मानवी मनात भीती ही एक मूलभूत आणि कधीही न संपणारी भावना आहे. माझ्या एका रुग्णाने अनुभवलेली अस्वस्थता – "काहीतरी होईलच" हे याच भीतीचं एक रूप होतं. ही भीती केवळ एक क्षणिक भावना नसते, तर ती चिंता आणि इतर मानसिक विकारांना जन्म देऊ शकते. या लेखात आपण भीतीची मानसशास्त्रीय बाजू, तिचे परिणाम आणि तिला समजून घेऊन तिच्यावर मात करण्याचे मार्ग जाणून घेऊ.
आज सकाळपासूनच वातावरण काहीसं धूसर होतं. बाहेर ढग जमले होते. हवेत गारठा होता. पण माझ्या केबिनमध्ये वातावरण नेहमीसारखंच होतं... कधीकधी मौन, कधी स्फोटक, तर कधी फक्त डोळ्यांमधून व्यक्त होणाऱ्या अव्यक्त भावना.
या आठवड्यात मात्र विशेष लक्षात राहिलेलं एक सत्र होतं, एका तरुण मुलीचं. ती हुशार होती, व्यवस्थित बोलणारी होती, पण तिच्या स्वरात कायम एक चिवट असुरक्षितता जाणवत होती.
“ताई, मला ना असं वाटतं की काहीतरी भयंकर होणार आहे. काही विशेष कारण नाही, पण मन मात्र अजिबात शांत बसत नाही…”
तिचे हे बोल ऐकून मी केवळ तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिले. तिच्या चेहऱ्यावर ना रडणं, ना हसणं, परंतु आत कुठेतरी एक घाबरलेलं, कोपऱ्यात लपलेलं असं छोटंसं मूल बसलेलं कळत होतं.
आपण सर्वच माणसं एका अजब यंत्रणेनं बनलेलो आहोत. आपल्या मनाचा गाभा हा ‘टिकून राहणं’ या प्रेरणेवर आधारित आहे. शरीर जसं जिवंत राहण्यासाठी श्वास घेतं, तसंच मनसुद्धा सतत भावनिक श्वास घेत असतं. पण त्याच्या श्वासांची लय, दिशा आणि गती मात्र वेगळी असते.
भीती कुठून येते?
भीतीचं ठोस उत्तर नसतं. भय अथवा भीती ही मानवी भावनांच्या नकाशावरची सगळ्यात मूलभूत, मूळ आणि न संपणारी छाया आहे. कधी ती आपल्याला एखाद्या अपघाताच्या आठवणीने पुन्हा भेटते. कधी ती भविष्यातल्या अनिश्चिततेचं रूप घेते. कधी ती केवळ “काही चुकलं तर?” या विचाराच्या गुहेतून डोकावू पाहते.
म्हणजेच, आपल्या मेंदूची संरचना अशी आहे की ती भीती ओळखते, अनुभवते आणि त्यावर कृती करायला शिकवते. ‘अमिग्डाला’ (Amygdala) नावाचा मेंदूचा एक भाग आपल्याला धोक्याचा इशारा देतो, त्यानंतर शरीरात एक प्रकारची सिग्नलिंग सुरू होते. हृदय जोरात धडधडू लागतं, तळहात घामेजून जातात... व आपण सतर्क होतो.
त्यामुळे जेव्हा मन घाबरतं, तेव्हा ते बचावासाठी काही युक्त्या शोधतं, म्हणजेच ‘डिफेन्स मेकॅनिझम्स’ (defense mechanisms) अर्थात मानसिक कवच! भीती, असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव हे सर्व सहन करणं कठीण जातं तेव्हा आपल्या मनात नकळत प्रतिक्रिया घडतात.
उदाहरणार्थ:
कधी आपण भीतीपासून दूर पळतो... म्हणजेच दमन (repression).
कधी एखाद्याला दोष देतो... प्रक्षेपण (projection).
कधी सगळं विनोदात उडवून लावतो... विनोद (humor).
कधी आपण एखाद्या भयंकर घटनेला इतकं तटस्थ होतो की आपल्यालाच वाटतं, “आपण काहीच वाटू दिलं नाही.”... हे बुद्धीकरण (intellectualization).
आता मानसशास्त्रानुसार ही सगळी संरचना आवश्यक असते कारण ती आपल्याला “त्या भयाच्या क्षणी” सावरायला मदत करते. पण... ती भीती जाते का? नाही. ती केवळ मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसते.
