित शर्मा सध्या आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आहे. वय, फिटनेस आणि सातत्य याबाबत आधीच चर्चा सुरू असताना, अशा प्रकारची मालिका त्याच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला भविष्यातील मोठ्या स्पर्धांचा विचार करता तरुण खेळाडूंना संधी देण्याचा विचार करावा लागणार आहे. २०२७ चा वर्ल्ड कप अजून वर्षभरावर असला, तरी त्या वेळी रोहितचे वय आणि फिटनेस कितपत साथ देईल, हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहणे अत्यंत गरजेचे आहे.

भारतीय संघात सध्या शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांसारखे तरुण आणि आक्रमक फलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिक तीव्र होत चालली आहे. जर रोहितला आपले स्थान टिकवायचे असेल, तर त्याला पुन्हा एकदा सातत्यपूर्ण आणि मोठ्या खेळी कराव्या लागतील. केवळ नावाच्या जोरावर संघात स्थान मिळणे आता शक्य नाही.

प्रवीण साठे