२६ वर्षांनंतरही आठवणींनी अंगावर येतो काटा

नवी दिल्ली: भारतीय विमानचालन इतिहासातील सर्वात भयावह आणि वेदनादायी घटना म्हणून २४ डिसेंबर १९९९ चा दिवस आजही ओळखला जातो. काठमांडू ते दिल्ली या प्रवासासाठी निघालेल्या 'इंडियन एअरलाईन्स'च्या IC-814 विमानाचे पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि सात दिवस चाललेल्या या थराराने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. या घटनेला आता २६ वर्षे पूर्ण होत असताना, त्या वेळच्या स्मृती आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत.
विमानाचे हायजॅक आणि रक्तरंजित थरार
२४ डिसेंबर १९९९ रोजी सायंकाळी ४ वाजता काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरून या विमानाने १९० प्रवासी आणि चालक दलासह उड्डाण केले. विमान भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करताच शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पाच बुरखाधारी दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला. सुरुवातीला हे विमान लाहोरला नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे परवानगी न मिळाल्याने ते अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर उतरवण्यात आले. इंधन भरण्यास उशीर झाल्याने संतापलेल्या दहशतवाद्यांनी प्रवाशांवर हल्ले सुरू केले. दुर्दैवाने, यामध्ये २५ वर्षीय रुपिन कत्याल या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, ज्यामुळे ही घटना अधिकच गंभीर वळणावर पोहोचली.

कंदाहार मधील चर्चा आणि सरकारपुढील पेच
अमृतसरनंतर हे विमान दुबईमार्गे अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेण्यात आले. येथे त्या काळी तालिबानची सत्ता होती. २७ डिसेंबर रोजी भारताने आपले वार्ताकार आणि गुप्तचर अधिकाऱ्यांचे पथक कंदहारला पाठवले. दहशतवाद्यांनी सुरुवातीला ३६ दहशतवाद्यांची सुटका, २० दशलक्ष डॉलर्स आणि साजिद अफगानी नावाच्या दहशतवाद्याचा मृतदेह अशा मोठ्या मागण्या केल्या होत्या. अखेर दीर्घ चर्चेनंतर तीन कुख्यात दहशतवादी मसूद अजहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक जरगर यांच्या बदल्यात प्रवाशांची सुटका करण्याचे ठरले.

३१ डिसेंबर १९९९ रोजी शेवटचा करार
३१ डिसेंबर १९९९ रोजी भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह या तिन्ही दहशतवाद्यांना घेऊन कंदहारला पोहोचले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारताला हे कठीण पाऊल उचलावे लागले. प्रवाशांची सुटका झाली, मात्र मुक्त केलेल्या दहशतवाद्यांनी पुढे अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या घटनेचा निषेध करताना याला 'दहशतवादाचा क्रूर चेहरा' असे म्हटले होते. या प्रकरणातील बहुतांश आरोपी आजही पाकिस्तानात लपून असल्याचे सांगितले जाते. या भीषण घटनेची दखल घेत नुकताच अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'IC-814' हा चित्रपट आणि 'धुरंधर' या चित्रपटातूनही या इतिहासाला उजाळा देण्यात आला आहे.
