जर तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट निवडली, तर ती तुमचे व्यक्तिमत्व बळकट करते. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी करायला शिका, तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांसोबत राहा आणि तरीही तुमचे जीवन समंजसपणे, प्रेमाने, आनंदाने जगा. सर्व काही तुटून जाईल.

सद्गुरू सांगतात स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे कसे जायचे.
सद्गुरू : प्रत्येक मानवातील कर्माची रचना मुळात चक्रीय असते. जेव्हा आपण म्हणतो की, ते एक चक्र आहे, तेव्हा ते केवळ एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत नसते. जर तुम्ही पुरेसे निरीक्षण केले, तर तुम्हाला दिसेल की, बाह्य घटनांची साधारणपणे १२ ते १५ वर्षांच्या चक्रात पुनरावृत्ती होते. जर तुम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले, तर तुम्हाला दिसेल की, एका वर्षाच्या आत, तेच प्रकार अनेक वेळा घडत आहेत. जर तुम्ही खूप, खूप बारकाईने निरीक्षण केले तर, एका दिवसातही तेच चक्र अनेक वेळा घडत आहेत. या ४० मिनिटांच्या चक्रांना कन्नडमध्ये गळिगे म्हणतात. म्हणून कर्मचक्र प्रत्यक्षात दर ४० मिनिटांनी घडत राहते.
जर तुम्ही काळजी पूर्वक निरीक्षण केले नाही, तर तुमच्या जीवनात एक विशिष्ट पद्धत आहे हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला १२ वर्षांचा कालावधी लागू शकतो. जर तुम्ही स्वतःला अधिक जागरूक केले, तर दर ४० मिनिटांनी तुम्हाला तुमचे कार्मिक चक्र मोडण्याची संधी मिळेल. ते पाहणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे जीवन हे केवळ पुनरावृत्ती करणारे मूर्खपणाचे एक चक्र आहे असे दिसले, जर तुम्हाला असे दिसले की तुम्ही दर ४० मिनिटांनी तेच चक्र पुन्हा पुन्हा करत आहात, तर ते ज्या प्रकारे चालले आहे ते काही चांगले नाही हे समजण्यासाठी तुम्हाला फक्त दोन दिवस लागतील. जर तुम्ही हे चक्र १२ वर्षांतून एकदा पाहिले, आणि हे समजण्यासाठी २४ ते ४८ वर्षे लागली तर ते काही चांगले नाही. जर तुम्ही हे चक्र जीवनात एकदाच पाहिले, आणि हे समजण्यासाठी काही जन्म लागले तर ते काही चांगले नाही. हे सर्व तुम्ही किती जागरूक आहात यावर अवलंबून आहे. तुम्ही जितके जास्त जागरूक व्हाल तितके तुम्हाला दिसेल की अजागरूक चक्रात जगणे चांगले नाही. म्हणून दर ४० मिनिटांनी तुम्हाला त्याबाबत जागरूक होण्याची आणि चक्र तोडण्याची, तुमच्या सध्याच्या भिंती तोडण्याची आणि निघून जाण्याची संधी मिळते.
आध्यात्मिक प्रक्रियेकडे जाण्याचे तीन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे, काही जन्मांमध्ये हळूहळू योग्य गोष्टी करून, तुम्ही तिथे पोहोचाल. दुसरा मार्ग म्हणजे, तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीत राहा, तुम्ही जे काही करू शकता ते करा, स्वतःला खुले आणि केंद्रित ठेवा आणि तुमच्या गुरूंसाठी स्वतःला उपलब्ध करून द्या आणि जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा ते त्याची काळजी घेतील. तिसरा मार्ग म्हणजे, तुम्हाला आत्ताच काहीतरी जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला आत्ताच तुमच्या मर्यादा तोडून पलीकडे जायचे आहे; तुम्हाला मर्यादांपलीकडचे जीवन आत्ताच जाणून घ्यायचे आहे. मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे, याची काळजी करू नये, कारण अशा अनेक गोष्टी घडतील ज्यांना कोणीही मान्यता देणार नाही. समाज मान्य करणार नाही, लोक मान्य करणार नाहीत, तुमचे कुटुंब कदाचित मान्य करणार नाही, कारण तुम्ही एका ठराविक प्रकारचे व्यक्ती होता म्हणून ते तुमच्याशी जोडलेले होते. जर तुम्ही दुसऱ्या प्रकारचे झालात, तर ते तुमच्याशी स्वतःला जोडू शकणार नाहीत.
