धूर्त राजकारणी... धुरंधर प्रशासक

Story: - गुरुदास सावळ |
2 hours ago
धूर्त राजकारणी... धुरंधर प्रशासक

१९९१ मध्ये रवी नाईक मुख्यमंत्री बनल्याने राष्ट्रपती राजवट संपली. पोलिसांचा वचक कमी झालेला असताना रवींनी गुन्हेगारीच्या मुळालाच हात घातला. गोव्यात कुठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशी जाहीर तंबी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी देताच सांताक्रूझ परिसरातील वाटमारी बंद झाली. कथित गुंड भूमिगत झाले. गोवा गुंडगिरी मुक्त झाला.
.....
२५ जानेवारी १९९१ रोजी मगो (रवी नाईक गट) नेते रवी नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ४२ दिवसांची राष्ट्रपती राजवट संपली. दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री या नात्याने मोठ्या दिमाखात झेंडा वंदन केले आणि सलामी स्वीकारली. रवी नाईक यांचा एकट्याचाच शपथविधी झाला होता. २५ जानेवारी ते ११ फेब्रुवारी हे १८ दिवस रवी नाईक यांचे ‘वन मॅन’ सरकार गोव्यात होते. रवी नाईक मगो गटातील इतर ५ आमदारांचा रवी नाईक यांच्याबरोबरच शपथविधी होणार होता. फुटीर आमदार पक्षांतरविरोधी कायद्याखाली अपात्र ठjn नये म्हणून एकूण आमदारांच्या किमान एक तृतीयांश आमदार फुटणे गरजेचे होते.
पाच आमदार तयार होते. सहावा आमदार मिळत नव्हता. सरतेशेवटी पाळीचे आमदार विनयकुमार उसगावकर गळाला लागले आणि ११ फेब्रुवारी १९९१ रोजी रवी नाईक गटातील शंकर साळगावकर, पांडुरंग राऊत, अशोक साळगावकर, रत्नाकर चोपडेकर, संजय बांदेकर व विनयकुमार उसगावकर या सहा मंत्र्यांचा शपथविधी घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
संपूर्ण फेब्रुवारी महिना उपसभापती प्रकाश वेळीप आणि सभापती प्रा. सुरेंद्र सिरसाट यांना हटवून एका वर्षापूर्वी उचलबांगडी केलेले उपसभापती सायमन डिसोझा यांची पुनर्स्थापना करण्यात गेला. उपसभापती सायमन डिसोझा यांनी व माजी सभापती प्रा. सिरसाट यांनी आमदार म्हणून अपात्र ठरविलेले मुख्यमंत्री रवी नाईक व त्यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रत्नाकर चोपडेकर व संजय बांदेकर यांना फेरपात्र ठरवले. १२ एप्रिल १९९१ रोजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी आपला मगो पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करून ते काँग्रेसवासी झाले आणि दोन वर्षांनंतर परत एकदा काँग्रेसचे सरकार आले.
१९९० साल हे गोव्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत अनिश्चितेचे होते. सरकारचा पोलिसांवरील वचक कमी झाला होता. सांताक्रूझ परिसरात ‘गोवा प्रोटेक्टर्स’ ही संघटना कार्यरत होती. प्रोटेक्टर्स या नावाने गुंडगिरी, लूटमार आणि पर्यायी न्यायालय चालविले जात होते. या गावातील सामाजिक कार्यकर्त्यां व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचा या संघटनेला आशीर्वाद असल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलीस अधिकारीही त्यांना घाबरून असायचे. याच सुमारास ‘ओ हेराल्डो’ या इंग्रजी दैनिकाचे मुख्य प्रतिनिधी अँथोनी फर्नांडिस या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला. गोव्यात नव्याने सुरू झालेल्या ‘मटका’ व्यवसायात गोवा प्रोटेक्टर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या भ्याड हल्ल्यात गोवा प्रोटेक्टर्सचा हात आहे हे स्पष्ट होते. हा हल्ला झाला. तेव्हा प्रस्तुत लेखक ‘गुज’ या पत्रकार संघटनेचा अध्यक्ष होता. हल्लेखोरांना अटक करा म्हणून ‘गुज’ ने पणजी फेरीबोट धक्क्यावर साखळी उपोषण सुरू केले. त्यामुळे सरकारवर दडपण वाढले. कायदा व सुव्यवस्था राखून गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले. ‘गोवा प्रोटेक्टर्स’ सारख्या संघटनावर बंदी घालण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. व्हिक्टोरिया फर्नांडिस व त्यांचे पूत्र रुडॉल्फ या दोघांना ‘रासुका’ खाली स्थानबद्ध करण्यात आले. गोव्यात कुठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशी जाहीर तंबी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी देताच सांताक्रूझ परिसरातील वाटमारी बंद झाली. कथित गुंड भूमिगत झाले. गोवा गुंडगिरी मुक्त झाला.