गेल्या वर्षीपेक्षा घट, पण मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक
पणजी : बेतोडा येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका युवकासह युवतीचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा राज्यातील अपघातांच्या वाढत्या घटनांवर लक्ष वेधले गेले आहे. १ जानेवारी ते १० जुलै या कालावधीत गोव्यात तब्बल १,२४८ अपघात झाले असून त्यात १४३ जणांचा बळी गेला आहे. याचा अर्थ सरासरी दररोज ६ अपघात तर दर ३२ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे.
दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यातील अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यांत गंभीर अपघात घडले. सत्तरी, धारबांदोडा, बेतोडा, मडगाव, कळंगुट, म्हापसा परिसरात अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागला. काही ठिकाणी दुचाकीस्वार रस्त्यावरून फेकले गेले, काही ठिकाणी ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली.
गेल्या वर्षीपेक्षा घट, पण मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक
गोव्यात २०२४ च्या तुलनेत यंदा अपघात आणि मृत्यू थोडक्याच प्रमाणात कमी झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १,४२६ अपघात आणि १६८ अपघाती मृत्यू झाले होते. यंदा १७८ अपघात आणि २५ मृत्यूंनी घट झाली असली, तरी दररोज ६ अपघातांची नोंद ही चिंतेची बाब आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षभरात २,६८२ अपघात झाले. त्यात २८६ अपघाती मृत्यू झाले. विशेष म्हणजे यापैकी ७२ टक्क्यांहून अधिक अपघात ग्रामीण भागात झाले असून, मृत्यूही शहरी भागाच्या तुलनेत अधिक प्रमाणात ग्रामीण भागात झाले आहेत.
‘रोड हिप्नोसिस’ : डोळे उघडे पण मेंदूवर झापड! जाणून घ्या काय आहे हा नेमका प्रकार
सतत सरळ रस्त्यांवरून वाहन चालवताना चालकाला झोप लागल्यासारखी स्थिती निर्माण होणे, मेंदूचा प्रतिक्रिया देण्याचा वेग मंदावणे आणि काही वेळेतच काय घडले हे आठवू न शकणे यालाच ‘रोड हिप्नोसिस’ किंवा ‘हायवे संमोहन’ असे म्हटले जाते. ही अवस्था सध्या जागतिक अपघातांमागे एक प्रमुख कारण म्हणून पुढे येत असून, भारतातही अनेक प्रकरणांमध्ये ही स्थिती दिसून आली आहे.
वाहन चालवताना ‘रोड हिप्नोसिस’ची अवस्था सर्वसामान्यपणे दोन ते अडीच तासांच्या सलग प्रवासानंतर सुरू होते. चालकाचे डोळे उघडे असले तरी मेंदू ‘रिकॉर्ड’ करत नाही. त्यामुळे चालकाला वाहन कुठे गेले, किती वेगाने आपण पुढे जात होतो किंवा समोरची परिस्थिती काय होती याचे भान राहत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी, प्रवासी झोपलेले असतील, किंवा चालक एकटाच असेल, तेव्हा ही अवस्था अधिक तीव्र होते.
या अवस्थेत असलेल्या चालकाला टक्कर होईपर्यंत शेवटच्या काही मिनिटांत काय झाले हे आठवतच नाही. अपघात होण्यापूर्वीचा कालावधी, वाहनाचा वेग, पुढील वाहन किती जवळ आहे, याचे भानच राहत नाही. बहुतांश अपघातात वाहन १२० किमी प्रतितास किंवा त्याही पेक्षा अधिक वेगाने जाऊन समोरच्या गाडीवर किंवा समोरील वस्तुवर जाणून धडकते.
अपघात टाळण्यासाठी काही उपाय
तज्ज्ञांच्या मते, ‘रोड हिप्नोसिस’पासून बचाव करण्यासाठी दर अडीच तासांनी थांबणे, ५-१० मिनिटे चालणे, चहा-कॉफी पिणे किंवा फ्रेश होणे गरजेचे आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात अधूनमधून रस्त्यावरील ठिकाणे आणि वाहनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर वाहन चालवताना मागील १५ मिनिटे लक्षात येत नसतील, तर तो स्पष्ट इशारा आहे की तुम्ही स्वतःसह इतर प्रवाशांना गंभीर संकटात टाकत आहात. डोळे उघडे असूनही जर मन बंद असेल, तर अपघात अटळ ठरतो. अशा स्थितीत गाडी तात्काळ बाजूला लावून काही क्षण विश्रांती घ्या, श्वास घ्या, थोडे फिरा आणि मगच परत वाहन चालवा.
सायंकाळी ६ ते रात्री ९ काळात अपघाताचे प्रमाण सर्वाधिक
वाहतूक पोलिसांच्या विश्लेषणानुसार, अपघात व मृत्यूंचा सर्वाधिक काळ सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यानचा असून, यावेळी ५१७ अपघातांपैकी ६३ मृत्यू झाले. त्याखालोखाल दुपारी ३ ते सायंकाळी ६ व रात्री ९ ते १२ या वेळेतही अपघातांचे प्रमाण मोठे आहे. याच वेळी चालक थकलेले असतात, प्रकाश अपुरा असतो आणि काही वेळा मद्यप्राशनाचे प्रमाणही अधिक असते.
पोलिसांचा जागृतीवर भर, पण रस्त्यांची स्थितीही जबाबदार
वाहतूक नियम मोडणे, हेल्मेट न लावणे, मद्यप्राशन करून गाडी चालवणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे आणि रस्त्यावरील अपुरे संरक्षक कठडे व प्रकाशयोजना यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गोवा पोलिसांकडून आता जनजागृती, दंडात्मक कारवाई, विशेष नाकाबंदी मोहीम राबवण्यात येत आहेत. मात्र, अपघात थांबवायचे असतील, तर केवळ पोलीसच नाही, तर प्रत्येक वाहनचालकाने जागरूक राहणे गरजेचे आहे.