समजा तुम्ही कोणाशी तरी लग्न केले आहे. त्यांनी तुमच्याशी लग्न केले, कारण तुम्ही एका विशिष्ट प्रकारचे व्यक्ती होता. जर तुम्ही दुसऱ्या प्रकारचे बनलात, कदाचित ते सुंदर प्रकारचे असेल, पण वेगळ्या प्रकारचे असेल, तर तुम्ही अचानक एक परके व्यक्ती व्हाल. जोपर्यंत त्यांच्याकडे तुम्हाला ‘माझा जोडीदार पुढे गेला आहे' ही एक मोठी शक्यता म्हणून पाहण्याची बुद्धी आणि समज नसेल तोपर्यंत ते तुमच्यासोबत राहू शकत नाहीत. ‘माझ्यापेक्षा पुढे असलेला कोणीतरी असणे खूप छान आहे’ अशी समज जर असेल तर ठीक आहे. पण जर तितकी समज आली, तर मग ते नाते स्वतःहून रूपांतरित व्हायला हवे. ते आता पूर्वीसारखे असू शकत नाही; ते काहीतरी वेगळे बनले पाहिजे. एकदा का तुम्ही हे ओळखले की, कोणीतरी तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे, तर ते नाते पती आणि पत्नी, आई आणि मुलगा, हे आणि ते असू शकत नाही; ते काहीतरी वेगळे होईल. म्हणून एका प्रकारे, तुम्ही ज्या कशाला महत्वाचे मानत होता ते तुटेल; एकतर भौतिकदृष्ट्या तुटेल आणि संपेल किंवा तुम्ही त्याच जागेत राहाल, पण तरीही ते बदलेल. जगात किती लोक त्यासाठी तयार आहेत?
तर, इतर दोन पर्याय बऱ्याच लोकांसाठी चांगले आहेत, तुम्ही योग्य गोष्टी करा, तुमच्या गुरूंसाठी उपलब्ध राहा आणि जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा ते त्याची काळजी घेतील. किंवा तुम्ही उपलब्ध राहण्यास तयार नसाल, पण काही छोट्या गोष्टी करण्यास तयार असाल; स्वतःचे एका प्रकारे पोषण करा जेणेकरून भविष्यात कुठेतरी काहीतरी घडेल. मी कोणासाठीही अशी इच्छा करत नाही. एकतर तुम्ही आत्ताच तुमच्या मर्यादा तोडल्या पाहिजेत किंवा किमान मृत्यूच्या क्षणी तरी ते घडलेच पाहिजे.
तुम्ही आणि सर्वोच्च यांच्यामध्ये, तुमच्याशिवाय दुसरे काहीही नाही. तुम्ही आणि सर्वोच्च यांच्यामध्ये कोणताही डोंगर उभा नाही; फक्त तुमची स्वतःची मानसिक रचना आहे. जर तुम्हाला ती तोडायची असेल, तर आपल्याला उलट काहीतरी करावे लागेल. ही एक सोपी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता: तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीसोबत काम करा. त्या व्यक्तीसोबत खूप प्रेमाने, आनंदाने वेळ घालवा. बऱ्याच गोष्टी तुटतील. पण तुम्ही नेहमीच तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत काम करता - ते तुमच्यासाठी चांगले नाही.
जर तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट निवडली, तर ती तुमचे व्यक्तिमत्व बळकट करते. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी करायला शिका, तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांसोबत राहा आणि तरीही तुमचे जीवन समंजसपणे, प्रेमाने आणि आनंदाने जगा. सर्व काही तुटून जाईल.

- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)