जगाचं नव्हे,मनाचं ऐका!

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण नकळतपणे समाजाच्या अपेक्षांचे ओझे वाहत असतो, ज्यामुळे आपल्या स्वतःच्या इच्छा आणि स्वप्ने कुठेतरी मागे पडतात. हा लेख आपल्याला याच विचारातून बाहेर पडून, लोकांचा विचार करण्याऐवजी आपल्या मनाचे ऐकून स्वतःची प्रगती कशी करावी आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र व समाधानी जीवन कसे जगावे हे सांगतो.

Story: ललित |
27th June, 10:29 pm
जगाचं नव्हे,मनाचं  ऐका!

जच्या काळात प्रत्येक माणूस फक्त 'समाज काय म्हणेल?' याच विचाराने जगतो. स्वतः काही नवीन गोष्ट करायला गेलो की, सर्वप्रथम आपल्याला आठवण होते ती समाजाची आणि समाजात राहणाऱ्या अनेक विचारसरणीच्या माणसांची, पण आपण स्वतःचा विचार कधी करतो का? आपले आयुष्य हे आपले असते, समाजाचे नाही. तरीही, आपण अनेकदा समाजाच्या अपेक्षांचे ओझे वाहतो आणि आपल्या स्वप्नांना, इच्छांना बाजूला सारतो. समाजाची भीती किंवा इतरांचा विरोध यामुळे अनेकदा आपली आंतरिक ऊर्जा आणि क्षमता दाबून टाकली जाते, ज्यामुळे आपण आपल्या खऱ्या क्षमतेनुसार जगू शकत नाही.

जीवन जगत असताना रोजच्या धावपळीत अनेक लहान-थोर माणसे आपल्याला भेटतात. काही जण दुसऱ्यांना प्रोत्साहन देतात, तर काही लोक दुसऱ्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. अशा दुहेरी स्वभावाच्या माणसांमुळे एका व्यक्तीचे जीवन प्रगती करण्यापासून मागेच राहते. कारण माणूस नंतर स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करत बसतो. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्याची सवय आपल्याला इतकी जडते की, त्यातून बाहेर पडणे आपल्याला अशक्य वाटते. ही सामाजिक चौकट अनेकदा आपल्या सर्जनशीलतेला आणि नाविन्याला अडथळा ठरते. मग ते करियर निवडण्यापासून ते साधे कपडे घालण्यापर्यंत असो, आपण सतत इतरांच्या नजरेतून स्वतःला तपासत असतो.

एखादी भोळी-भाबडी व्यक्ती जेव्हा काही वेगळे कार्य करते, तेव्हा समाजाला ते जड जाते. तसेच श्रीमंत माणसाने जर काही नवीन गोष्ट केली, तर जगातील लोकांच्या मनात त्या व्यक्तीबाबत ईर्ष्या निर्माण होते. अर्थातच, आज प्रत्येक गरीब व श्रीमंत माणसाने समाजाने घालून दिलेल्या नियमांनुसार वागावे असे समाजातील लोकांना वाटते. हे दुर्दैव आहे की, आपल्या समाजात अजूनही लोकांना इतरांच्या प्रगतीचा आनंद घेण्याऐवजी मत्सर वाटतो. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या इच्छेने काहीतरी वेगळे करू पाहतो, तेव्हा समाज त्याला लगेच 'वेडा', 'अव्यवहारी' किंवा 'अहंकारी' ठरवतो. ही मानसिकता आपल्या समाजाच्या विकासाला खीळ घालते, कारण नवनवीन विचार आणि कल्पनांना इथे प्रोत्साहन मिळत नाही, उलट त्यांना दडपले जाते.

समाजात अनेक विचारांची व मानसिकतेची माणसे राहतात. प्रत्येकाचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. त्यामुळे 'जग काय म्हणेल? जग पाहते तसेच आपण वागायचे का?' या प्रश्नांवर सकारात्मकतेने विचार करणे महत्त्वाचे ठरते. कारण जगात असलेल्या विभिन्न मानसिकतेच्या लोकांचा विचार करून आपण जीवन जगलो, तर प्रत्येक व्यक्ती सतत आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याच्या मागेच अडकून राहील. म्हणूनच, प्रत्येकाने समाजाकडे नव्हे तर स्वतःच्या मनातील इच्छांची परिपूर्ती करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या मनाची हाक ऐकणे हे आत्मविश्वासाचे पहिले पाऊल आहे. जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावतो, तेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या गरजा, क्षमता आणि स्वप्ने कळतात. यातूनच आपण आपल्या आयुष्याचा उद्देश शोधू शकतो.

समाजातील माणसे एकमेकांना नावे ठेवतात, टोमणे मारतात, तुलना करतात; कारण हे मानवी स्वभावाचे लक्षण आहे. पण प्रत्येक व्यक्तीने या सर्व नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे ठरते. कारण प्रत्येक व्यक्तीला जीवनात काही ना काही गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असते, त्यामुळे स्वतःच्या मर्जीने स्वतःची प्रगती करणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मार्गावर चालणे हे सोपे नाही, पण ते शक्य आहे. यासाठी आत्मविश्वास, धैर्य आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. आपले जीवन सुंदर बनवण्याची जबाबदारी आपली आहे, इतरांची नाही. जेव्हा आपण स्वतःच्या मनाचे ऐकून कृती करतो, तेव्हा मिळणारे समाधान हे कोणत्याही सामाजिक मान्यतेपेक्षा कितीतरी पटीने मोठे असते.

आजचा काळ 'जग पाहतो, तसेच तुम्ही वागा' या विचारावर चालतो. पण याउलट प्रत्येकाने स्वतःचा विचार करणे गरजेचे आहे. 'जग जसं पाहतं, तसंच जगायचं का?' या प्रश्नाला छेद देत माणसाने स्वतःसाठी जीवन जगले पाहिजे, इतरांसाठी नव्हे! आपल्या आयुष्याची सूत्रे आपल्याच हातात असावीत. आपले निर्णय, आपल्या आवडीनिवडी, आपले ध्येय हे आपले असावे, इतरांनी लादलेले नसावे. स्वतःच्या मनाचे ऐकून जगल्यानेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळते आणि जीवनात समाधान व आनंद प्राप्त होतो. स्वतःला सिद्ध करण्याची संधी फक्त एकदाच मिळते, ती गमावू नये.


- पूजा भिवा परब

पालये-पेडणे