वारी ही केवळ पूर्वजांची ठेव नाही, ती आजच्या तरुणांची नव्याने उलगडलेली ओळख आहे. ती एकाच वेळी वारसा आहे आणि आकर्षणही. पण त्यापलीकडे ती एक अशी चळवळ आहे – जी प्रत्येक पिढीला नव्या अर्थांनी जागवते, जोडते आणि घडवते.
"टाळमृदंगांचा गजर, चालती पावलं, अभंगांचे सूर आणि हरवलेलं अंतःकरण..." वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे चालत जाणं नव्हे, ती आहे श्रद्धेची, समर्पणाची आणि सामूहिक ऊर्जेची एक अनुपम यात्रा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकरी दूरवरून, पायपीट करत, टाळ-मृदंगाच्या गजरात, एकमेकांची साथ घेत, विठोबाच्या भेटीला येतात. या वारीत केवळ भक्ती नाही, तर त्याग, शिस्त आणि सामाजिक समरसतेचाही झरा वाहत असतो.
पण आजच्या या तंत्रज्ञानसमृद्ध, गतिमान युगात, तरुण पिढी वारीकडे कशा दृष्टिकोनातून पाहते?
वारी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा आहे का? की आधुनिक तरुणाईला तिच्या अर्थपूर्णतेने आकर्षित करणारा वारसा?
पूर्वी वारीत वडीलधारी मंडळी, शेतकरी आणि पारंपरिक वारकरी संप्रदाय यांचा प्राधान्याने सहभाग असायचा. मात्र आज, वारीत महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध व्यवसायांमध्ये गुंतलेली शहरातील तरुण मंडळी, तंत्रज्ञानाचा वापर करणारी डिजिटल पिढीही सहभागी होताना दिसते. हेच दर्शवते की वारी आता केवळ एक परंपरा न राहता, नव्या पिढीसाठीही एक ‘जीवनशैली’ ठरत आहे.
वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही, ती शिस्त, सहकार्य, नेतृत्वगुण, सेवाभाव आणि संयम यांचा वारसा देते. दिवसेंदिवस वारीचा अनुभव घेण्यासाठी अनेक तरुण पुढे सरसावत आहेत. त्यांना वारीत सामील होणं म्हणजे एक वैयक्तिक तपस्या वाटते – जिथे सोशल मीडियापलीकडच्या खऱ्या ‘कनेक्ट’ ची अनुभूती मिळते.
आज अनेक तरुण Instagram, YouTube, Facebook अशा माध्यमांवरून #WariDiaries, #Vitthal Vibes अशा हॅशटॅग्सने आपले अनुभव शेअर करताना दिसतात. वारीतील अनुभवांचे ब्लॉग्स, फोटो डायऱ्या आणि थेट प्रक्षेपणांमुळे ही परंपरा अधिक व्यापक बनली आहे. एकीकडे ही डिजिटल वारी तंत्रज्ञानाशी जोडलेली असली, तरी ती भावनेचा आणि श्रद्धेचा नवा डिजिटल अविष्कार ठरते.
आजची तरुणाई वारीतून केवळ अध्यात्मच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, वेळेचं नियोजन, समूहात राहून निर्णय घेण्याचं कौशल्य आणि स्वतःच्या भावविश्वाची खोल जाणीव शिकते आहे. वारीत चालणं हे केवळ शारीरिक कष्ट नव्हे, तर आत्मिक परिपक्वतेचंही एक साधन आहे.
अर्थात, प्रत्येक तरुण वारीला एका समान हेतूने सामील होत नाही. काहींना ती आकर्षण वाटते, काहींना ती स्वतःला शोधण्याची वाट वाटते. पण शेवटी, या सगळ्यांच्या सहभागातून वारीचा मूळ गाभा – समाज, श्रद्धा आणि समरसतेचा संगम – अधिक सशक्त होतो.
वारी ही केवळ पूर्वजांची ठेव नाही, ती आजच्या तरुणांची नव्याने उलगडलेली ओळख आहे. ती एकाच वेळी वारसा आहे आणि आकर्षणही. पण त्यापलीकडे ती एक अशी चळवळ आहे – जी प्रत्येक पिढीला नव्या अर्थांनी जागवते, जोडते आणि घडवते.
- पल्लवी उल्हास घाडी
गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय