विधवा विषय काढला की प्रत्येकजण भावविवश होतो. पण यापुढे रडायचे नाही, तर लढायचे. कायदा होईपर्यंत अन् त्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबायचे नाही, हा निर्धार करण्याचे बळ नाशिक दौऱ्याने आम्हाला दिले.
विधवा प्रथेविरोधात कायदा करण्याच्या मागणीला कोविड काळानंतर जोर आलेला आहे. रोज अपघाताने अनेक मृत्यू होत असतात पण, कोविडनंतर आपण खऱ्या अर्थाने जीवनाच्या अशाश्वतेकडे लक्ष द्यायला लागलो. महाराष्ट्रातील हेरवाड गावातील क्रांतिकारी ठरावानंतर गोव्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींनी ठराव संमत केले. अगोदरच आपल्या गोव्यात या विषयावर अनेक कार्यक्रम, व्याख्याने, सिनेमा, चर्चासत्रे आयोजित केली होती. त्यामुळे हा विषय सगळ्यांच्या हृदयात होताच. या प्रथेविरोधातील असंतोषाला वाचा फोडण्याचे काम या ठरावाच्या निमित्ताने गोव्यात झाले. त्याची परिणती गोवा विधानसभेत हा विषय विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी मांडला अन् विद्यमान सरकारने तो संमत करीत कायदा करण्याचे आश्वासन दिले.
आज या कायद्याचा कच्चा मसुदा तयार करण्याचे काम त्रिसदस्यीय समितीला दिलेले आहे. त्याची प्रगती येत्या पावसाळी अधिवेशनात बहुतेक मांडली जाईल. त्यानंतर तो मसुदा जनतेसाठी खुला केला तर मग त्यात अजून काय काय बदल किंवा अधिक काय करायचे आहे ते जनता सांगेलच. सगळ्या सूचनांचा अभ्यास करून त्या मसुद्यात समाविष्ट करून एक सर्वसमावेशक विधवा प्रथाविरोधी कायदा तयार होईल, अशी आशा अन् अपेक्षा आम्ही महिलांनी केलेली आहे. देशभर या प्रश्नावर सध्या काय वातावरण आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही दोन दिवसीय ‘राष्ट्रीय विधवा प्रथा निर्मूलन कानून हेतू विचार - विमश परिषद’ जी नाशिक - महाराष्ट्र येथे २३-२४ जूनला संपन्न झाली, त्यात सहभागी झालो. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या प्रतिनिधींशी बोलताना हे लक्षात आले की, हा प्रश्न जेवढा गंभीर इथे आहे, तेवढ्याच तीव्रतेने तो इतरत्रही भेडसावतो आहे. फक्त नवरा वारलेली स्त्रीच नव्हे तर तिला जवळची असलेली प्रत्येक व्यक्ती या भेदभावाची शिकार होतेय. विधवा महिला स्वत:, तिची मुले, तिचे आईवडील, भाऊबहीण, सगळेच. कुणाला तिच्या पतीची पेन्शन, विमा मिळायला अडचण, तर कुणी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित. कुणाला घरातून हाकलून लावले, तर कुणाचा घरगुती छळ. कुणाच्या मुलांचे हाल तर कुणाच्या वडिलांचा संघर्ष. त्याची परिणती प्रत्येक व्यक्तीच्या मनात. आज या प्रश्नावर उपाय म्हणून विधवा प्रथेविरोधी कायदा झालाच पाहिजे, हा विचार दृढ होण्यात झाला आहे. तरीही कायद्यासाठी प्रत्यक्षरित्या न थांबता या महिलांचे प्रश्न हाताळणारे असंख्य कार्यकर्ते या परिषदेत आम्हाला भेटले.
‘नाशिक एनजीओ फोरम’ ही सगळ्या स्वयंसेवी संस्थांची पालक संस्था आहे. नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक संस्थेला पाठबळ देण्याचे काम ही संस्था मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली करते. राजू शिरसाठ सारखे मुत्सद्दी संघटक कार्यकर्ते या संस्थेची मोठी ताकद आहे.
विधवा प्रश्नावर सगळ्या संस्थांना आणि राज्यांना जोडण्याचे श्रेय चळवळ उभी करणारे प्रमोद झिंजाडे यांच्यासहित या संस्थेलाही जाते.
