पिर्ण-बार्देश येथील खून प्रकरण : आतापर्यंत सात जणांना अटक

पणजी : पिर्ण-बार्देश येथील कपिल चौधरी या युवकाच्या खूनप्रकरणी रवीश्वर नाईक (गिरी), विठ्ठल तुयेकर (कांदोळी), विनायक कांबळे (कळंगुट) व ॲक्विनो परेरा या चार जणांना कोलवाळ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
मूळ उत्तर प्रदेश येथील कपिल चौधरी हा शुक्रवारी पिर्ण आणि खरगाळी दरम्यानच्या टेकडीवर गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. १०८ रुग्णवाहिकेने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या शरीरावर दांडा तसेच लाथांच्या जखमांचे व्रण होते. मारहाणीतून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय येताच कोलवाळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी कॉल लोकेशन व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनाचा छडा लावला. शनिवार १ नोव्हेंबर रोजी सकाळी रेन्ट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, कपिल चौधरी याने ३० ऑक्टोबर रोजी गुरुदत्त याच्याकडून रेन्ट अ कॅब असलेली थार भाड्याने घेतली. दीपक ठाकूर या नावाने असलेले पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून त्याने दिले होते. ही गाडी बांदा-सावंतवाडी येथे पोचल्याचे जीपीएस ट्रॅकरद्वारे समजल्यानंतर गुरुदत्तने मित्रांसोबत जीपचा पाठलाग सुरू केला. कुडाळ-कणकवली येथे संशयितांनी गाडी अडवली व त्याला तेथेच मारहाण केली. त्यानंतर पिर्ण येथील टेकडीवर आणून मारहाण केली. या मारहाणीत कपिलचा मृत्यू झाल्याची माहिती लवंदे यांनी दिली. याच दरम्यान डायसन कुतिन्हो व सूरज ठाकूर या दोघा संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यानंतर मंगळवार, ४ रोजी पोलिसांनी रवीश्वर नाईक (गिरी), विठ्ठल तुयेकर (कांदोळी), विनायक कांबळे (कळंगुट) व ॲक्विनो परेरा या चौघांना अटक केली आहे. आतापर्यंत सात जणांना या प्रकरणात अटक केली आहे.