भीती आणि चिंता: एकाच झाडाच्या दोन फांद्या
आणि मग... रात्रीच्या शांततेत, कामाच्या तणावात, प्रिय व्यक्तीच्या शब्दांमध्ये, अगदी रिकाम्या वेळेतही, ती हळूच पुन्हा डोकावते. अशावेळी ती सावली मग ऑफिसमधल्या प्रेझेंटेशनच्या वेळेस घामातून बाहेर येते, किंवा ट्रेनमध्ये गर्दी असल्यास, अचानक धाप लागून जीव घाबरा होतो... म्हणजेच काय तर, हीच भीती हळूहळू तिचे कपडे अर्थात रूप बदलते आणि चिंता विकार (anxiety disorder), फोबिया (phobia), सामाजिक चिंता (social anxiety) अशा विविध नावांनी आपल्या जगण्यात पाय रोवते.
भीती किंवा भय हा एक क्षणिक धक्का असतो. आज आहे, उद्या नसेलही. पण ती भीती जर सतत मनात घर करून राहिली, तर ती वरील दिल्याप्रमाणे ‘चिंता’ (Anxiety) होऊन जाते... म्हणजेच आपला चिंताराक्षस ज्यावर आपण आधी बोललो आहोतच.
खरं तर, चिंता ही भीतीच्या वणव्याचेच रूप असते, पण ती आजूबाजूला वास्तवाचा विस्तव नसतानाही वाढत जाते हे विशेष. “काहीतरी होईलच...” “लोक काय विचार करतील?”
ही वाक्यं मुळात भीतीच्या खोल गर्तेतून येतात. कारण भीती ही नेहमीच तार्किक नसते, ती बहुतेक वेळी भावनिक देखील असते. ज्यामुळे ती एका अनुभवात रुजते, पण मग अनेक अनुभवांमधून ती अंकुरते. आणि त्यातून निर्माण होणारी चिंता म्हणजे खरं तर मनाची रोगप्रतिकारशक्ती कमी होणं होय, जसं शरीर आजारी पडतं, तसंच मनसुद्धा.
उपाय काय?
"पण मग उपाय काय?" माझ्यासमोर बसलेली ती तरुणी, तिच्या लांब श्वासांतूनच हा प्रश्न विचारत होती.
उपाय एकच. या सगळ्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा मार्ग... तो म्हणजे ऐकून घेणं, समजून घेणं आणि स्वीकारणं. भीतीला किंवा भय ह्या भावनेला समजून घ्यावं लागतं. तिची ‘गोड गोष्ट’ नाही, पण तिच्याशी ‘सत्य संवाद’ करावा लागतो. कुठे दरड कोसळली, कुठे काही दंगल झाली, कुठे युद्ध सुरू झाले, तर कुठल्या नव्या आजाराची साथ आली... हे आणि असे असंख्य भीतीच्या पाऊलखुणा येतातच. पण म्हणून त्याचा विचार करून त्यात अडकून पडणे कितपत योग्य आहे?
मनाचं एक विशेष वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे, ते आपल्या स्वप्नांइतकंच, भीतीसुद्धा प्रत्यक्ष अनुभवतं बरं! म्हणूनच भीतीला शब्द देणं, तिच्या मूळापर्यंत जाणं, आणि ती भीती आपल्याला काय ‘सांगू’ पाहते आहे हे समजून घेणं जास्त रास्त ठरतं. कारण, भीती ही आपल्याला अडवण्यासाठी नसते. तर ती आपल्याला सावध करायला असते. पण ती जर आयुष्य थांबवू लागली, तर तिला समजून घ्यायला हवंच, कारण म्हणतात ना, "Fear understood is fear disarmed."
भीती नसती तर आपण माणूस राहिलो असतो का?
भीतीमुळेच आपण काळजी घेतो.
भीतीमुळेच आपण कुणावर प्रेम करताना गंभीर होतो.
भीतीमुळेच आपण अपयश टाळण्यासाठी प्रयत्न करतो.
म्हणून भीती अथवा भय ह्या भावनेला शत्रू मानू नका.
तिला सहप्रवासी माना.
तिच्या हातात हात घालून जरा चालून बघा.
कधी ती आपण विसरलेली आठवण बनून समोर येईल.
कधी ती आपली लहानशी वाचलेली कहाणी आपल्यालाच परत सांगेल.
त्यामुळे, भीतीने आपल्याला जर गाठलं असेल, तर एकदाच नीटसं थांबून, तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहा...
कदाचित ती म्हणेल, “मी आहे, पण तुझ्या विरुद्ध नाही. मी आहे, कारण तू जिवंत आहेस... आणि मी तुला तुझं आयुष्य जगायला व लढायला शिकवणारी पहिली भावना आहे.”
- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४