दत्तात्रय लहाने सारख्या कार्यकर्त्याने १०८ विधवा पुनर्विवाह घडवून आणले आहेत. समाजाच्या प्रवाहाविरोधात पोहून हे घडवून आणणे तसे सोपे नाही, हे आपण सर्वजण जाणतोच आहोत. तरीही एवढ्या सगळ्या महिलांसह त्यांच्याशी लग्न करायला तेवढ्याच तरुणांचे मनपरिवर्तन करणे सोपे नाही. विधवेशी आपणहून लग्न केलेल्या मुलांनाही नंतर कुठेतरी समाजात लाज वाटते अन् ते माणसांपासून दूर राहतात. पण लहाने यांनी या सोहळ्यांना बऱ्यापैकी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे सत्कार घडवून आणले. संसार रथ ओढताना त्यांना येणाऱ्या अडीअडचणी ते सोडवू लागले. त्यामुळे कितीतरी नवीन आयुष्यांना सोनेरी किनार देणाऱ्या या अवलिया साथींचे कौतूक करावे तेवढे कमी.
प्रमोद झिंजाडे यांनी आपल्या पत्नीला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्याच धर्तीवर प्रथमेश सोनवणे या कार्यकर्त्याने क्रमांक दुसरे प्रतिज्ञापत्र लिहून आपल्या पत्नीला दिले. त्यानंतर अशी पावले उचलणारे खूप कार्यकर्ते पुढे आले. २३ जून या आंतरराष्ट्रीय विधवा दिवसाचे औचित्य साधून किशोर पुंडलीक काळे यांनी हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश घेऊन येणाऱ्या आपली पत्नी कार्यकर्ती शोभा काळे यांना आम्हा सर्वांच्या साक्षीने प्रतिज्ञापत्र दिले. अशा प्रत्यक्ष काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची साथ या दोन दिवसात आम्हाला लाभली. महिलांचे आर्थिक स्वावलंबन अन् त्यातून नेतृत्व घडवण्याचे काम डॉ. सुधा कोठारी यांनी चैतन्य या पालक संस्थेअंतर्गत केलेले आहे. सुमारे ११ लाख महिलांकडे ज्यांची नाळ जुळलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधणे हे एका चैतन्यमय प्रवासाची आम्हाला मिळालेली पर्वणीच म्हणायला हवी.
सगळ्यात जास्त कौतुक आणि आदर वाटला तो महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त चद्रशेखर पगारे यांचे. ते उद्घाटक म्हणून आले होते. अशा संवेदनशील माणसाला बोलावणे, हाही इथल्या आयोजकांचा चांगला निर्णय म्हणायला हवा. तो फलद्रूप झाला. त्यांनी कार्यक्रम बघून आणि प्रयोजन बघून ते भारावून गेले. दुसऱ्या दिवशी दिडशे महिलांना ते घेऊन आले. विचार मंथन परिषदेच्या निमित्ताने महिलांचेही प्रबोधन होऊदे हा त्यांचा सुवर्ण मानस. कायदा करताना हवी असलेली माहिती सर्वेक्षण करून गोळा करण्याचे काम या सेविका करतील, हा निर्णय तिथल्या तिथे मंजूर झाला. महिलांना गोव्यात तयार केलेला संगीता नाईक लिखित, सुवर्णा गावकर निर्मित व प्रशांती तळपणकर यांचा अप्रतिम अभिनय असलेला “सवाशीण” लघुचित्रपट दाखवण्यात आला. सोबत “अफार्म” निर्मित विधवा प्रथा निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाची चित्रफीत दाखवण्यात आली. महिला लघुचित्रपट बघून हबकून गेल्या. सदगदित झाल्या. काय बोलावे ते त्यांना सुचेना झाले. हा भावनिक विषय आहे, असे प्रत्येकाला वाटत होते.
नवरा गेल्यावर होणारे संस्कार हे जीवघेणे आहेत अन् ते प्रत्येकाने आपल्या आप्त स्वकियांसोबत घडताना पाहिले आहेत. त्यात बदल व्हायला पाहीजे अन् त्यासाठी लागेल ते सहकार्य करायला आपण तत्पर असल्याचे महिलांनी सांगितले.
आता आपल्यासमोर असे घडत असेल तर आपण विरोध करू. आपल्या घरात, कार्यालयात, अवतीभवती कुठेही विधवा भेदभाव करणार नसल्याची प्रत्येकाने शपथ घेतली. हे या कार्यक्रमाचे एक मोठे फलित म्हणायला हवे. विधवा विषय काढला की प्रत्येकजण भावविवश होतो. मग ती स्वत: विधवा असो. तिची बहीण असो. मुलगी असो की सून असो. पण यापुढे रडायचे नाही, तर लढायचे. कायदा होईपर्यंत अन् त्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबायचे नाही, हा निर्धार करण्याचे बळ या नाशिक दौऱ्याने आम्हाला दिले.
नमन सावंत (धावस्कर)
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या
व साहित्यिक आहेत.)