बेकायदेशीर वास्तव्य : ७९ विदेशी नागरिकांना पाठविले मायदेशी
पणजी : राज्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी १ जानेवारी ते २७ जून २०२५ या कालावधीत ७९ विदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले. यात ३२ पुरुष तर ४७ महिला असून सर्वाधिक २६ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. ही कारवाई विदेशी नोंदणी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाने (एफआरआरओ) केली आहे.
राज्यात व्हिसा कालावधीनंतर वास्तव केल्यामुळे तसेच पासपोर्ट कालबाह्य झाल्यानंतर वास्तव केल्याप्रकरणी अनेक विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय ड्रग्ज तस्करी तसेच इतर गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या आणि शिक्षा भोगलेल्यांना मायदेशी पाठविण्याची व्यवस्था विदेशी नोंदणी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाकडून (एफआरआरओ) केली जात आहेत. याशिवाय न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अशा विदेशी नागरिकांना न्यायालयाच्या आदेशानुसार, मायदेशी पाठविण्यात येत आहे. त्यासाठी म्हापसा येथे स्थानबंद केंद्र उभारण्यात आले आहे. बेकायदेशीर वास्तव केलेल्या विदेशी नागरिकांना स्थानबंद केंद्रात ठेवले जात आहेत. त्यानंतर त्यांच्या देशातून कागदपत्रे आल्यानंतर विदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यात येत आहे.
रशियन, ब्रिटिश नागरिकांचाही समावेश
राज्यात बेकायदेशीर वास्तव केल्याप्रकरणी १ जानेवारी ते २७ जून २०२५ या कालावधीत ७९ विदेशी नागरिकांना मायदेशी पाठविले. यात सर्वाधिक २६ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यानंतर २५ रशियन, १८ युगांडा, प्रत्येकी २ ब्रिटिश आणि युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. नायजेरिया, पोलंड, मोराेक्को, बेलारूस, अर्जेंटिना आणि मॉरिशस या देशातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.